संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून होत आहेत. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते संस्कार व्हायला हवेत याचे भान ठेवायला हवे. कानाला चांगले ऐकण्याची सवय यासाठी लावायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
देखे हे शब्दाची व्याप्तिं । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।।114 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – पाहा की, निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वारानें जसें निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दाने सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात.
नेहमी चांगल्याच्या संगतीत असावे हा संस्कार आपणावर लहानपणापासून केला जातो. आपली मुले बिघडू नयेत. हा त्या मागचा उद्देश असतो. वाईट संगती पटकन आत्मसात केल्या जातात. पण चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात होत नाहीत. चांगल्या संगतीत राहिले की चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगले विचार मनात उत्पन्न होतात. चांगल्या कृती हातून घडतात. त्या विचारांची मग मनाला सवय होते. मन भरकटत नाही.
एखाद्याला तंबाखू खाण्याचे व्यसन असेल. तर तो नेहमी तंबाखू खाणाऱ्यांशी संगत करतो. त्याच्या सहवासात, मैत्रीत त्याच व्यक्ती असतात. त्यांची बैठकही एकत्र असते. या बैठकीत एखादा तंबाखू न खाणारा गेला तर त्यालाही तंबाखू खाण्याची सवय लागू शकते. बहुंताशी असेच घडते. आपल्या आसपासच्या विचारांचा आपल्यावर सातत्याने प्रभाव होत असतो.
नव्यापिढीस सहसा विचार पटताना दिसत नाही. सातत्याने नवे शोध लागत आहेत. बाजारात सातत्याने नवनवीन उपकरणे, गेम्स येत आहेत. संगणकाच्या युगात, मोबाईलच्या जगात आज मनाला खिळवून ठेवणारी अनेक साधणे उपलब्ध आहेत. मन अशा गोष्टीतच गढून गेले आहे. मनमोकळे करायला दोन दिवस परगावी फिरायला गेले तरी प्रवासात ही साधनेच हातात असतात. इतकी त्याची सवय आपणास झाली आहे. निसर्गातील सौंदर्य पाहून मन प्रसन्न करण्याचे भानही त्यांना नसते.
मनाला प्रसन्न करणारे खेळ आता या इलेक्ट्रॉनिकच्या जगात उपलब्ध झाले आहेत. इतके खेळ आले आहेत की ते नुसते पाहायचे म्हटले तरी तितका वेळ पुरेसा होत नाही. तास-न-तास आपण त्यात वेळ वाया घालवत आहोत याचे भानही या नव्यापिढीला नसते. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदावर ही पिढी प्रगती करत आहे. विकास करत आहे. पण हा विकास कधीही, कोणत्याहीक्षणी जीवन संपवू शकतो. याचे भान त्यांनी ठेवायला हवे. या नव्या उपकरणांचा योग्य वापर करण्याची सद्बुद्धी जागरूक राहायला हवी.
काही छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून, मारामाऱ्या हे याचमुळे घडत आहेत. कारण संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून होत आहेत. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते संस्कार व्हायला हवेत याचे भान ठेवायला हवे. कानाला चांगले ऐकण्याची सवय यासाठी लावायला हवी.
आध्यात्मिक प्रगतीसाठीही हाच नियम आहे. कानाला सोऽहमचा नाद ऐकण्याची सवय हवी. हा स्वर आपल्या मनावर अनेक चांगले संस्कार करतो. मनाची स्थिरता ठेवतो. सातत्याने हा स्वर ऐकला तर मनाचा संयम वाढतो. एकाग्रता वाढवतो. सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी याची गरज आहे. कानाला सतत निंदा ऐकावी लागल्यास मनात क्रोध उत्पन्न होतो व स्तुती ऐकायला मिळाली तर अंतःकरणात लोभ उत्पन्न होतो. यासाठी कानाला कोणता स्वर ऐकायची सवय लावायची हे ज्याचे त्याने ठरवावे व यातून स्वतःची प्रगती साधावी.