July 27, 2024
Home » भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुले मोकळी । ( एकतरी ओवी अनुभवावी )
विश्वाचे आर्त

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुले मोकळी । ( एकतरी ओवी अनुभवावी )

मनाचे आरोग्य योग्य ठेवण्यासाठी असे दान गरजेचे आहे. बऱ्याचदा हेच नेमके घडत नाही. यामुळेच आत्महत्या, नैराश्य पदरी पडते. मनाचे आरोग्य राखायचे असेल तर तशी मानसिकता आपण निर्माण करायला हवी. मनाचा योग्य विकास करावाच लागेल.


- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुले मोकळी ।
अर्पिली अंध्रियुगुली । विश्वरुपाचा ।। 708 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – मी शुद्ध भावनारुप ओंजळीत ही ओव्यारुपी मोकळी फुले भरुन विश्वरुपाच्या दोन्ही पायांवर अर्पन केली ( असे ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात)

शुद्ध भावनेने दिलेले दान केव्हाही फलद्रुप होते. देणाऱ्याने प्रेमाने दिले तर घेणाऱ्यालाही त्याचा उचित लाभ होतो. देणाऱ्याची व घेणाऱ्याची भावना कशी आहे याला महत्त्व आहे. दान करताना आणि दान स्विकारताना या गोष्टीचा जरूर विचार करावा. देणारा प्रेमाने देत असेल तर त्याचा जरूर स्विकार करावा. तसे करणे हा धर्म आहे. यात देणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाही त्या गोष्टीपासून, त्या वस्तूपासून त्रास होत नाही. दान देताना मानसिकता कशी आहे याचा परिणाम दोघांवरही होतो. दान करताना कधीही लाभाचा विचार करून दान करू नये तसे केले तर आपल्यापदरी दुःखच भेटू शकते. कारण लाभ प्रत्येक गोष्टीतून होतोच असे नाही. फळाची अपेक्षा ठेऊन कोणतेही कर्म करू नये. हे यासाठीच सांगितले आहे.

मुळात आपण मात्र फळ मिळेल याच इच्छेपोटी कर्म करत असतो. त्या आशेने त्याकडे पाहात असतो. फळ मिळणार नसेल तर फारसा रसही त्यात आपणास वाटत नाही. फळ मिळाले नाही तर दुःखही होते. मग मदत कशासाठी करायची? आपणास काहीच लाभ होणार नाही मदत का करायची? असे वाटणे स्वाभाविक आहे. पण तसा विचार न करता मदत करायची कारण त्याचे दुःख वाटत नाही. मनाचा मोठेपणा त्यात असतो. अंतःकरणाची उदारता त्यात असते. अशा या दानाने मनाला सुख, समाधान भेटते. घेणाऱ्यानेही त्याचा योग्य उपयोग केला तर त्या सुखात आणखी मोठी भर पडते. दान सार्थकी लागल्याचे समाधान खूप मोठे असते. घेणाराही आपल्या मदतीला योग्यवेळी धावून येतो.

मनाचे आरोग्य योग्य ठेवण्यासाठी असे दान गरजेचे आहे. बऱ्याचदा हेच नेमके घडत नाही. यामुळेच आत्महत्या, नैराश्य पदरी पडते. मनाचे आरोग्य राखायचे असेल तर तशी मानसिकता आपण निर्माण करायला हवी. मनाचा योग्य विकास करावाच लागेल. सज्जन विचार मनाला नेहमीच उत्साही ठेवतात. उर्जा देत राहातात. विश्वरुप दर्शनाने अर्जुनाचे मन प्रसन्न झाले होते. भगवंताची खरी ओळख त्याला झाली होती. त्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. त्याच्या भगवंताच्याप्रती प्रेम उत्पन्न झाले होते. भक्ती उत्पन्न झाली होती. त्यामुळेच प्रसन्न भावनेने त्याने विश्वरुपाच्या त्या चरणांवर फुले वाहीली.

आपण देवळात जातो. तेव्हा हारवाले हार विकत असतात. हार विकत घेताना आपला भाव कसा असतो हे महत्त्वाचे आहे. हा हार काय कचऱ्यात जाणार मग काय इतका खर्च कशाला करायचा. त्यापेक्षा साधा हार घेऊ. फुले विकत घेताना आपली मानसिकता अशी असते. त्यापेक्षा फुले विकत न घेता शुद्ध अंतकरणाने नमस्कार केला तरी तो भगवंतास पोहोचतो. आपण दर्शन घेताना कोणत्या भावनेने घेतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे. जर अंतःकरण शुद्ध असेल तर ते भगवंताजवळ जरूर पोहोचते. त्याचा लाभ भगवंतासह भक्तालाही होतो. यासाठी दान देताना अंतःकरणातील भाव महत्त्वाचा आहे हे विचारात घ्यायला हवे व तसे आचरण ठेवायला हवे. अन्यथा त्यापेक्षा दान न दिलेलेच बरे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

हिवाळ्यासाठी सुपरफुड…

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

विलास कोळपे म्हणजे करुणेचा प्रवाह

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading