July 27, 2024
Medicinal Importance and Details about Drumstick article by Dr V N Shinde
Home » घराघरातील आवड – शेवगा !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घराघरातील आवड – शेवगा !

शेवग्याचे झाड. सर्वत्र दिसणारे. त्याच्या निदान शेंगाची भाजी प्रत्येक घरात होत नाही असे घर मिळणार नाही. काही भागात शेवग्याच्या पानांचीही भाजी करण्यात येते. साल, मूळ यांचे औषधी उपयोग आहेत. असे हे शेवग्याचे झाड शेताच्या बांधावर, परसामध्ये असले पाहिजे. शेवग्याच्या झाडालाही आईचे झाड, जादूचे झाड अशी नावे त्याच्या गुणामुळे मिळाली आहेत. अशा या शेवग्याच्या फळाविषयी, झाडाविषयी… सारे काही !  

डॉ. व्ही. एन. शिंदे

उप कुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ.
कोल्हापूर

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या नाहीत, असा माणूस मिळणे दुर्मिळ ! शेवगा हे महाराष्ट्रातील अनेकांच्या परसात फुलणारे झाड. कसेही वाढणारे. मनमौजी. त्याच्या सौंदर्यात अनेकांना फारसे काही दिसत नाही. कशाही वाढणाऱ्या फांद्या. अतिशय हलके आणि कमजोर लाकूड. संयुक्त पान असूनही कडुनिंब, चिंचेसारखी नियमितता न जपणारे. असे सारे काही असूनही, बावनकशी सोन्यासारखे, सर्वप्रिय, सर्वगुणसंपन्न. त्याच्या औषधी गुणधर्मांची जसजशी माहिती लोकांना समजू लागली आहे तसतसे हे झाड आणखी लोकप्रिय बनत आहे. सहज बांधावर वाढणाऱ्या या झाडाची आज खास शेती करण्यात येते. बेशिस्तपणातही त्याचे सौंदर्य खुलून दिसते. फुललेला, मंद गंध प्रसवणारा शेवगा तर अनेकांना मोहीत करतो. अनेक कुटुंबाचा शेवग्याची भाजी खाल्ली जात नाही, असा आठवडा जात नाही.

शेवग्याच्या झाडाचे मुळस्थान

भूगोलातील काही सिद्धांतानुसार भारतीय उपखंड, अरबस्तान आणि आफ्रिका खंड हे सर्व सलग भूभाग होते. पुढे हे भूप्रदेश परस्परांपासून दूर गेले. शेवग्याचे मूळ या भागातील मानले जाते. भारतातील पश्चिम हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये या झाडांचे मूळ असावे, असा काही संशोधकांचा दावा आहे. तर काही संशोधकांच्या मते आग्रा, दिल्ली या भागात शेवग्याची झाडे प्रथम आली असावीत. उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील पानगळ वृक्षांच्या प्रदेशात हे झाड चांगले वाढते. भारतातील बहुतांश सर्व राज्यांमध्ये हे झाड अनेक वर्षांपासून लावण्यात येत आहे. काही संशोधकांच्या मते, ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासून भारतात शेवगा आहारात वापरला जात असावा. भारताप्रमाणेच अरब राष्ट्रे, आफ्रिका, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांतही हा वृक्ष अनेक वर्षांपासून आढळतो. सध्या दक्षिण अमेरिकेप्रमाणे उत्तर अमेरिकेतही शेवग्याची लागवड होऊ लागली आहे. यामध्ये फ्लोरिडा आघाडीवर आहे. शेवग्याचे झाड मध्यम उंचीचे असते. झाडाची उंची दहा ते पंधरा फूट वाढते. क्वचित त्यापेक्षा जास्त उंच वाढते. शेवग्याचे झाड वीस ते पंचवीस वर्षे जगते.

