ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात यांच्या ‘काही वाटा, काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या पुस्तकावर प्रा. रणधीर शिंदे यांचे मनोगत…
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मराठी साहित्यामध्ये स्वकेंद्री, मध्यमवर्गी अनुभवकथनात ललितलेखन गुरफटलेले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी ललितलेखनाच्या क्षेत्रात डॉ. थोरात यांचे मुक्त, वैश्विक वाचनानुभव देणारे लेखन वेगळे ठरते. त्यांचा अनुभवसंचय दांडगा आणि मांडण्याची शैली ही त्यांच्या लेखनाला वेगळे वैशिष्ट्य प्रदान करते. त्यांचा अनुभव व सादरीकरणाच्या कक्षा या अत्यंत विस्तृत स्वरुपाच्या आहेत. स्वतःकडे न्यूनत्व घेऊन बहुकेंद्री व समाजकेंद्री लेखनाकडे त्यांचा कल आहे. व्यापक सामाजिक बांधिलकी, जगण्याविषयीची शहाणीव, सामाजिक-आर्थिक विषमता निर्मूलनासाठी आग्रह, नैतिकता व बुद्धिमत्ता यांचा आपसमेळ आणि मानव व समतेची पूजा म्हणजेच धर्म याची जाणीवपेरणी करीत माणूसपणाचे अधोरेखन डॉ. थोरात त्यांच्या लेखनातून करतात. संविधानाप्रती अविचल निष्ठा आणि मानवतेविषयीचे चिंतन त्यांच्या लेखनातून अखंड पाझरते. त्यांच्या ठाम व भक्कम इतिहासदृष्टीचे प्रत्यंतर त्यातून येते.