औरंगाबाद – मराठवाड्यामध्ये यंदाच्यावर्षी सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण जास्त राहील्याने येथील भूजलात वाढ झाल्याची माहिती येथील भूजल पाहाणी विभागाने सांगितले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यात यंदा पावसामुळे अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण कुपनलिकातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा फायदा निश्चितच रब्बी पिकांना होणार आहे.
भूजल पाहाणी विभागाच्या माहितीनुसार परिसरातील कुपनलिकामध्ये 2.79 मिटरने भुजल पातळी वाढली आहे. विभागाने सप्टेंबर महिन्यात आठ जिल्ह्यातील सुमारे 875 विहिरींची पाहाणी केली. यात लातुर जिल्ह्यात भूजल पातळी सर्वाधिक वाढल्याचे आढळले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पूर नियंत्रणासाठी मांजरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने हा परिणाम झाला आहे.
लातूर जिल्ह्यात भूजल पातळीत 4.37 मिटरची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्या खालोखाल परभणी जिल्ह्यात 3.94 मिटर आणि हिंगोली जिल्ह्यात 1.16 मीटरने भूजल पातळी वाढलेली आहे.
मराठवाड्यात २१ ऑक्टोंबरपर्यंत सरासरी 1112.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या कालावधीत सरासरी 679.5 मिमी पाऊस होतो. नांदेडमध्ये यंदाच्यावर्षी सर्वाधिक सरासरी 1230.3 मिमी पाऊस झाला. येथे सरासरी 814.4 मिमी पाऊस अपेक्षित असतो.