विविध भाषामध्ये असणारी शेवग्याची ओळख

मराठीमध्ये शेवगा, शिवगा, सुज्ना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाला इतर भाषांतूनही भरपूर नावे आहेत. हिंदीमध्ये मुनागा, मुंगारा, सहिजना, सरिंजना, सेग्रा, शाजमाह, शाजना, सोंजना, सैंजना या नावाने ओळखले जाते. ओडियामध्ये सांजना, सैजना, सौंडल नावे आहेत. बंगालीमध्ये सुजना, सैजना, सोज्ना, कन्नडमध्ये नुग्गेकई, नुग्गेकोडू, नुग्गा इगिपा, नुग्गे, नुगे, नुग्गी मारा, मोचका, गुग्गल, मल्याळममध्ये सिग्रु, मोरिंगा, मुरिंगा, मोरूना, कोकणीमध्ये मुसिंग, मोसिंग, गुजरातीमध्ये सरगावो, सरगतो, मिधो-सरगावो, सुरगावो, सेगलो, सरगतो, पंजाबीमध्ये सोंजना, संजिना, सिंधीमध्ये स्वंजेरा, तेलुगुमध्ये तेलामुनगा, मुलागा, साजना या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याच्या गुणावरून आणि उपयोगावरून विविध नावे प्राप्त झाली आहेत. कसेही वाढणारे म्हणून शोभांजन, विविध व्याधींपासून मुक्ती देणारे म्हणून मोचक, मुरंगी, शिग्रु अशी अनेक नावे आहेत. इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक ट्री, हॉर्सरेडिश ट्री, मदर्स बेस्ट फ्रेंड, रॅडिश ट्री, वेस्ट इंडियन बेन या नावाने ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. मल्याळम भाषेतील मोरिंगा किंवा संस्कृतमधील मुरंगी नावावरून प्रजातीचे नाव मोरिंगा असेच घेण्यात आलेले आहे. या झाडांच्या बियापासून तेल मिळते म्हणून ऑलिफेरा घेण्यात आले आहे. याचे दुसरे शास्त्रीय नाव मोरिंगा टेरिगोस्पर्मा असे आहे. याच्या बियांना पंख असल्याने टेरिगोस्पर्मा असे नाव देण्यात आले आहे. शेवग्यास ‘शिगॉन’ असे नाव सुश्रुतसंहितमध्ये आढळते.

शेवग्याची लागवड

शेवग्याचे झाड मुलत: बियांपासून वाढते. शेवगा जलद वाढणारे झाड आहे. तीन महिन्यांमध्ये ते आठ ते दहा फुटांपर्यंत वाढते. फांद्यांपासूनही झाडे बनवली जातात. मोठ्या झाडाची फांदी तोडून जमिनीत मातीमध्ये घुसवली आणि पाणी दिले की त्यापासून झाड बनते. असे शाखीय पुनरूत्पादन आजही ग्रामीण भागात केले जाते. शेवग्याचे बी मातीत पडले आणि त्यास पाणी मिळाले की रूजते. शेवग्याच्या बिया वाऱ्यापासून दूर उडत जातात आणि त्याचा प्रसार होतो. पाण्याचा निचरा होणारी कोणतीही जमीन शेवग्याला चालते. बी रूजताच त्यापासून कोंब बाहेर येतो आणि जमिनीत मुळे घुसायला सुरुवात होते. बियांपासून वाढणाऱ्या शेवग्याच्या झाडाला सोटमूळ असते. शेवग्याचा जमिनीवरील भाग अवर्षणामुळे पाणी कमी पडले तर वाळून जातो. मात्र सोटमूळ जिवंत असते. पाऊस पडल्यानंतर त्याला पुन्हा फुटवा फुटतो. त्यामुळे झाडाचा वरचा भाग वाळला तरी झाड मरण पावले असे समजून ते नष्ट न करता मूळ जिवंत आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक असते. पांढरट हिरवा कोंब अतिशय सुंदर दिसतो. या रोपांना सुरुवातीला पाणी द्यावे लागते. एकदा झाडाने चांगले मूळ पकडले की पुढे पाणी देण्याची गरज भासत नाही. जमीन चांगली असेल आणि पाणी मिळत असेल, तर झाडाची वाढ चांगली होते. जमीन मुरमाड, हलक्या प्रतीची असेल तर झाड टिकते, मात्र व्यवस्थित वाढत नाही. त्याला सुरुवातीपासून संयुक्त पाने यायला सुरुवात होते. या पानाचा एक देठ असतो. हा देठ पोपटी किंवा तपकिरी रंगांचा असतो. हा देठ खोडाला जोडलेल्या ठिकाणी फुगीर असतो. त्यापासून अनेक देठाच्या शाखा फुटतात. या शाखांना टिकल्यासारख्या एक गोलाकार आणि लंबगोलाकार पर्णिका असतात. पानाचा एकूण आकार नेहमीच्या कदंबाच्या मोठ्या पानासारखा असतो. पर्णिका पातळ असतात. या पानांची लांबी दोन फुटापर्यंत असते. पर्णिका अतिशय पातळ असल्याने हलक्या वाऱ्यातही हलतात. पाने पातळ आणि नाजूक असतात. पानांच्या कडेला नाजूक पिवळ्या रंगाची नाजूक कडा असते. त्या सोनेरी वर्खामुळे पानाचे सौंदर्य खुलून दिसते.

