बलवडी येथे ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
आळसंद : साहित्याची चळवळ लिहिणाऱ्या पुरती मर्यादीत नसते. प्रत्येकाला लिहिते व्हा ही प्रेरणा देत असते. ग्रामीण साहित्याचा हा प्रवाह बनला आहे. मुंबई , पुण्याची मक्तेदारी राहिली नाही. साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले साहित्यिक ग्रामीण मधूनच आलेले आहेत, असे मत संमेलनाध्यक्ष विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
बलवडी भा. ता. ( खानापूर ) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्या वतीने ३०व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील डॉ. रामचंद्र देखणे विचार मंचावरुन संमेलनाध्यक्ष श्री. चोरमारे बोलत होते . पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, स्वागताध्यक्ष धर्मेंद्र पवार, गटविकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील, सरपंच शालन कुंभार, कवयत्री स्वाती शिंदे – पवार प्रमुख उपस्थित होते.
चोरमारे म्हणाले, साहित्याचे पर्यावरण व्यापक बनलं पाहिजे. वाचक नाही तिथं पर्यंत साहित्य पोहचलं पाहिजे. भविष्यात भविष्य चांगलं नाही. वाचलं तर माणसं मोठी झाली. वाचन चळवळ महत्वाची ती वाढवायला हवी.
चोरमारे म्हणाले, ग्रामीण भागात होत असलेल्या साहित्य संमेलन ही लिहिते व्हा असा संदेश देत आहेत. ग्रामीण हा आजपासून शब्द लिहिणं बंद केले पाहिजे साहित्याचा केंद्रबिंदू हा शहराकडून गावाकडे येत आहे. ग्रामीण संकल्पनेतून साहित्य मंडळानी बाहेर पडले पाहिजे वाचना शिवाय माणसं घडत नाहीत. लेखक तयार होण्यासाठी कार्यशाळा सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील होत असलेले साहित्य ही मराठी भाषा संवर्धन करण्याचे काम करते. संमेलनातून पुरोगामी विचार जतन करावेत. खानापूर , आटपाडी , सांगोला ही दुष्काळी तालुके असले तरी साहित्य आणि साहित्य कृतीचा सुकाळ आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
प्रारंभी डॉ. देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाहीर बजरंग आंबी, मानसिंग जाधव, शारदा साळुंखे, ऋषीकेश तांबडे, सिकंदर मोमीन, सदानंद कदम, रमजान मुल्ला, भुपाल पाटील यांचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. प्रारंभी दीपक पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सतिश लोखंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
लिहित्या हाताना बळ देण्याचे काम ग्रामीण साहित्य संमेलनेच करीत असतात. साहित्य सेवेचा वारसा जतन करीत साहित्य संमेलनात नवे लेखक घडतात. लेखक व वाचक यांच्यामध्ये अशी साहित्य संमेलने वाचक चळवळ रुजवत समाज घडवत आहेत.
डाॅ. श्रीकांत पाटील
हसीना मुल्ला व प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. संतोष जाधव यांनी आभार मानले. सयाजीराव जाधव शांतीनाथ मांगले, सुरेश चव्हाण, अमीर सय्यद , अमोल दुपटे , दीपक सुर्यवंशी, अनिल दुपटे यांनी संयोजन केले. दुपाऱ्याच्या सत्रात जयवंत आवटे यांनी ‘गावगाडा ‘ ही कथा सादर केली.
यावेळी संपतराव पवार, यशवंत पवार, हिम्मत पाटील, देवकुमार दुपटे, विनोद कांबळे, पद्माकर यादव, टी.के.पवार, शामराव पवार, प्रताप जाधव, प्रदीप पवार , संग्राम जाधव, अमोल दुपटे , तुकाराम पवार, पायल पवार , कुसुम सावंत , शोभा पवार , सुरेखा जाधव, सारिका जाधव, बबनराव जाधव , जैतुनबी मुलाणी, वैशाली कुंभार, पुष्पा पवार, नानासाहेब साळुंखे , हिम्मत मलमे, राजू राजे , सुधीर कदम , लता ऐवळे – कदम , दीपक कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/iyemarathichiyenagari.com/wp-content/uploads/2022/12/Rural-Marathi-Literature-Samhelan-in-Balvadi-2.jpg?resize=1024%2C577&ssl=1)
शाहिरांच्या कवनांनी रसिक मंत्रमुग्ध
साहित्य संमेलनाच्या प्रारंभी शाहिर बजरंग आंबी यांनी शाहिर बाळकृष्ण बलवडीकर यांच्या आठवणींना शाहिरी कवांनांनी उजाळा दिला. बालशाहिर अमोघराज याने ‘गर्जा जय जय जय महाराष्ट्र माझा ‘ हे महाराष्ट्र गीत सादर केले. श्रोत्यांबरोबरच पाहुण्यांचेही लक्ष बालशाहिरांनी वेधून घेतले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.