अध्यात्माचा विकास कायम ठेवायचा असेल तर स्वःचे नित्य स्मरण ठेवायला हवे. स्वःवर अवधान ठेवायला हवे. आत्मज्ञानी झालो तरीही नित्य त्याची उपासना करायला हवी. तरच अध्यात्माच्या विकासाचा डोंगर कायम राखता येतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल 9011087406
तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित ।
सोऽहम भावे उपासित । ज्ञानिये जे ।। 32 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ ः ती वस्तु अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तु दाखवितां येण्याजोगी नाही व ती देशाने मर्यादित नाही. अशी आहे. अशा वस्तुची जे ज्ञानी ती वस्तु मी आहे अशा भावनेने उपासना करतात.
मी कोण आहे ? याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म आहे. स्वतःचा शोध घेणे यातच सर्व जीवनाचे आर्त सामावलेले आहे. स्वःचा शोध ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. स्वःची ओळख झाल्याशिवाय पुढच्या पायऱ्या चढता येणार नाहीत. कारण स्वःमध्ये पुढच्या पायऱ्यांची जोड आहे. पत्याचा बंगला उभा केला व खालच्या मजल्यावरील काही पत्ते काढले तर ठराविक क्षमतेपर्यंत हा बंगला उभा राहातो पण आणखी पत्ते काढण्याचा प्रयत्न केला तर तो कोसळतो. तसेच आहे. स्वःच्या ओळखीवरच पुढची पूर्ण इमारत उभी आहे. ती ओळख विसरलो तर पूर्ण उभी राहीलेली इमारत ढासळू शकते. यासाठी स्वचे स्मरण नित्य असायला हवे. तरच अध्यात्मात विकास साधता येतो. अध्यात्माचा विकास कायम ठेवायचा असेल तर स्वःचे नित्य स्मरण ठेवायला हवे. स्वःवर अवधान ठेवायला हवे. आत्मज्ञानी झालो तरीही नित्य त्याची उपासना करायला हवी. तरच अध्यात्माच्या विकासाचा डोंगर कायम राखता येतो.
स्वः तून आत्मज्ञानाचा विकास
स्वः हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, असे समजा. त्यातून आत येताना मिळालेल्या ओळख पत्रावरच किल्ल्यावर फिरता येते. चोर वाटेने येताना ओळखपत्र मिळत नाही. यामुळे किल्ल्यावर तुम्ही थोडाकाळ फिरु शकाल पण तेही लपतछपतच. ओळखपत्र असेल तर किल्ल्यावर निर्धास्थपणे फिरता येते. पकडले गेले तरी तुमच्याकडे ओळख असते. स्वःच्या ओळखीचा पास यासाठीच असायला हवा. मुख्य दरवाजातून मानाने येता येत असताना चोरवाटेने येण्याची काही गरज नाही. अध्यात्मात सुद्धा असेच आहे. स्वःची ओळख स्वःताच करून घ्यायची आहे. स्वःमध्येच असणारा तो त्याला ओळखायचे आहे. ही ओळख स्वःताच करून घ्यायची आहे. आडवाटेने न जाता सद्गुरुंच्या मार्गदर्शनाने त्यात प्रगती साधायची आहे. आत्मज्ञानी व्हायचे आहे. आत्मज्ञानाच्या सागरात मनसोक्त डुंबायचे आहे. त्यामध्ये बुडण्याची भिती नसते. कारण तुमच्याजवळ स्वःच्या ओळखीचे जॅकेट असते.
स्वः ची ओळख
स्वः म्हणजे सोहम. स्वः म्हणजे ब्रह्म, स्वः म्हणचे स्वतःचा श्वास, स्वः म्हणजे आत्मा. मी आत्मा आहे. मी ब्रह्म आहे. याची ओळख करून घेणे म्हणजे स्वतःची ओळख. हा आत्मा सर्वामध्ये आहे. हे जाणणे तसे आचरण ठेवणे हा स्वधर्म आहे. सोऽहम सोऽहम हा स्वर आपण श्वास आत घेतो व आपण श्वास बाहेर सोडतो यावेळी जो स्वर येतो तो आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे, त्यावर लक्ष केंद्रित करणे, त्यांची ओळख कायम ठेवणे म्हणजेच स्वःला जाणणे स्वःची ओळख करुन घेणे असे आहे. यासाठीच सोऽहमची उपासना आहे. ज्ञानी व्यक्ती या उपासनेतूनच आत्मज्ञानाचे लाभार्थी होतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.