शेवग्याच्या पानांचे महत्त्व

शेवग्याच्या पानांतही मोठ्या प्रमाणात पौष्टिकतत्त्वे असतात. वाळलेल्या पानांची १०० ग्रॅम पावडर घेतली तर त्यामध्ये साडेसात टक्के पाणी असते. त्यापासून २०५ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. त्यामध्ये २७.१ ग्रॅम प्रोटिन्स, २.३ ग्रॅम मेद, ३८.२ ग्रॅम कार्बोहायड्रेट, तंतूमय पदार्थ १९.२ ग्रॅम असतात. यामध्ये कॅल्शियम २००३ मिलीग्रॅम, मॅग्नेशियम ३६८ ग्रॅम, फॉस्फरस २०४ मिलीग्रॅम, पॉटेशियम १३२४ मिलीग्रॅम, लोह २८.२ मिलीग्रॅम तर सोडियम ८७० मिलीग्रॅम असे मूलद्रव्यांचे व क्षारांचे प्रमाण असते. शेवग्यामध्ये जीवनसत्व ‘अ’ (१६.३ मिलीग्रॅम), बी-१ (२.६४ मिलीग्रॅम), बी-२ (२०.५ मिलीग्रॅम), बी-३ (८.२ मिलीग्रॅम), सी (१७.३ मिलीग्रॅम) आणि इ (११३ मिलीग्रॅम) आढळतात. त्याचबरोबर अमिनो आम्ले आणि ऑक्झॅलिक आम्लेही आढळतात.

शेवग्याची पाने शेळ्या, मेंढ्या यांना विशेष प्रिय असतात. शेवग्याचे मोकळ्या रानात उगवलेले रोप त्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे जंगलात शेवग्याची झाडे फार दिसत नाहीत. हरिण, काळवीट असे प्राणीही शेवग्याच्या पानांवर ताव मारतात. त्यामुळे खास लावलेल्या झाडांना संरक्षक कुंपण घालावे लागते. शेळ्या-मेंढ्या जवळ असताना झाडाच्या फांद्या काढतात. त्याही विनाविलंब पाला फस्त करतात. पाने अतिशय पातळ असल्याने खाली पडून तशीच राहिली तर पातळ थर तयार करतात. त्यामुळे जमीन घट्ट झाल्यासारखी होते आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात पिकाची वाढ चांगली होत नाही. मात्र ही माती जर हलवली आणि मोकळी ठेवली तर पीक चांगले येते. मात्र शेवग्यामुळे पीक येत नाही, या भावनेने अनेकजन बांधावर शेवगा ठेवत नाहीत. 

