ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याचे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. तू ब्रह्म आहेस याची प्रचिती भगवंतांनी अर्जुनाला दिली, इतकेच नव्हे तर भगवंत आणि अर्जुन हे वेगळे नसून एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा हा एकच आहे. याची अनुभूती त्यांनी करून दिली.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
तरि विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।। ६७६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा
ओवीचा अर्थ – तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरुप दाखविले, ते शंकराला सुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही.
सृष्टीची निर्मिती ब्रह्माने केली असे मानले जाते. ब्रह्म म्हणजे आत्मा. हा आत्मा देहात आल्याने त्याला जन्म मरणाचा फेरा सुरू झाला आहे. अनेकदा अपघातात, बॉम्ब स्फोटात किंवा आगीमध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, तर तो देह कोणाचा आहे हे ओळखता येत नाही. तो शोधण्यासाठी गुणसूत्रे तपासावी लागतात. त्याला आपण इंग्रजीत डीएनए चाचणी म्हणतो. गुणसूत्रानुसार देहाची ओळख पटते.
गुणसूत्रापासूनच देहाची निर्मिती होते. प्रत्येकामध्ये ही गुणसूत्रे वेगवेगळी असतात. अनुवंशिकतेमध्ये काही गुणसूत्रे समान राहतात. त्यामुळे बापाचा आणि मुलाचा चेहरा साधारण दिसायला एकसारखा दिसतो. एकाच घराण्यातील सर्वांचा आवाज हा एकसारखा असतो. असे अनेक गुण एकसारखे असल्याचे पाहायला मिळतात. पण सर्वच गुण एकसारखे राहतात असे नाही. काही गुण आईच्या सूत्रातूनही येत असतात. म्हणजे प्रत्येक देहात वेगवेगळे गुण असतात. पण या देहात असणारा आत्मा मात्र एकच आहे. हा आत्मा या देहात येतो तेव्हा त्याचा जन्म होतो.
सूर्यापासून सृष्टी जन्मली. मग या विश्वाचे रूप काय आहे? सूर्य हेच तर या सर्वांचे मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच तर रूप दाखवत आहेत. धगधगता सूर्य, तळपणारा सूर्य हा नकोसा वाटतो. उन्हाळा नकोसा वाटतो. वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी आपण वातानुकूलित खोलीत राहणे पसंत करतो. सूर्याची दाहकता ही नकोशी वाटते. थंडावा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. विश्वरूपात हीच दाहकता भगवंताने अर्जुनाला दाखवली.
मुळ रूप दाखवले. सूर्याचे मूळ रूप दाखवले. या आगीपासूनच सर्व आत्मे तयार झाले आहेत. त्यामुळे हे या आगीत ते दिसत आहेत. सर्वांच्या ठायी असणारा हा जीवात्मा सूर्यापासूनच उत्पन्न झाला आहे. हे जे रूप आहे ते योगी पुरुषांना अनेक वर्षे साधना करूनही उमजत नाही. दिसत नाही. समजत नाही. हा योग भगवंताच्या भक्तीमुळे अर्जुनाला पाहायला मिळाला.
ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याचे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. तू ब्रह्म आहेस याची प्रचिती भगवंतांनी अर्जुनाला दिली, इतकेच नव्हे तर भगवंत आणि अर्जुन हे वेगळे नसून एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा हा एकच आहे. याची अनुभूती त्यांनी करून दिली. मी ब्रह्म आहे. हे समजणे, हे ज्ञान नित्य असणे म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे. आत्मज्ञानी होणे. हे ज्याला समजले त्याला सृष्टीतील सर्व गोष्टी ज्ञात होतात. सर्वांचे ज्ञान त्याला अवगत होते.
सर्व विश्वाची ओळख भगवंतांनी अर्जुनाला करून दिली. आणि हे सर्व विश्व भगवंतामध्ये कसे सामावलेले आहे. हे सुद्धा पटवून सांगितले. या विश्वाची ओळख सद्गुरु करून देतात. कारण शिष्याला ही ओळख झाल्याशिवाय स्वः ची ओळख होत नाही. स्वकडे तो आकर्षिला जात नाही. या स्वःमध्ये सर्व विश्व सामावलेले आहे. हे समजण्यासाठी विश्वाची ओळख होणे गरजेचे आहे. ती झाल्यानंतर स्वः ची ओळख होईल. म्हणजेच आत्मज्ञानाचा ओळख होईल. अन् त्याचा आत्मज्ञानाकडे ओढा लागेल. यासाठीच हे विश्वरुप दर्शन आहे. भक्ती दृढ व्हावी हा त्या मागचा उद्देश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.