September 25, 2023
Home » पेडगावचा शहाणा ही म्हण कशावरून पडली माहिती आहे का?
मुक्त संवाद

पेडगावचा शहाणा ही म्हण कशावरून पडली माहिती आहे का?

१५ जुलै १६७४ या दिवशी जगाच्या इतिहासात कधीच घडले नव्हते, अशी अनोखी लढाई पार पडून स्वराज्याला खूप मोठा आर्थिक फायदा झाला. पेडगाव येथे बहादूरगडावर असलेला मोगलांचा सरदार बहादुरखान याला लहान लेकरांसारखे खेळवून मराठ्यांनी 1 कोटी नगद आणि दोनशे अरबी घोडी लंपास केली. 

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतः राज्याभिषेक करवून घेतला. त्यासमयी मोगलांचे दोन सरदार दिलेरखान आणि बहादुरखान हे मोगल साम्राज्याचे संरक्षण करत होते. यावेळी काही कारणास्तव औरंगाजेब याने दिलेरखान यास उत्तरेकडे बोलावून घेतले. त्यामुळे एकट्या बहादुरखानावर दक्षिणेतील जबाबदारी पडली होती. बहादुरखान हा पेड़गाव येथे छावणी टाकून स्वस्थपणे चैन करत होता. आणि महाराजांना ही संधी मिळाली व राज्याभिषेकानंतर काही दिवसातच मराठ्यांनी पेड़गावी बहादुरखानाच्या छावणीवर हल्ला केला. बहादूरखान असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली. राजाभिषेकानंतर पुन्हा एकदा मराठ्यान्नी मुघल भागात छापे मारून लुट मिळवणे सुरु केले. पेडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुघल फौज होती. मात्र मराठ्यान्नी त्यांना मुर्ख बनवून लुट मिळवली. काही हजारांचे सैन्य आधी पेड़गाववर चालून गेले आणि जेंव्हा मुघल फौज समोर उभी ठाकली तेंव्हा मात्र मराठे मागे फिरून पळू लागले. मुघल फौजेला वाटले मराठे घाबरुन मागे पळत आहेत. मात्र डाव वेगळाच होता.

ज्याक्षणी मुघल फौज मराठा सैन्याचा पाठलाग करत-करत पेड्गावच्या हद्दीपासून दूर गेली त्याक्षणी दुरवर लपून बसलेल्या इतर मराठा फौजेने पेड़गावमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण पेड़गाव लुटले. अर्थात मुघल फौजेला जेंव्हा  हे समजले त्यावेळी ते मागे फिरले. मात्र मराठा सैन्याने तोपर्यंत आपले काम चोख केले होते. ह्यालुटीने राजाभिषेकाचा बराचसा खर्च शिवरायांनी भरून काढला. मराठ्यांनी बहादुरखानाच्या पेड़गाव येथील छावणीवर हल्ला केलेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १५ जुलै १६७४ या दिवशी जगाच्या इतिहासात कधीच घडले नव्हते, अशी अनोखी लढाई पार पडून स्वराज्याला खूप मोठा आर्थिक फायदा झाला. पेडगाव येथे बहादूरगडावर असलेला मोगलांचा सरदार बहादुरखान याला लहान लेकरांसारखे खेळवून मराठ्यांनी 1 कोटी नगद आणि दोनशे अरबी घोडी लंपास केली.               

बहादुरगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील एका मार्गावर 7000 फौज आणि दुसऱ्या मार्गावर 2000 फौज हजार ठेवली. 7000 फौजेने गडाच्या दिशेने मुद्दाम जोरजोरात आवाज करत यायला सुरुवात केली. जणूकाही आम्ही युद्ध करणार आहोत असे मराठी फौज बहादुरखानाला दाखवत होते. ते पाहून बहादूरखानाने गडावरील अख्खी 35000  फौज मैदानात उतरवली.         

मराठी फौजेचा पहिला हेतू आता साध्य झाला होता. ठरल्याप्रमाणे मराठी फौजेने जणू आपण घाबरले आहोत असे दाखवायला सुरुवात केली. आणि आल्या दिशेने पळत सुटले. हे बघताच मोगलांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करत करत मोगल कात्रज पर्यंत येऊन पोहोचले.आणि विशेष म्हणजे आता त्या बहादूरगडावर एक शिपाई  सोडला तर कोणीच नव्हते.          

दुसऱ्या वाटेवर असलेली 2000 फौज गडावर पोहोचली आणि गडावरचा एक कोटी नगद आणि 200 अरबी घोडी असा माल ताब्यात घेतला. बहादुरखानाची फौज परत गडावर आली तेव्हा आगीच्या लोळात जळणारा किल्ला आणि एक सुजवलेला सैनिक सोडून काहीही दिसले नाही. रक्ताचा एकही थेंब न सांडता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही अनोखी लढाई झाली. बहादूरीशी काडीमात्र संबंध नसलेला बहादूरखान अतिशहाणा( मूर्ख ) ठरला. हा किल्ला ( दौंडपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे  ) पेडगाव इथे असल्यामुळे आपल्यामधे म्हण प्रचलित झाली.  ” पेडगावचा शहाणा” 

– डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर 

Related posts

झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून

पडशीची वारी…

वर्हाडी बोल

Leave a Comment