निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून हे साहित्य पुरस्कार देण्यात येतात.
महाराष्ट्राच्या गावागावात संतसाहित्य वाचले जाते. संतसाहित्याचे मूळ भगवद् गीताच आहे. ओवी, अंभग, गवळण, पदे यातून त्यांनी आपले विचार समाजाला दिले. संतसाहित्याची लोकाभिमुखता, रसाळ भाषा आणि कवित्वातून परतत्त्वाचा स्पर्श होतो, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या संत वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ देखणे म्हणाले, महाराष्ट्रात राजसत्ता नव्हती. परकीयांकडून होणारे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचाराने समाज पोखरला असताना चैतन्य हरविले असताना त्या समाजास आत्मनिर्भरता देण्यासाठी संत चळवळ उभी राहिली. देशभाषेची प्रतिष्ठा जपण्यासाठी भक्तिपंथाचा उदय झाला होता.
यावेळी मेधा कुलकर्णी, स्नेहल तावरे, चंद्रकांत पोतदार, ज्योती रहाळकर यांनी मनोगते व्यक्त केली. सुधीर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे प्रमुख जतीनभाई कार्या, यशवंत लिमये, परीक्षक डॉ कल्पना काशिद उपस्थित होते.
चिंतनपर, विवेचनपर प्रकारामध्ये पहिला पुरस्कार स्नेहवर्धन प्रकाशनाच्या सद्गुरू अच्युताश्रम स्वामी कृत अभंगगाथा या डॉ. मेघा इंद्रकांतराव गोसावी (बीड) यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. सात हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर द्वितीय क्रमांक मधुश्री प्रकाशनाच्या श्री नाथ भागवत या गोविंद दत्तात्रेय खिरे (पुणे) व मंदाकिनी खिरे (पुणे) यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
संत जीवन ललित वाङ्मय प्रकारामध्ये प्रकाशक चंद्रकांत जोशी (अहमदनगर) यांच्या तर्फे प्रकाशित सृजनगंध या डॉ. चंद्रकांत पोतदार (कोल्हापूर) यांच्या पुस्तकास प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार चपराक प्रकाशनाच्या महाराष्ट्राचे विचारदुर्ग या रमेश मच्छिंद्र वाघ (अहमदनगर) यांच्या पुस्तकास जाहीर झाला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वेदान्तश्री: प्रकाशनाच्या ओळख वेदांची या प्रा. डॉ. शरद कुळकर्णी (अकोला) यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
विशेष पुरस्काराममध्ये ज्ञानज्योती…ओवी पुन्हा नव्यानी या डॉ. ज्योती जयेश रहाळकर (पुणे) यांच्या पुस्तकाचा तसेच दशग्रीव रावण एकादशमुखी हनुमान भाग – १ व चिरंजीव अंजनीसुत हनुमान व रामायण भाग-२ या डॉ. दिलीप मेघ:श्याम साठे यांच्या पुस्तकाचा व जो संती वसविला ठावो या शिरीष शांताराम कवडे (पुणे) यांच्या पुस्तकाचा समावेश आहे. अडीच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.