गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात. याचा विचार करायला नको का ? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का ? मुळात गणेश उत्सवाची संकल्पना विचारात घ्यायला हवी. साधनेत या दोन्ही सणांचे महत्त्व किती आहे हे जाणून घ्यायला हवे. म्हणजेच आपण संस्कृती संवर्धनातून यशाचा मार्ग सोपा करायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न सांडिसी ।
तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ।। 8 ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – तूं अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीहि धीर सोडीत नाहींस तुझें नाव ऐकल्याबरोबर अपयशानें देशोधडी पलून जावें.
व्यक्तिमत्व कसे असावे ? व्यक्तिमत्व विकासासाठी काहीजण शिक्षण घेतात. आजकाल त्याची गरज झाली आहे. लोकांशी कसे बोलावे ? कसे वागावे ? समोरच्या व्यक्तिवर प्रभाव कसा पाडावा ? यासाठी शिक्षण दिले जाते. व्यवसायात प्रगती करायची असेल तर हे सर्व गरजेचे आहे. सर्वच गुण अंगभूत असतात असे नाही. काही गोष्टी ह्या शिकाव्याच लागतात. सर्वांना या गोष्टी जमतात असे नाही.
पूर्वीचे ग्रंथ पाहिले तर यामध्ये हेच शिकवले गेले आहे. मनाचे श्लोक काय सांगतात ? आपणास काय शिकवतात ? याचा विचार करायला नको का ? मन स्थिर कसे ठेवावे ? मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हेच तर सांगतात ना. व्यक्तिमत्व विकासात याची गरज वाटत नाही का ? चांगले शिक्षण, संस्कारच यातून शिकवले जातात ना. मग आजकाल हे श्लोक ऐकायला कोठेच मिळत नाहीत ? असे का ?
गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात. याचा विचार करायला नको का ? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का ? मुळात गणेश उत्सवाची संकल्पना विचारात घ्यायला हवी. साधनेत या दोन्ही सणांचे महत्त्व किती आहे हे जाणून घ्यायला हवे. म्हणजेच आपण संस्कृती संवर्धनातून यशाचा मार्ग सोपा करायला हवा. गणेश उत्सवात, नवरात्र या सणांमध्ये असे श्लोक शिकवले गेले तर व्यक्तिमत्व विकास होणार नाही का ? असे वाटत नाही का ? मग या गोष्टींचा विचार ज्येष्ठांनी तसेच तरूणपिढीने करायला नको का ? योग्य ते संस्कार करण्यासाठी असे सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. हे विचारात घ्यायला हवे. पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगलवादी भारतीय संस्कृती नाही हे लक्षात घ्यायला हवे.
पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत. याचा विचार व्हायला हवा. जग कितीही बदलले तरी सत्य बदलत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. या सत्याची कास धरायला शिकले पाहिजे. तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.
अयोग्य गोष्टींचा त्याग करून त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. कितीही कठीण प्रसंग आले तर धीर सोडायचा नाही. असे व्यक्तिमत्त्व घडवता आले तर अपयश सुद्धा तुमचे नुसते नाव ऐकून पळून जाईल. तुमच्या वाटेवर ते कधीही येणार नाही. यासाठी अयोग्य गोष्टी टाळून सत्याची कास धरुन आत्मज्ञान मिळवण्यासाठी पयत्न करायला हवेत.