July 27, 2024
Rajhans character article by Rajendra Ghorpade
Home » राजहंसासारखे योग्य तेच टिपायला शिका
विश्वाचे आर्त

राजहंसासारखे योग्य तेच टिपायला शिका

साधनेत मन रमण्यासाठी स्थिरता ही आवश्यक आहे. चांगल्या गोष्टीतून मनाला आनंद होतो. त्या गोष्टीच सतत ग्रहण करत राहिले तर स्थिरता आपोआप येते. दुष्ट विचारांनी मन चलबिचल होते. मनाची चलबिचलता दूर करण्यासाठी सन्मार्गाची सवय लावायला हवी. वाईट आणि चांगले यातील केवळ चांगल्या गोष्टी उचलायला हव्यात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था-। राजहंसु ।।११४२।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, असे जें परब्रह्म, तें जें सत्पुरुष, अनात्म व आत्मा यास विचारानें वेगळे जाणण्यात राजहंसाप्रमाणे असतात, ते पूर्ण होतात.

दुधात पाणी मिसळले तर दूध पातळ होते, पण राजहंस हा असा पक्षी आहे, जो त्यातील फक्त दूधच पितो व पाणी शिल्लक ठेवतो. इतके चातुर्य त्याच्याकडे आहे. आपणास आवश्यक ती गोष्टच तो घेतो. राजहंसाप्रमाणे आपणही या मोहमयी जगातील केवळ चांगल्या गोष्टींचे ग्रहण करायला शिकले पाहिजे. या मोहजालात न अडकता यातून योग्य काय व अयोग्य काय, हे ओळखायला शिकले पाहिजे. यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. मनाच्या स्थिरतेसाठी अशी दृष्टी गरजेची आहे.

साधनेत मन रमण्यासाठी स्थिरता ही आवश्यक आहे. चांगल्या गोष्टीतून मनाला आनंद होतो. त्या गोष्टीच सतत ग्रहण करत राहिले तर स्थिरता आपोआप येते. दुष्ट विचारांनी मन चलबिचल होते. मनाची चलबिचलता दूर करण्यासाठी सन्मार्गाची सवय लावायला हवी. वाईट आणि चांगले यातील केवळ चांगल्या गोष्टी उचलायला हव्यात. सातत्याने मन चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे. वाईट जरी घडले तरी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. एखाद्याने आपल्याबद्दल वाईट दुसऱ्यांना सांगितले. त्या गोष्टीतून आपण स्वतःला त्रास करून न घेता हे सांगण्यातून आपला काय फायदा झाला याचा विचार करायला हवा. वाईट गोष्टीतही चांगले काय घडले यावर अधिक लक्ष द्यायला हवे. अशाने आपणाला चांगले पाहाण्याची सवय लागू शकते. सकारात्मक विचारच आपल्यामध्ये स्थिरता आणू शकतात. योग्य गोष्टी टिपल्यानंतर अयोग्य आपोआपच बाजूला होते. त्याचा त्रास आपणास होत नाही.

आत्मा व देह वेगवेगळे आहेत. दुधात जसे पाणी मिसळले आहे तसे देहात आत्मा आला आहे. देहापासून आत्मा वेगळा आहे हे जाणण्यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. देहाचा क्षणभंगूरपणा ओळखायला हवा. आत्म्याचे अमरत्व अनुभवायला हवे. आत्म्याची अनुभूती यायला हवी. सद्गुरू त्यांच्या अनुभवातून ही अनुभूती शिष्याला देत असतात. शिष्याने फक्त जागरूक असायला हवे. राजहंसासारखे ओळखायला व टिपायला शिकले पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक, देह आणि आत्मा यातील फरक ओळखायला हवा. हे ज्ञान दृष्टीने जे जाणतात तेच खरे राजहंस. तेच आत्मज्ञानाचे लाभार्थी होतात. तेच त्या परमपदाला पोहोचतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भगवंताचे विश्वात्मक रूपडे

वेळाचा सदुपयोग हेच यशामागचे रहस्य

यल्लूर किल्ल्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या नजरेतून…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading