July 27, 2024
monsoon is out and winter is in forecast by Manikrao Khule
Home » संक्रांतीपासून मान्सून बाहेर व थंडी आत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संक्रांतीपासून मान्सून बाहेर व थंडी आत

दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक  तसेच पोंडिचेरी काराईकल मधील जवळपास गेले ७५ ते ८० दिवसापासूनपासून सुरु असलेला ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरून, तेथील हिवाळी पावसाचा हंगाम ह्या वर्षी १४ जानेवारीला आटोपला आहे. तसा हा मान्सून डिसेंबरमधेच निघून जावयास हवा. पण ह्या वर्षी उशीर होत आहे.तेथील मान्सून बाहेर पडला रे पडला कि महाराष्ट्रातही थंडीसाठी पूरकता वाढते. 

जानेवारी १४ पासून विषववृत्त दरम्यानचा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाब असलेले ‘आंतर-कटिबंधीय अभिसरणीय परीक्षेत्र ‘ (इंटर ट्रॉपिकल कॉनवर्जिंग झोन) विषववृत्तवरील (शून्य डिग्री अक्षवृत्त) त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडे म्हणजे १० डिग्री दक्षिण अक्षवृत्त (दक्षिण गोलार्धात)पर्यन्त सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रतही हवेच्या उच्चं दाबाच्या टेकड्यांना छेदून जाणारी काल्पनिक उंचावरील रेषा म्हणजे पोळ(‘ रिज ‘)ही दक्षिणे भारताकडेकडे सरकेल.
        
सरकलेल्या ‘पोळ'(‘ रिज ‘)मुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्चं दाबरुपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहींसी थंडी  वाढत आहे. येथे ‘ काहीसीच थंडीचा ‘ उल्लेख केला, कारण सध्याच्या अस्तित्वातील चालु ‘ एल-निनो’ च्या प्रभावामुळे,  एकापाठोपाठ पास होणारे प. झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे. त्यांच्या कमकुवतपणा तसेच दक्षिण अक्षवृत्तकडे म्हणजे देशात ज. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखण्डकडे घुसणारे ‘ सैबेरिअन अतिथंड हवेचे लोटा ‘अभावी काश्मीरमध्ये सध्या चालु असलेला ‘४० दिवसा(२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी)चा ‘ चालाई कलान ‘ च्या उच्चं थंडी व बर्फ पडणाऱ्या हंगामी कालावधीही बर्फबारी विना कोरडा जातांना जाणवत आहे.

एकूणच उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असे वाटते.
                  
निसर्ग कालक्रमणाप्रमाणे २२ डिसेंबर ह्या दिवशी पृथ्वीचे दक्षिण टोकाकडील साडे तेवीस दक्षिण अक्षवृत्ताचा म्हणजे पृथ्वीचा मकर वृत्तचा जास्तीत जास्त भाग हा सूर्यासमोर असतो आणि दक्षिण गोलार्धातील टोकाकडचा हा भाग १५ जानेवारी पर्यन्तचा(२२ डिसेंबर ते १५ जानेवारी) २५ दिवसाचा संक्रमण कालावधीत  मकर वृत्तावरच म्हणजे साडेतेवीस दक्षिण अक्षवृत्तवरच जाणवतो. ह्या महिन्याभराच्या कालावधीला कालावधीला ‘झुंझूरमास’ (धनुर्मास ) किंवा धुंधुर्मास किंवा शून्यमास ही म्हणतात. म्हणूनच थंडीपोषक असा शाकाहारी खाद्याचा खानपानात समावेश करूनही वेगळ्या पद्धतीने हा कालावधी साजरा केला जातो.
              सूर्याचा धनु राशीत प्रवेश होतो म्हणून झुंझूरमास’ बरोबर धनुर्मास ही म्हणतात.मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. म्हणून तर ह्या संक्रांतीला मकर संक्रांती संबोधले जाते.
            
पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड राज्ये त्यामानाने समुद्रसपाटीपासून त्यामानाने कमी उंचीवर तसेच सखल मैदानी भाग संरचनेमुळे येथील  बाधणाऱ्या अतिथंडीला व त्यातून उदभोवणाऱ्या त्रासिक जनजीवनाला ह्या कालावधीत लोकं वैतागलेली असतात. तेथे संक्रांतीनंतर तेथील जीवन थंडी कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवन सुसह्य होते. हा आनंद ‘ लोहोरी ‘ उत्सव म्हणून साजरा करतात. ‘शेकोटी’  किंवा ‘आगटी’  पेटवून कि ज्याला त्यांच्याकडे ‘ लोहोरी ‘ म्हणतात, त्या भोंवती एकत्र येऊन स्रिया -पुरुष नृत्य सादर करतात. तीळ, गूळ, नैवाद्य अग्नीला अर्पण करतात. बाधित होणाऱ्या थंडी पासून सुटका व आल्हाददायक, लाभदायी अश्या थंडीला सुरवात होते म्हणून हर्षउत्सवात अश्या थंडीचे स्वागत म्हणून ‘ लोहोरी ‘ साजरी करतात.

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची शेतात साजरी होणारी ‘ येळ ‘(वेळ) अमावस्या ह्याच कालावधीत येते. नवीन येणाऱ्या धान्यांची, अन्नाची पूजा केली जाते. शास्त्रीयदृष्ट्याही ह्या कालावधीला महत्व आहे. ह्या कालावधीतील  सकाळच्या वेळेस हवेत ऑक्सीजनचे प्रमाण अधिक तर ओझोनचा थर अतिशय शुद्ध असतो. म्हणून तर आहार- विहार जाणीवपूर्वक केला जातो. आणि त्या दिवसा नंतर म्हणजे मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग  हळूहळू सूर्यापासून दूर तर विषववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा  सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालु होते.

आता ह्या सततच्या नेहमीच्या कालचक्रानुसार वर स्पष्ट केल्याप्रमाणे, निसर्गनिर्मित घडामोडी बरोबरच, उत्तर ध्रुवावरील बर्फाळ, आर्टिक्ट, अतिथंड हवेचे उच्चं दाब अक्षवृत्त वर्तुळीय पट्टाही त्यामुळे दक्षिणेकडे म्हणजे रशियन अक्षवृत्तकडे सरकत असतो. त्यामुळे जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा राजस्थान कडे तेथील थंड हवाही भारताकडे लोटली जाते. परिणामी आपल्याकडे ज. काश्मीरमध्ये अतिथंडी व बर्फ पडते. पश्चिम झंजावातबरोबरच ह्या सैबेरिअन चिलच्या थंडी स्थलांतरामुळे अर्ध भारतात उत्तररेकडे थंडी वाढण्याचे हेही एक प्रमुख कारण असते.

म्हणून तर पंजाब, हरियाणा, राजस्थान राज्याच्या काही भागात सध्या सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अति नव्हे पण थंडीची लाट जाणवत आहे. सध्या आज ह्या भागात पहाटेचे किमान तापमान २ ते ५ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे.पहाटेचे हे किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ डिग्रीने तेथे कमी आहे. ह्याच पंजाब, हरियाणा, राजस्थान भागात समुद्रसपाटी पासून साडे बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २८० किमी असे वेगवान प्रवाही झोताचे ‘ पश्चिमी’ वारे पूर्वेकडे वाहत आहे. साहजिकच त्या खालील पातळीत असलेली थंडी दाबली गेल्यामुळे उत्तर भारतातील थंडी टिकून आहे. उत्तरेकडून ही थंड वारे महाराष्ट्रात घुसतात. म्हणून तर संक्रांती दरम्यान व नंतर आठवडाभर चांगल्या थंडीची अपेक्षा करू या !

पंजाब, हरियाणा राज्यात सकाळी, संध्याकाळी धुक्याच्या दाट चादरीत लपेटलेले आहे. त्यामुळे दृश्यमानता २५ ते ५० मीटरवर येऊन ठेपली आहे. तर पुढील ५ दिवसात काही भागात ‘ भू-स्फटी करणाचीही,’ शक्यताही नाकारता येत नाही.

सध्याचे पहाटेचे व दुपारचे, असे दोन्हीही  किमान व कमाल तापमाने ही अजुनही दरवर्षी ह्या कालावधीत जशी असावी तशी त्यांच्या सरासरी तापमानाच्या पातळीत नसून ती अधिकच आहे.
आणि खरं तर थंडी चाचपण्याच्या नादात आपणही चालु कालावधी हा ‘ एल- निनोचा ‘ आहे, हे  विसरत आहोत. आणि म्हणून तर आपण सहज उच्चारतो कि ‘ म्हणावी अशी एव्हढी काही थंडी नाहीये!
‘कशी असेल?                   

जागतिक पातळीवरील सध्य: वातावरणीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जी थंडी असावी तशी आहे. आणि थंडीच्या चर्चेला वाव उपलब्ध होतो आहे, हेच खुप आहे, हे ही ध्यानात घ्यावे, असे वाटते.
                   त्यातही, आता, आज व उद्या म्हणजे बुधवार-गुरुवारी (१७-१८ जानेवारी) ला विदर्भातील गोंदिया अन गडचिरोली  २ जिल्ह्यात तर पुन्हा काहीसे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून तेथील थंडी २ दिवसाकरिताच घालवली जाईल.

संक्रांतीदरम्यानच्या ह्या काळात थंडी जाणवणार असली तरी सध्या १७ ते २१ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात  महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड( सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक )  तर दुपारचे कमाल तापमान २८-३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी पेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक) दरम्यानचे असु शकते, असे वाटते. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातील शहरांत पहाटेचे हे किमान तापमान एकांकी संख्येवर आले आहेत.
           
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसुन रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही. ह्या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर ह्या कालावधीत पीकांच्या मुळान्ना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा व जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळाविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो, व तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे..

     


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नका रे फिरवू आदिवासींच्या पोटावर जेसीबी…

गोकर्ण (ओळख औषधी वनस्पतीची)

गावाकडच्या हृद्य आठवणी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading