औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखक व कवी हबीब भंडारे यांच्या कवितांचा देशातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्ष मराठी अनिवार्य या विषयासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून ‘निवडक कवितांचा अभ्यास’ अंतर्गत एका कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालय (स्वायत्त) येथेही बी.ए.प्रथम वर्ष मराठी अनिवार्य या विषया अंतर्गत ‘विद्याशाखीय विशेष निवड (DSE): मराठी अभ्यासपत्रिका-२’ करिताच्या अभ्यासक्रमासाठी ‘फकिराची अनेक चिंधकांनी शिवलेली झोळी’ या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील एम.ए. हिंदी प्रथम वर्षाच्या ‘समकालीन मराठी अनूदित कविता’ अंतर्गत दोन कवितांचा समावेश शैक्षणिक वर्ष सन-२०२१-२२ पासून करण्यात आलेला आहे.
हबीब भंडारे हे मराठी कवितेतील एक महत्त्वाचं नाव असून जनसामान्यांचा जीवनसंघर्ष, प्रश्न, घुसमट, वेदना, जगण्यातील आशावाद त्यांच्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त होतो. हबीब भंडारे यांचे ‘माळावरची पेरणी’, ‘ढेकळाचा गंध’, ‘बांधावरच्या बाभळी आणि इतर कविता’, ‘मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं’, ‘जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता’, ‘ ‘अस्वस्थ एकांत’, इत्यादी महत्त्वाचे कवितासंग्रह तसेच नाट्यलेखन आणि बालसाहित्यही प्रसिद्ध आहे.