July 27, 2024
Seminar On Pipilika Muktidham Nover by Muktasrujan Aurangabad
Home » पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील
काय चाललयं अवतीभवती

पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील

मर्ढेकरांचे सौदर्यशास्त्र हे उसने आहे. ते इथे लागू पडत नाही. या कादंबरीचे मूल्यमापन स्वतंत्र निकषांनी उत्तर आधुनिक विचारवंत देरीदा, नित्शे , फुको, काम्यु यांच्या विचारधारेने करावे लागेल.

डॉ. आनंद पाटील

आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यासक व तुलनाकार

“मुक्तसृजन” साहित्यपत्रिका औरंगाबाद यांच्यावतीने प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे यांच्या “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीवरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाचा विषय “पिपिलिका मुक्तिधाम : आकलनाच्या नव्या दिशा” असा होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यासक व तुलनाकार डॉ. आनंद पाटील हे होते. वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय बोरूडे (नगर), लेखिका अभ्यासक कवयित्रि प्रा. सुजाता राऊत (ठाणे) या होत्या. प्रास्ताविक लेखिक पत्रिका सहसंपादक प्रिया धारूरकर यांनी केले. स्वागत पत्रिकेचे संपादक कवी समीक्षक डॉ. महेश खरात यांनी केले. त्यानंतर ” पिपिलिका मुक्तिधाम “या कादंबरीवरील शोधनिबंधांचे वाचन वाचले.

” पिपिलिका मुक्तिधाम” ही ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेली २०१९ मधील बहुचर्चित कादंबरी आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांनी तिची समीक्षा करूनही अजुनही नव्या नव्या पद्धतीने समीक्षा होत आहे. मी माझ्या पद्धतीने या कादंबरीची मांडणी करणार असुन खरेच ही कादंबरी मराठी कादंबरीतील परीवर्तनाच्या टप्प्यावरील कादंबरी आहे या डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या विधानाशी सहमत आहे. अशी सुरूवात
डॉ. संजय बोरुडे यांनी केली. ते म्हणाले “उत्तर आधुनिकतेचे निकष लावून या कादंबरीची समीक्षा व्हायला हवी, असेही बोरुडे म्हणाले. या निकषांवर मराठीत उतरणारी ही पहिली कादंबरी आहे.

बोरुडे म्हणाले, ” पिपिलिका कांदबरी संदर्भात अनेक लेखकांनी समिक्षा केलेली असून अनेक लेखकांनी या कांदबरीच्या आशयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असतांना सगळ्यामध्ये एक वाक्यता दिसून येते की ही कांदबरी वाटते तितकी सोपी नाही. म्हणजे ती आकलनाच्या दृष्टीने पचायला अवघड आहे. असे बऱ्याच लेखकांना वाटत आहे. त्याचे मुख्य कारण असे की या कांदबरीसाठी त्यांनी जो गाभा निवडलेला आहे. तो वेगळ्या पध्दतीचा आहे.

कांदबरीतील निवेदिका म्हणून ज्या चार मुंग्या आपल्याला दिसतात. या चार मुंग्यांच्या माध्यमातून त्यांनी समकालीन वास्तव, धर्म, वंश, परंपरा, आधुनिकता, नवगता आधी सर्व घटनांचा, सर्व घटकांचा एक वेगळ्या पध्दतीने, एक तऱ्हेवाईक पध्दतीने परंतु तो तात्विक अन्वय मांडलेला आहे. अशा पध्दतीला अन्वय वाचण्याचा किंवा पाहण्याची आपल्याला सवय नसते. त्यामुळे ही कांदबरी थोडीशी अवघड वाटू शकते.

– डॉ. संजय बोरुडे

प्रसिद्ध साहित्यिक

बोरूडे म्हणाले, ही कांदबरी थोडीशी अवघड वाटू शकते. घाईघाईने यावर भाष्य करायला बरेच लेखक धजावत नाही. कोणी त्याच्या रचनेच्या अंगाने, किंबहुना स्वरुपाच्या अंगाने, शब्दकलेच्या अंगाने, प्रतिभेच्या अंगाने, प्रतिकेच्या अंगाने बोलतात. मात्र या कांदबरीचा गाभा तरी सुध्दा कोणाला सापडला यावरील समर्पक लेख माझ्या वाचण्यात नाही. आजचा मुद्दा आहे की उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम या अंगाने मी काही मुद्दे समोर ठेवत आहे.तर उत्तर आधुनिकता म्हणजे काय ? या अगोदर आपणांस आधुनिकता माहित असणे गरजेचे आहे, आता उत्तर आधुनिकता हे पर्व सुरु होऊन जवळपास पन्नास वर्षाहूनही जास्त काळ लोटलेला आहे. उत्तर आधुनिकतेचे अस्तित्व आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जाणवते. तरीही उत्तर आधुनिकता म्हणजे नेमके काय..याची व्याख्या करणे अवघड जाते आहे. सुरुवातीला बोरुडे यांनी काही तात्विक भागावर प्रकाश टाकला नंतर या कांदबरीच्या अनुषगाने काही उदाहरणांवर प्रकाश त्यांनी टाकला.

प्रा. सुजाता राऊत यांनी अनेक कादंबऱ्यांची तुलना करून या कादंबरीचे वेगळेपण स्पष्ट केले.

पिपिलिका ही वाचकांना एक आव्हान आहे. ती रूढ चाकोरीतील कादंबऱ्याप्रमाणे नाही. ती मुंग्यांच्या रूपकातून व्यक्त होते. तिच्या अनेकविध भाषा आहेत. संवाद वेगळे आहेत. तत्वनज्ञान व्यापक आहे. ती अखिल भारतीय पातळीवर जाते. तिचे अर्थ अनेक निघतात. तिच्यात काव्यात्मकता आहे.

प्रा. सुजाता राऊत

डॉ. आनंद पाटील यांनी आपला अध्यक्षिय शोधनिबंध वाचला. यात त्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण जागतिक पातळीवरील अभ्यासकांची मते मांडत कलाकृतींचे विश्लेषण केले. पिपिलिका मुक्तिधाम सारखी मराठीत दुसरी कादंबरी नाही. मर्ढेकरांचे सौदर्यशास्त्र हे उसने आहे. ते इथे लागू पडत नाही. या कादंबरीचे मूल्यमापन स्वतंत्र निकषांनी उत्तर आधुनिक विचारवंत देरीदा, नित्शे , फुको, काम्यु यांच्या विचारधारेने करावे लागेल. त्या निकषांविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.” या कलाकृतीत वेगळा रांधा आहे. ही कलाकृती म्हणजे ऐतिहासिक आंतरसांस्कृतीक भाषिक क्रिएटीव्ह संहिता आहे. ही कादंबरी म्हणजे मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी आहे. लेखकाने अनेक विचारधारांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय , आर्थिक, धार्मिक, चिकित्सा केली आहे. तीही संयमाने. रूपकातून केली आहे. त्यामुळे ती वाचकांना भावते.

आभार डॉ. रामकृष्ण दहिफळे यांनी मानले. डॉ. संतोष देशमुख यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पिपिलिका मुक्तिधाम कादंबरीस आत्तापर्यंत राज्यस्तरिय सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

काळाशी अन् काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती

मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी

काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading