May 9, 2026
Dr Shripal Sabnis comment on Dr shirpad joshi book
Home » अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस
काय चाललयं अवतीभवती

अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस

अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस

सर्वसमावेशक मानवतेचा पुरस्कार, बहुसांस्कृतिकता, बहुआयामी जीवनदृष्टी, भाषा व संस्कृती तसेच व्यक्तिंचे नेमके विशेष टिपणारी चिकित्सक, समग्र अशी जाणीव, भाषा, संस्कृतीचे विशेषतः मराठीच्या संदर्भात अध:पतन रोखणे, मराठी ज्ञानभाषा होणे यांची कळकळ अशा अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध असे चिंतन व लेखन असणारे ‘ अवलोकन ‘ आणि ‘व्यक्तिविशेष’
हे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन डॉ श्रीपाल सबनीस यांनी या दोन्ही ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

अनुबंध प्रकाशनच्या वतीने भारतीय विचार साधना सभागृहात या ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ कवी संतोष शेणई म्हणाले की, श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे लेखन हे नेहमीच चिंतन घेऊन येत असते, अवलोकन मधील त्यांचे लेखन देखील असेच भाषा, साहित्य, संस्कृती संदर्भातील विषयांच्या निमित्ताने ऐतिहासिक मूल्य असलेले चिंतन आहे.सांस्कृतिक मूल्यऱ्हासाकडे लक्ष वेधत,भाषिक राजकीयता व भाषेसंबंधातील विविध आयाम ते उलगडून दाखवते.तसेच भाषिक तत्वज्ञानाची उभारणी करते,भाषिक संघर्षाचे स्वरूप विशद करते, संबंधित समस्येतून मार्ग काढणारे ते चिंतन आहे.

‘ व्यक्तिविशेष’ या दुसऱ्या पुस्तकावर बोलताना ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक डॉ अश्विनी धोंगडे म्हणाल्या की जागतिक, स्थानिक तसेच विविध क्षेत्रातील, संपर्कातील भावलेल्या महत्वपूर्ण व्यक्तिंची नेमक्या शब्दात,नेमकी स्वभावचित्रे असणारे हे लेखन मानवतावादी, पुरोगामी जाणीवांचे समान सूत्र घेत वावरते.ना. घ. देशपांडे यांच्यावरील लेखनाने तर ना. घंच्या कवितेच्या आकलनाला नवीच दिशा दिली आहे,तर फारसे ज्ञात नसलेले सुरेश भट इथे उलगडतात,माणूस वाचन म्हणजे काय ते या लेखनातून दिसते.या लेखकाला मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणाऱ्यांबद्दल असणारी चीड इथे दिसते, पोथीनिष्ठेचा विरोध दिसतो, तटस्थपणे, वस्तुनिष्ठता बाळगत काढली गेलेली ही व्यक्तिचित्रे मराठीत वेगळी आहेत.

लेखक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बुद्धिवंतांच्या, व्यवस्थेतील प्रभावी हस्तक्षेपाची गरज मांडली. प्रास्ताविक प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी केले. प्रकाशकांच्या व्यथा मांडताना त्यांच्यातील अनिष्ट व्यवहारांवर त्यांनी प्रहारही केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वाती यादव यांनी केले.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथपुरस्कार जाहीर 

मोहाडी येथे मार्चमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!