July 27, 2024
Conselling Need of Todays Community Sunetra Joshi article
Home » समुपदेशन काळाची गरज…
मुक्त संवाद

समुपदेशन काळाची गरज…

मनावरचा ताण वाढवून तब्येत खराब करून घेण्यापेक्षा समुपदेशकाकडे जाणेच इष्ट. ते आपल्याला शास्त्रीय दृष्टीकोनातून समजावून सांगतात. आणि म्हणून ती पटते सुध्दा. तेव्हा न लाजता काही वेळा हवा तिथे समुपदेशकाची सल्ला जरूर घ्यावा. शेवटी ताणरहीत आयुष्यावर सगळ्यांचा हक्क आहे.

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

कर्म करणे जाणते मी दैव आहे मानते मी… प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेला कर्मयोग. खरे तर इतकी साधी गोष्ट जर आपण स्विकारली तर कुठल्याही गोष्टीचा मनावर ताण येणार नाही. पण हे लिहायला जितके सोपे आहे तेवढेच आचरणात आणणे कठीण आहे. काळाची पावले ओळखून चालणे कधीही चांगलेच.

आज समुपदेशन ही गरज झाली आहे हे खरे. पण त्या मागची कारणे मात्र आपण जाणून घेत नाही. आणि शोधायचा प्रयत्न पण करत नाही. जसे उपचारापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी असते. काळजी घेऊनही काही झाले तर डाॅक्टर असतातच की मदतीला.. पुर्वी एकत्र कुटूंब पध्दती असल्याने घरात खूप माणसे असायची. जावा जावा… नणंद भावजय तसेच इतर काका काकू आत्या वगैरे मंडळी. मोठी छोटी आणि समवयस्क सुद्धा. त्यामुळे काही प्रसंग घडलाच तरी मनावर ताण यायचा नाही. घरातली मंडळी ठामपणे पाठीशी उभी असायची. तेव्हा आई वडीलांच्या माघारी बहीण भावांचे शिक्षण लग्न वगैरे समर्थपणे करणारे बुजुर्ग लोक आजही आपल्या आसपास किंवा नात्यात आहेत.. कुणाबद्दल मनात शंका नसायची. शिवाय आते मामे भावंडात पण सलोखा होता.

मनातल्या सगळ्या गोष्टी बोलता यायच्या. शिवाय तेव्हा लोक आस्तिक होते. देवाला सांगून मोकळे व्हायचे. आणि तोच यातून मार्ग काढेल असा विश्वास असायचा. आणि त्याच श्रद्धेच्या जोरावर खरेच काही समस्या संपुष्टात यायच्या पण. पण आता तसे नाही. प्रत्येक गोष्ट आपण सगळ्या जवळ नाही बोलत. वाईट किंवा अनैतिक असे नाही पण असतात काही गोष्टी की ज्या बोलण्यासाठी विश्वास लागतो. घरातच अनेक बहिण भाऊ असायचे बाहेरच्या मित्र मैत्रिणींची कधी मन मोकळे करण्यासाठी गरज भासली नाही. पण आज परिस्थिती बदलली आहे. पती पत्नी आणि एक किंवा दोन मुले एवढेच कुटूंब झालेय. क्वचित आजी आजोबा असतात. पण बरेचदा त्यांना आताचे काही कळत नाही असा समज किंवा गैरसमज म्हणा पण त्यांचा सल्ला घेतल्या जात नाही.. बाहेरचे तर सगळे परके आणि त्यात कुणाचे गृहछिद्र दिसले तर भगदाड करणारे. भावंड नोकरीधंदा म्हणून दूर. प्रत्येक जण आपण किती आनंदी आणि सुखी आहोत हे दाखवण्यात मग्न. शेजारी आणि सहकारी जणू स्पर्धक. प्रत्येक वेळी आपल्याला हवे तसेच घडायला हवे ही वृत्ती तसेच थोडेही नुकसान सहन करण्याची तयारी नसते. बोलणार कुणाजवळ ही मनातली सर्वात मोठी समस्या.

इथे मग समुपदेशकाची गरज निर्माण झाली. मानसशास्त्र शिकलेले असे तज्ञ यावर मार्गदर्शन करतात. कारण मनावर ताण येतो त्याचा शरीरावर सुध्दा परिणाम होतोच. मग ही तज्ञ मंडळी त्यावर इलाज करतात. प्रत्येक व्यक्तिचे मानसशास्त्र वेगळे असते. प्रत्येकाचा स्वभाव घरातली तसेच आजुबाजुची परिस्थिती वेगळी असते. खरे तर बरेच प्रश्न बोलून सुटतात. पण आपल्याला जसे सर्दी झाल्यावर घरातला काढा पिऊन बरे होण्यापेक्षा डाॅक्टरकडे जाऊन औषध आणून घेतल्यावर बरे वाटते. तसेच काहीसे होते. शिवाय घरातल्या कुणाला सांगितले तर ती गोष्ट लगेच षटकर्णी होण्याची भिती असते तसे समुपदेशकाबद्दल नसते. तो आपली केस गुप्त ठेवतो. वकील किंवा डाॅक्टर यांच्या बद्दल विश्वास वाटतो. खरे तर काही गोष्टी दैवावर सोडून द्याव्यात. .उगाच मनावरचा ताण वाढवून तब्येत खराब करून घेण्यापेक्षा समुपदेशकाकडे जाणेच इष्ट. ते आपल्याला शास्त्रीय दृष्टीकोनातून समजावून सांगतात. आणि म्हणून ती पटते सुध्दा. तेव्हा न लाजता काही वेळा हवा तिथे समुपदेशकाची सल्ला जरूर घ्यावा. शेवटी ताणरहीत आयुष्यावर सगळ्यांचा हक्क आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

हिमालयातील अतिउंचावरच्या गावावर हवामान बदलाचा झालेला परिणाम दाखवणारा चित्रपट

संसाराचा गाडा…

कडाक्याच्या थंडीत रोमॅन्टिक गाण्याच्या चित्रिकरणाचा अभिनय सावंतने सांगितलेला अनुभव

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading