July 26, 2024
spiritual-article-on-dnyneshwari-by-rajendra-ghorpade-2
Home » स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय ? 
विश्वाचे आर्त

स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय ? 

संवादातून नैराश्य निर्माण होत आहे. पण ही निराशा जीवन संपविण्यापर्यंत असू शकते हे न पटणारे आहे. संवादाच्या माध्यमांचा हा दुष्परिणाम आहे. सुसंवाद व्हावेत यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सुविचारांची बैठक उभी राहायला हवी. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तो कामु सर्वथा जाये । जयातें आत्मतोषीं मन राहे ।
तोचि स्थितप्रज्ञु होये ।पुरुष जाणें ।।293।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा 

ओवीचा अर्थ – तो काम ज्याला सर्वथैव गेलेला असतो व ज्यांचे मन निरंतर आत्मसुखातं निमग्न राहाते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज.

आत्महत्या कशामुळे घडतात ? मानसाचे मन इतके कमजोर कशामुळे होते ? मानसाची मानसिकता इतकी का ढळते ? जीवन संपविण्याचा विचार येतोच कसा ? मन इतके भरकटते. इतके मन दुबळे आहे  का ? मानसिक समाधान नसल्यानेच आत्महत्या होतात. मन नियंत्रणात ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. आत्महत्या हा मानसिक आजार आहे. यावर उपाय एकच स्थितप्रज्ञु होण्याचा प्रयत्न करणे. त्यादृष्टीने विचार सुरू केला तरी हा आजार बरा होऊ शकतो. 

पण स्थितप्रज्ञ व्हायचे म्हणजे नेमके काय ? मनातील सर्व इच्छा टाकून द्यायच्या. इच्छा ठेवून कोणतेही कर्म करायचे नाही. स्वतःचे मन स्वरूपाच्या ठिकाणी ठेवून संतुष्ट व्हायचे. हे ज्या पुरुषाला जमते त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. परीक्षेत मनासारखे यश मिळाले नाही. प्रयत्न करुणही अपयश आले. प्रयत्न कमी पडले. अशाने मनात निराशा येते. अशावेळी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असा विचार करून मार्गस्थ व्हावे. एकदा अपयश येईल. दोनदा येईल. तिसऱ्यांदा तरी मनासारखे यश मिळेल ना ? प्रयत्न सोडायचे नाहीत. मनाची स्थिरता ढळू न देता प्रयत्न करत राहायचे. 

आजकाल कोणी मैत्रीस नकार दिला म्हणूनही आत्महत्या करतो. फेसबूकवर मैत्रीस नकार मिळाला म्हणून आत्महत्या. नव्या जमान्यात संवादाची माध्यमे बदलली आहेत. तशी मैत्रीची समीकरणेही बदलली आहेत. कोणाला काय आवडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशा संवादातून नैराश्य निर्माण होत आहे. पण ही निराशा जीवन संपविण्यापर्यंत असू शकते हे न पटणारे आहे. संवादाच्या माध्यमांचा हा दुष्परिणाम आहे. सुसंवाद व्हावेत यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सुविचारांची बैठक उभी राहायला हवी. 

सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण असे करणाऱ्यांच्या समोर आता अडथळे उभे केले जात आहेत. चांगले विचार वाईट कसे आहेत. हेच पटवून देण्याचे काम केले जात आहे. अशाने समाजाची मानसिकता ढळत आहे. मने दुबळे करण्याचे काम केले जात आहे. दुःखाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकारही होत आहेत. पण अशा प्रकारांनी मन विचलित होऊ नये. याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. 

हातून सत्कर्मे घडावी. सदाचार घडावा असा प्रयत्न सुरू ठेवायला हवा. अशाने चांगल्यांची संगत वाढते. पाय ओढणारे अनेक असतात. पण त्यांच्या प्रयत्नांना बळी पडायचे नाही. असा विचार करून वाटचाल हवी. अडथळ्यांना खंबीरपणे सामोरे जायला हवे. मनातील कमजोरपणा टाकून द्यायला हवा. यासाठीच स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न हवा. स्वः चा विकास हेच आपले ध्येय असायला हवे.  


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मानव हीच जात, माणूसकी हाच धर्म

खंड्याला जीवदान…(व्हिडिओ)

कृतज्ञेतले सुख…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading