2022-23चा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर केला. यावर ॲड. लखनसिंह कटरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया…
आजचे अर्थसंकल्पाचे भाषण ऐकले. मला ते एखाद्या अमूर्त चित्रासारखेच वाटले. अमूर्त चित्राचा अर्थ लावताना प्रत्येक पाहणारा/दर्शक आपापला, वेगवेगळा अर्थ मांडत असतो, तरी चित्रकाराला अपेक्षित अर्थ मात्र स्पष्ट होतोच असे नाही. तसेच आजच्या बजेट भाषणाबद्दल मला वाटले. हे बजेट म्हणजे वार्षिक अंदाजपत्रक कमी आणि हवामहली व्हिजन डॉक्युमेंटच जास्त वाटले मला.
आयकरात कोणतीही सवलत न देता पूर्वीचीच तरतूद कायम ठेवल्याचे दिसून येते. वस्तूतः 2014 पासून आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.50 लाख रुपयांवर गोठवून वाढत्या महागाई व अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक याची कोणतीच दखल घेण्याचे टाळून मध्यवर्गीयांवर व नोकरदारांवर जणू अन्यायच केला गेला आहे. एप्रिल 2010 चा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक 3880.40 होता, जो ऑक्टोबर 2021ला 8210.75 झाला असून त्यात 4330.34 अंशांची अवाढव्य वाढ झालेली आहे. असे असले तरी आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा मात्र 2014 च्या स्तरावरच गोठवून एकप्रकारे घटनेतील अनुच्छेद 43 मधील तरतूदींकडे अप्रत्यक्षरित्या दुर्लक्षच करण्यात आले आहे, असे दिसून येते. एकंदरीत मध्यवर्गीयांसाठी व नोकरदारांसाठी हे बजेट अतिशय निराशाजनकच असल्याचे दिसून येते.