July 27, 2024
Spirituality is the science of experience
Home » अध्यात्म हे अनुभवशास्त्र
विश्वाचे आर्त

अध्यात्म हे अनुभवशास्त्र

बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला, हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ९०११०८७४०६

ऐसे ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज ।
तयां नांव तेज । आध्यात्मिक तें ।। १८९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतःकरण सहज आपोआप धाव घेते. त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात.

जपानमध्ये त्सुनामी आली. ही दृश्ये पाहताना निसर्गाचा कोप काय असतो, हे स्पष्ट दिसते. अशा प्रसंगामुळे आपणास देवाची आठवण जरूर होते. ठेच लागल्यावर आईची आठवण होते, तोंडातून अगदी सहजपणे आई गं.. असे शब्द बाहेर पडतात. एकंदरीत, संकटाच्या काळात देवाची आठवण होते. इतर वेळी देवाची आठवण होत नाही. भीतीमुळे आपण देवाकडे वळतो. आधाराची गरज वाटते, पण प्रत्यक्षात अध्यात्मात असे काही नाही. नित्य देवाचे स्मरण करावे. आनंदी राहावे.

विधिलिखित आहे ते टाळता येत नाही. घडणारे घडतच राहणार. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल व दुसऱ्यांना कसे आनंदी ठेवता येईल, हेच महत्त्वाचे आहे. नव्या पिढीमध्ये देवाचा ओढा फारसा दिसत नाही. पूर्वीच्या काळी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाची स्तोत्रे म्हटली जायची. संध्याकाळची सुरवातही देवाच्या स्मरणाने व्हायची, पण आताच्या काळात असे फारसे आढळत नाही. हे संस्कार आताच्या पिढीत नाहीतच. फक्त संकटे आली की मगच देवाचे स्मरण होते. इतर वेळी नुसता दिखावा केला जातो. एवढेच काय, देवधर्म मानणाऱ्या व्यक्तीला वेळेचा दुरपयोग करणारा मूर्ख असे समजले जाते.

बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला, हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे. पूर्वी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आता ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावत आहेत. वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी हृदयाचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्यक आहे. ते वाढले तर हृदयविकाराचा झटका बसू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे, त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते. ते अनुभव आल्याशिवाय, अनुभुतीशिवाय शक्य नाही हे ही तितकेच खरे आहे. अध्यात्म कोणी जबरदस्तीने शिकू शकत नाही. कारण हे अनुभवशास्त्र आहे. त्याची अनुभुती यावी लागते. मगच त्याची ओढ लागते. हेच अध्यात्मिक तेज आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रंग होळीचे…

समाजात बदल घडवण्यासाठी हवी राष्ट्रसंतांच्या विचारावर कृती

चंद्राची आरती…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading