July 27, 2024
birth Moto rajendra Ghorpade article on Dnyneshwari
Home » जन्माचा खरा उद्देश 
विश्वाचे आर्त

जन्माचा खरा उद्देश 

आता आयुष्यही शंभरवर्षांचे राहीलेले नाही. शंभरवर्षे जगू याची शाश्वती देऊ शकत नाही. वनात, हिमालयीन रांगात राहणारे दिर्घायुषी असू शकतात कारण तेथे पर्यावरण अन् जीवनाच्या धकाधकीची त्रास नसतो. गरजेपुरते मिळते त्यात समाधान मानून ते जीवन व्यथित करतात. मग सन्यास घेऊन हिमालयात वा वनात जाऊन राहाणे योग्य वाटेल पण तेथेही आता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांचे आव्हान उभे राहीले आहे. या मुलभूत गरजा आपण आपल्या जीवनात भागवू शकलो नाही तर परमार्थ सुद्धा सहज करू शकत नाही हे विचारात घ्यायला हवे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

तैसें वृद्धाप्य होये । आलेपणें वायां जाये । 
जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैचा ।। 584 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – तसें म्हातारपण येईल व जन्माला आलेंपण व्यर्थ जाईल, कारण शंभर वर्षे आयुष्य आहे ( तेंव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करूं असे म्हणणारा ) तो तरी शतायु आहे (की नाही) हे कोणास ठाऊक ?

जीवनाचा खरा अर्थ मानवाने समजून घेणे फार गरजेचे आहे. जन्म का झाला आहे ? त्याचा उद्देश काय आहे ? हे समजून न घेतले गेल्याने आता जगणंही महाग झाले आहे. जगणंच मोठे आव्हान झाले आहे. जगण्यासाठीच्या गरजा आता वाढल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे काळासोबत बदलत राहाणे आता क्रमप्राप्त झाले आहे. काळानुसार जीवनात योग्य तो बदल केला नाही तर त्याला जगणंच मुळात आव्हानात्मक होणार आहे. 

असे म्हणतात हे युग स्पर्धेचे आहे. येथे स्पर्धा कोणाची कोणाशी आहे ? कशासाठी ही स्पर्धा आहे ? हे सांगता येणे कठीण आहे, पण या स्पर्धेच्या युगात टिकायचे तर बदल हे स्वीकारावेच लागणार आहेत. अशाने संसार करणेही मुश्किल झाले आहे. मग परमार्थ कसा करणार ? ते समजून घ्यायला तरी वेळ कोठे आहे. इतकी आव्हाने आता उभी राहीली आहेत. अन्न, वस्त्र, निवारा (अवनी) या मुलभूत गरजा आहेत. तरच आपण संसार असो वा परमार्थ करू शकतो. 

आता आयुष्यही शंभरवर्षांचे राहीलेले नाही. शंभरवर्षे जगू याची शाश्वती देऊ शकत नाही. वनात, हिमालयीन रांगात राहणारे दिर्घायुषी असू शकतात कारण तेथे पर्यावरण अन् जीवनाच्या धकाधकीची त्रास नसतो. गरजेपुरते मिळते त्यात समाधान मानून ते जीवन व्यथित करतात. मग सन्यास घेऊन हिमालयात वा वनात जाऊन राहाणे योग्य वाटेल पण तेथेही आता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांचे आव्हान उभे राहीले आहे. या मुलभूत गरजा आपण आपल्या जीवनात भागवू शकलो नाही तर परमार्थ सुद्धा सहज करू शकत नाही हे विचारात घ्यायला हवे. 

सध्या मुलभूत गरजांसाठी सर्वसामान्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा काळात अध्यात्माकडे कोण वळणार. प्रत्यक्षात जीवनात येणाऱ्या अडअडचणीतून मार्ग काढणे हे आद्य कर्तव्य आहे. पण त्यात अडकायचे नाही. संसार हा होत असतो. येणारे प्रसंग झेलत मार्ग निघत असतो. मार्ग सापडला नाही म्हणून अस्वस्थ न होता आहे, त्या प्राप्त परिस्थितीवर मात करत जीवन व्यथित करायचे असते. कितीही श्रीमंत असला तरी संसारात त्यालाही अडीअडचणी असतात. जितकी श्रीमंती तितकीच आव्हानेही मोठी असतात हे लक्षात घ्यायला हवे. गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच संसारातील आव्हाने तितकीच कष्टाची असतात. म्हणून संसार सोडायचा नसतो. संसार आणि परमार्थ एकाचवेळी करायचा असतो. 

परमार्थ हा मात्र करावा लागतो. मग तो निवृत्तीनंतर करु. उतारवयात काय करायचे म्हणून मग परमार्थ करू. तेव्हा देवदर्शन आठवते. काही काम धंदा नाही अशावेळी काय करायचे म्हणून परमार्थ. ठिक आहे उतारवयात तरी त्यांना परमार्थ सुचला. पण आयुष्य कशासाठी आहे हे जन्माला आल्यानंतर जाणून घ्यावे असे त्यांना का वाटले नाही. जीवन जगल्यानंतर जीवनाच्या उतारवयात तरी जन्म कशासाठी झाला याचा विचार करायला नको का ? जन्माचा उद्देश प्रथम समजून घ्यायला हवा. जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा व त्यानुसार कृती करायला हवी.

जीवनात प्रत्येकजन ध्येयवादी असतो. काही ठराविक वय झाल्यानंतर किंवा जबाबदारीची जाणीव झाल्यानंतर ध्येय समोर ठेवावेच लागते. संसार करताना या गोष्टी लक्षात येतात.  तसे जन्म कशासाठी झाला हे ध्येय ठेऊन परमार्थ होत असतो. हे विचारात घ्यायला हवे. मग ही गोष्ट जन्मानंतर लगेचच विचारात घ्यायला नको का ? यासाठी संसार आणि परमार्थ एकाचवेळी करायला हवा. दोन्हीचाही अर्थ समजून घ्यायला हवा. 

संसाराचा त्याग करून परमार्थ करणे सध्याच्या स्थितीत तितके सोपे राहीलेले नाही. यासाठी संसारात राहून परमार्थ सांगण्यात आला आहे. जन्माचा अर्थ समजून घेणे म्हणजे परमार्थ. संसारात राहून तो समजून घेऊन कृती करत राहणे. यातून संसारही सुखाचा होतो व परमार्थही कष्टपद वाटत नाही. यासाठी संसारातील थोडावेळ परमार्थासाठी द्यावा. परामार्थामधील चांगल्या संस्कारांनी संसारही सुखाचा होतो. परमार्थातून मिळणारी उर्जा, आनंद संसारातील जीवनात निश्चितच उपयुक्त ठरते. यातून जीवनाला योग्य दिशा मिळू शकते. यातून परमार्थाचा परमोच्च आनंद देणारे आत्मज्ञान दैवयोगाने प्राप्त झाले तर आयुष्य सार्थकी लागेल. यासाठी जीवनाचे ध्येय परमोच्च आनंद प्राप्ती हे ठेवावे. तोच खरा जन्माचा उद्देश आहे. हे लक्षात घ्यायला हवे. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दंडोबा टेकडीवरील फॅन-थ्रोटेड सरडे

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

मनाच्या आंदोलनाचे अनोखे दर्शन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading