July 27, 2024
Home » देव म्हणजे काय ? ( एकतरी ओवी अनुभवावी )
विश्वाचे आर्त

देव म्हणजे काय ? ( एकतरी ओवी अनुभवावी )

अध्यात्मात चमत्काराला थारा नाही. कारण अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. चमत्कार हे विज्ञानातून घडत असतात. विज्ञान आणि अध्यात्म यात फरक आहे. मला साक्षात्कार झाला म्हणजे काय झाले ? मला त्याची अनुभुती आली म्हणजे काय झाले ? साक्षात्कार, अनुभुती ही आत्मज्ञानाची असते. ज्ञानाचा साक्षात्कार असतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

म्हणौनि वेगी प्रसन्न होई देवराया । संहरी संहरी आपुली माया ।

काढीं मातें महाभया । पासोनिया ।। 385 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – एवढ्याकरितां हे देवांतील राजा, श्रीकृष्णा लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भ्रमातून बाहेर काढ.

प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या घटना या विश्वरुपाचेच दर्शन आहे. अनेक चांगल्या वाईट घटना जीवनात घडत असतात. काही भयानक असतात तर काही आनंददायी असतात. दोन्हींचा समतोल राखून आपणास जीवनात यशस्वी व्हायचे असते. अध्यात्म साम्यावस्था शिकवते. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलतो. आनंद असो वा दुःख असो या दोन्ही घटनाचा मनावर होणारा परिणाम समान असायला हवा. शुन्य असायला हवा. अशी ही उदासी अवस्था आपणास गाठायची असते. काहीजण म्हणतात जीवनात घडणाऱ्या भितीदायक, दुःखकारक घटनांमुळे माणसे देवाकडे धावा करतात. तर काहीजण देवालाच मानत नाहीत. देवाचे अस्तित्व आहे की नाही हे आपणास सांगता येणे कठीण आहे. पण मानसातला देव पाहायला अध्यात्म शिकवते. स्वतःतील देव पाहायला अध्यात्म शिकवते. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. स्वची ओळख करून घेणे ही अंधश्रद्धा असूच शकत नाही. स्व ची ओळख झाली तर आपल्यातील भय निश्चितच दूर होईल. देवाचे अस्तित्व आहे की नाही देव आहे की नाही आपण कसे मानतो यावर अवलंबून आहे. मानला तर देव नाहीतर तो दगड असतो. हा श्रद्धेचा भाग आहे. देवाची मूर्ती जो पर्यंत घडवणाऱ्याकडे असते तो पर्यंत तो दगडच असतो. पण प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त होते. ही श्रद्धा आहे. काहींचा मूर्तीपुजेला विरोध आहे. त्यांना ही अंधश्रद्धा वाटते. पण यामागचा मानसिक विकासाचा विचार केला तर ते अधिक स्पष्ट होईल. मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून या सर्व कृतीकडे पाहायला हवे. मनाचा विकास हा आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. यावर अनुभवाशिवाय बोलणे हे चुकीचे आहे. ज्याला ही अनुभुती येते त्याला या गोष्टी पटतात, रुजतात. अन्यथा ती अंधश्रद्धाच वाटते. हा प्रत्येक व्यक्तीचा स्वाभाविक प्रश्न आहे. कठीण प्रसंगातून एखाद्याने आधार दिला तर तो त्याच्यासाठी देवच असतो. अशा घटनात गैरफायदा घेणारेही अनेकजण आहेत पण अशांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. भोंदू साधूंची भोंदूगिरी उघड होतेच.

अध्यात्मात चमत्काराला थारा नाही. कारण अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. चमत्कार हे विज्ञानातून घडत असतात. विज्ञान आणि अध्यात्म यात फरक आहे. मला साक्षात्कार झाला म्हणजे काय झाले ? मला त्याची अनुभुती आली म्हणजे काय झाले ? साक्षात्कार, अनुभुती ही आत्मज्ञानाची असते. ज्ञानाचा साक्षात्कार असतो. ज्ञान होणे मी कोण आहे, स्वःची ओळख होणे हा साक्षात्कार आहे. आत्मज्ञानाचा भाग आहे. मला देव दिसला म्हणजे काय ? मला हा अनुभव आला. पण त्यामागचा भावार्थ शोधणे गरजेचे आहे. देव माझ्या पाठीशी आहे. असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याच्या मनाला किती मोठा आधार मिळत असतो हे मानसशास्त्र त्यामागचे विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. या सर्वाचा अभ्यास करूनच मग साधनेतील साक्षात्कार समजून घ्यायला हवेत.

देवाने प्रसन्न होऊन आपणास अनुभुती दिली म्हणजे या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानी केले. हे समजून घ्यायला हवे. आत्मज्ञानी केले. मरण यातनेतून बाहेर काढले हे लक्षात घ्यायला हवे. मायेतून आपणाला त्याचे खरे स्वरूप म्हणजेच स्वतःचेच रूप समजत नव्हते. मी कोण आहे याची ओळख आपण विसरलो होतो. पण आता या मायेच्या महाभयाचा पडदा दूर झाल्यानंतर आत्मज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये विस्तारतो. यासाठी मोह, माया, अहंकार या सर्व गोष्टी दूर ठेऊन आपण स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. स्वःची जाणीव कशी होते हे समजून घ्यायला हवे. त्यानुसार आचरण करायला हवे. साधनेतून स्वःचा विचार करायला हवा. म्हणजेच स्वःची अनुभुती येईल आणि आत्मज्ञानी होता येईल. यासाठीच या मोह मायाजालातून बाहेर काढण्यासाठी देवाला साकडे घालायला हवे. देव म्हणजे आत्मा ही अनुभुती करून घ्यायला हवी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ज्ञानेश्वरीतील ओव्यावर निरुपण असणारी पुस्तके

पाण्याचे, ऑक्सिजनचे जीवनातील महत्त्व ओळखा अन् प्रदुषण रोखा 

शुद्ध अंतःकरणाच्या चौरंगावर गुरुमंत्राचे पुजन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading