नागपूर : छायाचित्रकार प्रसिद्ध व्यक्तींना नेहमी टिपत असतात, मात्र सर्वसामान्यांचे जीवन तितक्या क्षमतेने टिपले जात नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रातील दोन लोकपरंपरा वारी आणि तमाशा यांच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन टिपण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने भंडारे यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भ साहित्य संकुलातील अमेय दालनात लेखक समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे आणि कवी प्रफुल शिल्लेदार यांनी संदेश भंडारे यांची मुलाखत घेतली. यावेळी भंडारे म्हणाले, प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांच्या छायाचित्रातून प्रेरणा घेत छायाचित्र विश्वात प्रवेश केला. छायाचित्र काढताना विचारांची परंपरा चोवीस तास सुरू राहते. वारी आणि तमाशाने मराठी माणसाचा उदारमतवादी विचार जगासमोर आणला. तमाशात बहुतांश भटके आणि दलित समाजातील कलाकार असतात. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही योग्य नाही. तमाशाच्या माध्यमातून ते अभिव्यक्त होतात आणि मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधनही करतात. सिनेमाने तमाशा कलेचे शोषण केले आहे. सिनेमात तमाशाचे चुकीचे वर्णन केल्याने समाजात तमाशाबाबत गैरसमज प्रस्थापित झाले, असेही भंडारे म्हणाले.
तमाशातील कलाकारांना समान वाटा हे विदर्भाचे वैशिष्ट्य विदर्भात तमाशाच्या माध्यमातून केवळ पुराणातील कथा सांगितल्या नाहीत. आंबेडकरी विचारांच्या प्रभावामुळे तमाशात परिवर्तन झाले. अनेक महिला शाहीर तमाशाचा भाग झाल्या आहेत. तमाशातून नवे विचार समाजाला दिले जात आहेत. तमाशातील कलाकारांना समान वाटा मिळणे हे ही विदर्भाचे वैशिष्ट्य आहे. आंबेडकरी विचारांमुळेच हे परिवर्तन शक्य झाले.
संदेश भंडारे, छायाचित्रकार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.