ऋतम्भरा तत्र प्रज्ञा समाधिपाद सूत्र-४८
अध्यात्म – प्रसादाचा लाभ झाल्यानंतर जी प्रज्ञा (समाधीपासून लाभलेली बुद्धी) उत्पन्न होते, तिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात.
या बुद्धीच्या ठिकाणी केवळ सत्य आणि सत्यच असते. भ्रम, गोंधळ, विपरीत ज्ञान यांचा अजिबात गोंधळ नसतो.
अनुमान – अंदाज यांच्या मदतीने होणारे ज्ञान हे CONCEPTUAL FACT असते. तर ऋतंभरा प्रज्ञेतले ज्ञान हे PERCEPTUAL FACT असते.
समाधिपाद सूत्र-४९
श्रृत अनुमान प्रज्ञाभ्यां अन्यविषया विशेषार्थत्वात्.
आगम (शास्त्र) आणि अनुमानाच्या प्रज्ञेपेक्षा या (मागील सूत्रात सांगितलेल्या) प्रज्ञेचा विषय वेगळा आहे. कारण, त्या अवस्थेत (शब्द) अर्थाचा होणारा साक्षात्कार विशेष स्वरूपाचा असतो.
स्मृती शुद्ध होणे म्हणजे काय ?
समाधिपाद सूत्र-४२
तत्र शब्दार्थज्ञानविकल्पै:संकीर्णा सवितर्का समापत्ति:
या समापत्तींमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञानाच्या विकल्पाने मिश्रित असते, तेव्हा तिला सवितर्क समापत्ती असे म्हणतात. शब्द, शब्दांचा अर्थ यांमुळे होणारे स्पष्ट ज्ञान आणि त्यानंतरची ज्ञानग्रहणाची प्रक्रिया याला सवितर्क समापत्ती म्हणतात.
समाधिपाद सूत्र-४३
स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का
स्मृती शुद्ध झाल्यावर, स्वरूपशून्य, अर्थमात्र वाटणारी निर्वितर्क समापत्ती प्राप्त होते.
स्मृती शुद्ध होणे म्हणजे शास्त्र, तर्क व ज्ञान या गोष्टींपासून मुक्त होऊन आपली नजर केवळ स्थूल रूपावर स्थिर होते. म्हणजेच तर्क-वितर्क या गोष्टी थांबतात. ज्या गोष्टी जशा असतात, तशा त्या स्वीकारायची क्षमता वाढते. याला निर्वितर्क समापत्ती असे म्हणतात.
लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड.