मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्या परिसरातून, समाजातून आपण अनुभव घेत असतो. चांगल्या साहित्य निर्मितीसाठी शोधकदृष्टी सोबतच खूप खूप वाचा. शब्दसंग्रह वाढवा. चांगले लिहा. चांगला माणूस बना.

डॉ. संगीता बर्वे

आज मुलांना अनेक सुविधांमुळे चांगले गुण मिळत असले तरी मुले मनाने रिती झाली आहेत. हे रितेपण दूर होऊन मुलांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी सकस बालसाहित्याची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन कवी सुभाष कवडे यांनी केले. ते देशिंग- हरोली येथे अभिव्यक्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या चौथ्या अभिव्यक्ती बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

कवडे पुढे म्हणाले, मुलांनी वाचनाचा ध्यास घ्यावा. वाचनाने मुलांचा आत्मकेंद्रितपणा, निराशावाद निघून जाईल. पुस्तके मुलांची जिज्ञासा पूर्ण करतात. लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणे म्हणजे प्रभूशी नाते जोडण्यासारखे आहे. या सानेगुरुजींच्या भूमिकेचा विचार करण्याची आज खरी गरज आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.संगीता बर्वे होत्या.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अनुभव कथन करुन चांगल्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी शोधकवृत्ती विकसित केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

संमेलनामध्ये विद्यार्थ्यांचे बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. कविसंमेलनाध्यक्ष कु.अस्मिता चव्हाण होत्या. कविसंमेलनामध्ये जिल्ह्यातील निमंत्रीत बालकवींनी सहभाग घेतला. यामध्ये तन्मय बेडगे, ऋतुजा चव्हाण, वेदिका खांडेकर, राजवर्धन पाटील, पूजा डुबुले, पूजा,कलढोणे, सृष्टी कुलकर्णी, आर्या पाटील, श्रुती काकडे, आरती कदम, कल्याणी जोशी, सानिका माने, जोत्स्ना सदामते, कल्याणी कलढोणे, अनुजा ओमासे, वैष्णवी घोरपडे व मधुरा जगताप यांनी कवितावाचन केले. सूत्रसंचालन उदयनराणा पाटील, गौरवी निकम, अनया पाटील, राजवर्धन पाटील, माहेश्वरी देसाई, श्लोक चव्हाण, सिद्धी पाटील व आर्या पाटील यांनी केले .

प्रास्तविक कवयित्री मनीषा पाटील यांनी केले. आभार आर्या पाटील यांनी मानले. नियोजन राहुल निकम, सीमा निकम, प्रा.सर्जेराव पाटील व अॕड.पृथ्वीराज पाटील, मनीषा पाटील यांनी केले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *