Advertisement

समाज साहित्य प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यवाहपदी सुरेश बिले

Suresh Bille as Chief Operating Officer of Samaj Sahitya Pratishthan
  • डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले यांचीही कार्यकारणीवर निवड
  • संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांची माहिती

कणकवली – महाराष्ट्राच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीत लक्ष वेधून घेणाऱ्या समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यवाहपदी कणकवली येथील ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते आणि कवी सुरेश बिले यांची निवड करण्यात आली आहे. तर समाज साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यकारणी सदस्यपदी कवयित्री डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले यांची निवड करण्यात आली.

कणकवली येथे झालेल्या संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये सदर नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.
कणकवली येथील अभंग निवास अक्षय सभागृह येथे झालेल्या संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये नवीन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा पाटील, कोषाध्यक्ष प्रमिता तांबे, सहकार्यवाह प्रियदर्शनी पारकर, इतर पदाधिकारी ॲड.मेघना शिंदे, ॲड.प्राजक्ता शिंदे, प्रा संजीवनी पाटील, अंजली ढमाळ, डॉ.दर्शना कोलते, संतोष जोईल, तुषार नेवरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या पुढील वर्षभराच्या कार्यक्रमाचे स्वरूप ठरविण्यात आले. त्यानंतर नवीन पदाधिकारी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुख्य कार्यवाहपदी सुरेश बिले यांची निवड करण्यात आली. श्री बिले हे कणकवली शहरातील ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते असून आपल्या कॉलेज जीवनापासून त्यांनी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात लक्षवेधी असे काम केले आहे. तसेच एक कवी म्हणूनही त्यांची प्रसिद्धी आहे.

कार्यकारणी सदस्यपदी निवड झालेल्या डॉ योगिता राजकार या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री असून ललित लेखिका म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांना विविध सन्मानही प्राप्त झाले आहेत. तर मनीषा शिरटावले या कवयित्री लेखिका म्हणून प्रसिद्ध असून अलीकडेच त्यांचा जीवन रंग हा ललित लेखाचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या शैक्षणिक कार्याचीही दखल वेगवेगळ्या पातळीवर घेण्यात आली आहे. दरम्यान पुढील वर्षभरात कोकणसह महाराष्ट्रातील गुणवान साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचाही निर्णय या सभेमध्ये घेण्यात आला अशीही माहिती श्री मातोंडकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *