fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 23, 2026
Home » ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे
विश्वाचे आर्त

ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे

necessary to have the identity of ignorance article by Rajendra Ghorpade

आकाशगंगेत अनेक ग्रह, तारे आहेत. या सर्वांच्या ठिकाणी पाणी कोठे आहे का याचा शोध घेतला जात आहे. पण पाणी कोठेच असल्याचे पाहायला मिळत नाही. यामुळे पृथ्वी व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही जीवसृष्टी नाही. पृथ्वी व्यतिरिक्त सर्वत्र निर्जीव असे हे विश्व आहे. समुद्र आहे म्हणून आपण आहोत हे विचारात घ्यायला हवे अन्यथा पृथ्वीचीही अवस्था या ग्रहांसारखीच असती.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पै आटोनि गेलिया सागरु । मग तरंतु ना नीरू ।
तया ऐशी अनाकारू । जे दशा गा ।। ५०६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणी नाही. त्यासारखी जी आकारहित अवस्था आहे.

ज्ञानेश्वर माऊलीने येथे समुद्रच आटल्याचे उदाहरण दिले आहे. हे कसे शक्य आहे ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पृथ्वीवर २९ टक्के जमीन आणि ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. इतका हा विस्तृत समुद्र आटू कसा शकेल ? अन् समुद्र आटल्यावर काय होईल ? या गोष्टीची कल्पनाही करवत नाही. एकवेळ नदी आटते, ओढे, नाले, झरे आटतात. हे आपण मान्य करू शकतो. कारण पाण्याचे हे स्त्रोत आपण अनुभवले आहेत. नदी कोरडी पडल्याचे आपण पाहीलेले आहे. त्यामुळे नदी आटते हे मान्य होऊ शकते. पण समुद्र आटल्याचे आपण स्वप्नातही कधी पाहू शकत नाही. पण ज्ञानेश्वर माऊलीने येथे समुद्र आटल्याची कल्पना केली आहे. ज्या गोष्टीची कल्पनाही आपण कधी करू शकत नाही. तसा विचारही आपल्या मनात कधी उत्पन्न होऊ शकत नाही. इतकी अशक्यप्राय गोष्ट ज्ञानेश्वर माऊलीने येथे का सांगितली असेल ? माऊलीला यातून काय समजावून सांगायचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे. माऊलीने अज्ञानी, अक्षर पुरुषाची ओळख करून देताना हे उदाहरण दिले आहे. हा अज्ञानी, अक्षर पुरुष कसा आहे ? ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही असा हा पुरुष आहे. इतके अज्ञान त्याच्यामध्ये भरलेले आहे.

समुद्र आटला तर काय होईल ? पृथ्वीवरील जीवसृष्टी राहू शकेल का ? पाऊस हा समुद्रामुळे पडतो. समुद्रातील पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते अन् त्याला थंड हवा लागली की त्याचे पाणी होऊन ते बरसते. पाऊस असा पडतो. मग समुद्र आटल्यावर पाऊस कसा पडणार ? मग आपणाला शुद्ध पाणीही कसे मिळणार ? सर्व जीवसृष्टीचा प्राण यात आहे. ते नसेल तर सर्व निर्जीव आहे. समुद्रात पाणीच नाही तर मग लाट तरी कशा पासून निर्माण होणार ? समुद्र आटल्यावर लाटा सुद्धा नसणार. अशी जी आकाररहीत अवस्था आहे. ती अवस्था अक्षर पुरुषाची आहे.

ओसाड, विरान असे जे भयानक वाळवंट पाणी नसल्याने आहे. ती अवस्था या अक्षर पुरुषाची आहे. या आकाशगंगेत अनेक ग्रह, तारे आहेत. या सर्वांच्या ठिकाणी पाणी कोठे आहे का याचा शोध घेतला जात आहे. पण पाणी कोठेच असल्याचे पाहायला मिळत नाही. यामुळे पृथ्वी व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही जीवसृष्टी नाही. पृथ्वी व्यतिरिक्त सर्वत्र निर्जीव असे हे विश्व आहे. समुद्र आहे म्हणून आपण आहोत हे विचारात घ्यायला हवे. अन्यथा पृथ्वीचीही अवस्था या ग्रहांसारखीच असती. अशी या ग्रहांसारखी अवस्था या अक्षर पुरुषाची, अज्ञानी पुरुषाची आहे.

ज्ञानच या अक्षर पुरुषाचे अज्ञान दुर केले जाऊ शकते. यासाठी ज्ञानाच्या दृष्टीने याकडे पाहायला हवे. पाण्याचा स्त्रोत असेल तरच जीवसृष्टी पाहायला मिळेल. यासाठी पाण्याचे महत्त्व ओळखून आपण आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा. पृथ्वी वाचवायची असेल, टिकवून ठेवायची असेल तर पाण्याची शुद्धताही आपण टिकवायला हवी. ज्ञानाने स्व ची ओळख करून घेऊन स्वतः बद्दलचे अज्ञान दुर करायला हवे. यासाठी अक्षर पुरुषाची, आपल्याजवळ असलेल्या अज्ञानाची ओळख करून घेऊन ज्ञानाने ते नष्ट करायला हवे. ज्ञानी होण्यासाठी प्रथम अज्ञान समजुन घ्यायला हवे, याची ओळख करून घेणे गरजेचे आहे हे जाणायला हवे.

Related posts

सकारात्मक विचारांची उभारू गुढी

आव्हान स्वीकारून दूर करा ज्ञानाच्या मार्गातील अडथळे

कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!