झाड एकाच खोडासह सात फुट वाढत जाते. त्यानंतर त्याचा वरचा कोंब हलका खुडला जातो. त्यामुळे त्याला फांद्या फुटतात. फांद्याही सरळ वरच्या बाजूला वाढू लागतात. मात्र त्या कशा वाढत जातील, हे निश्चित सांगता येत नाही. फांद्याला फांद्या कोठे फुटतील, हे नेमके सांगता येत नाही. फांद्या पुढे बऱ्यापैकी वाढल्यानंतर खाली झुकतात. पसरट पाने असणारा शेंडा वाऱ्याबरोबर झुलत राहतो. शेवग्याच्या झाडाच्या फांद्या विरळ असतात. त्यामुळे शेवग्याच्या झाडापासून गर्द सावली मिळत नाही. झाडाचे खोड जसे वाढत जाते, तसा त्याचा बाह्यरंग पांढरा व्हायला सुरुवात होते. बुंध्याचा व्यास दोन फुटांपर्यंत वाढतो. शेवग्याची साल मऊ असते. त्यावर बारीक ठिपके असतात. खूपच जुन्या झाडाची साल करड्या रंगाची बनते. शेवग्याची साल दोन सेंटिमीटरपर्यंत जाड असते. सालीच्या आत असणारे लाकूड पांढरट पिवळे असते. लाकूड वजनाला अतिशय हलके असते. तसेच ते ठिसूळ असते. त्यामुळे त्याचा बांधकामासाठी, शेतीच्या अवजारासाठी उपयोग होत नाही. या लाकडाचा जळण म्हणूनही उपयोग होत नाही. शेवग्याचे लाकूड जळण म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, तर मोठ्या प्रमाणात धूर होतो. त्यामुळे शेवग्याचे लाकूड वृत्तपत्रीय कागद तयार करणे, कापड व्यवसायातील किरकोळ कारणाखेरीज उपयोगी पडत नाही.

शेवग्याची फुले

शेवग्याच्या झाडांची पाने हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये गळतात. गळणाऱ्या पानांचा रंग पिवळा झालेला असतो. झाडाखाली पिवळ्या पानांचा सडा पडलेला असतो. काही दिवसांतच नवीन पाने यायला सुरुवात होते. रोप लावल्यापासून आठ ते नऊ महिन्यांमध्ये झाडाला कळ्या येतात. शेवग्याच्या झाडाचा फुलण्याचा हंगाम साधारण जानेवारीपासून सुरू होतो. एप्रिल-मेपर्यंत फुलांचा मुख्य हंगाम असतो. उर्वरित काळातही फुले येतात, मात्र कमी प्रमाणात. दक्षिण भारतात मात्र वर्षांतून दोनवेळा बहर येतो. दुसरा बहर जुलैमध्ये येतो.

खोडाला पानाच्या बेचक्यातून कळ्याचा गुच्छ फुटतो. कळ्यांचा दांडा वाढत जातो आणि अर्धा ते पाऊण फूट लांब होतो. कळ्यांचा गुच्छ बहुशाखीय असतो. या फुलोऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाची फुले येतात. सर्वात खाली हिरव्या रंगाचा देठाशी जोडणारा भाग असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या साधारण दोन सेंटिमीटर लांबीच्या आठ ते दहा पाकळ्या असतात. सर्व फुलांतील पाकळ्यांची संख्या सारखीच असते, असे नाही. यातील बहुतांश पाकळ्या देठाकडे वळलेल्या असतात. फुलाचा देठही असाच आठचा आकडा केल्यासारखा असतो. पुढे शेंगा आल्यावर तो थोडे वाकडेपण कमी करतो. मात्र ते लुघुकोनाचा काटकोन होण्याइतकेच! तो आतमध्ये पाच सुटे पुंकेसर असतात. काही प्रजातींत आणखी पाच परागकण नसणारे पुंकेसर असतात. त्यांचा दांडाही पांढरा असतो. त्याच्या टोकाला पिवळे परागकण असतात. त्यामध्ये तीन स्त्रीकेसरही असतात. बीजांडकोश अंडाकृती आणि केसाळ असतात. या फुलांना मंद मधाळ वास असतो. त्याचे वाढणे जसे अनियमित तशीच फुलेही अनियमित रचना असणारी असतात. शेवग्याला फुले लागली की त्यावर पोपटांचा वावर सुरू होतो. फुले खायला त्यांना आवडते. इतरही पक्षी विशेषत: छोट्या चिमण्या या झाडावर फुलांना फस्त करायला येतात. पोपटाचा डोळा तर शेंगावरही असतो. मोठ्या शेंगा वरच्या बाजूने कुरतडत ते खातात. फुलांवर फुलपाखरे येत नाहीत. मधमाशा इतर कीटक मोठ्या प्रमाणात असतात. विशेषत: भुंग्याचे भ्रमरगान दिवसभर सुरू असते. फुलांच्या दिवसांत झाडाखाली सुकलेल्या फुलांचा सडा पडलेला असतो. मात्र या झाडाची रचना अशी असते की यावर कोणताही पक्षी घर करण्याच्या भानगडीत पडत नाही.

सर्वच फुलांमध्ये परागीभवन होत नाही. परागीभवनानंतर त्यातून दोऱ्यासारख्या शेंगा बाहेर पडतात. सुरुवातीला या शेंगा सुतळीचे तुकडे जोडल्यासारख्या लोंबत असतात. सुरुवातीला शेंगांचा रंगही तपकिरी हिरवट असतो. सुरुवातीपासून या शेंगांवर रेघा असतात. शेंगा जसजशा मोठ्या होत जातात, तसे आतील बिया फुगीर होत जातात. या बियांना तीन पंख असतात. हे पंख आतील गाभ्याला चिकटून असतात. बिया जसजशा मोठ्या होत जातात तसतशा शेंगावर गाठी आल्यासारखे दिसू लागते. शेंगा तीस ते पन्नास सेंटिमीटर लांब होतात. एका शेंगेमध्ये दहा ते पंधरा बिया असतात. शेंगांचा आकार त्रिकोणी असतो. शेंगांचा आकार हिरवा असतो. त्या पक्व होण्यापूर्वीच खाण्यासाठी वापरल्या जातात. शेंगा दिसू लागल्यापासून पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये काढल्या जातात. पहिल्या दोन वर्षांमध्ये शेंगा कमी लागतात. झाडाच्या फांद्यांची दरवर्षी छाटणी करावी लागते. पुढे झाड जसे मोठे होत जाते, तसे शेंगांचे प्रमाण वाढत जाते. एका झाडाला सहाशेपेक्षाही जास्त शेंगा लागतात.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगांच्या १०० ग्रॅम गरापासून २६ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. शेंगांच्या गरामध्ये २.५ ग्रॅम प्रथिने, ०.१ ग्रॅम मेद, ३.७ ग्रॅम कर्बोदके, ४.५ ग्रॅम तंतूमय पदार्थ असतात. तसेच जीवनसत्त्व बी-१ (०.०५ मिलीग्रॅम), बी-२ (०.०७ मिलीग्रॅम), बी-३ (०.२ मिलीग्रॅम), क (१२० मिलीग्रॅम) असते. त्याचबरोबर कॅल्शियम ३० मिलीग्रॅम, मॅग्नेशियम २४ मिलीग्रॅम, फॉस्फरस ११० मिलीग्रॅम, पॅटेशियम २५९ मिलीग्रॅम, तांबे ३.१ मिलीग्रॅम, लोह ५.३ मिलीग्रॅम, गंधक १३७ मिलीग्रॅम असते. यामुळे शेवग्याच्या शेंगांना औषधी महत्त्व प्राप्त होते. त्यातील या घटकांमुळे त्याचा प्रसार सर्वदूर झाला आहे.     

मात्र ज्या शेंगा पक्व होतात, त्यांचा रंग तपकिरी होतो आणि त्या झाडालाच वाळतात. वाळलेल्या शेंगा उन्हामुळे फुटतात. त्यातील बिया वाऱ्यामुळे दूरवर जातात. त्यातील काही रूजतात. शेवग्याच्या बिया मऊ गुळगुळीत काळया अथवा करड्या रंगांच्या असतात. त्याचे पंख पांढरट पिवळ्या रंगाचे असतात. बिया गोलाकार किंवा लंबगोलाकार असतात. पंखांसह बियांचा आकार तीन ते चार सेंटिमीटर भरतो. पंख जोडलेला बीचा भाग त्याठिकाणी फुगीर असतो, त्यामुळे बियांचा आकारही त्रिकोणी दिसतो. बिया वजनालाही हलक्या असतात. विविध वाणांच्या एका किलोमध्ये तीन ते नऊ हजार बिया असतात. बिया सहज तीन-चार दिवसांत रूजतात. मात्र बिया जर कक्ष तापमानाला दमट वातावरणात राहिल्या, तर महिनाभरातच त्यांचे रूजण्याचे प्रमाण साडेसात टक्क्यांनी घटते. काही वाणांच्या बिया हिरवट रंगाच्या असतात. बियांच्या आवरणाखाली असणारे प्रत्यक्ष बी पिवळसर पांढरे असते. या बियांमध्ये पांढरा स्निग्धांश असणारा भाग असतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल असते.       

शेवग्याच्या जाती

या घराण्यात तीनच प्रमुख वाण असल्याचे संशोधक मानतात. एक वाण सर्वत्र आढळतो. मात्र त्याचे मूळ रूप जंगलात आढळते. दुसरा वाण ठाण्यापासून कोकणात आणि गोव्यापर्यंत तुरळक ठिकाणी आढळतो. त्याला मोरिंगा कोकणेन्सिस या नावाने ओळखले जाते. हा अभिजात वाण आहे. याची फुले थोडीसी लालसर असतात. तशी ही प्रजातही दुर्मिळ बनत चालली आहे. तिसरा वाण मात्र जंगलात क्वचितच दिसतो. नेहमी आढळणारा वाण मात्र सर्वदूर पसरला आहे. आज शेवग्याचे अनेक संकरित वाण तयार झाले आहेत. पूर्वी छोट्या फूटभर लांबीच्या शेंगा मिळायच्या आजू मात्र दोन-तीन फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा बाजारात सर्वत्र दिसतात. कोल्हापूरमधील दत्त, शबनम, जीकेव्ही-१, जीकेव्ही-३, चेन मुरिंगा, चावा काचेरी, कोईमतूर, जाफना, रोहित-१, कोकण रूचिरा ही संकरित वाणे महाराष्ट्रात आणि भारतात प्रामुख्याने लावण्यात येतात. यातील कोईमतूर वाण वर्षभर शेंगा देतो. वेळेवर छाटणी केली आणि त्याची निगा राखल्यास आठशे ते अकराशे शेंगा मिळतात. चवीला चांगला आणि उत्पादन भरपूर देत असल्याने तो शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पीकेएम-२ वाणाला निर्यातमूल्य चांगले मिळत असल्याने या वाणाचेही लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. मात्र आजही शेवग्याच्या फळांचा आणि इतर गोष्टींचा खाण्याखेरीज भारतात मोठ्या प्रमाणात उपयोग होत नाही.

शेवग्याचे लाकूड

शेवग्याचे लाकूड वगळता इतर सर्व गोष्टींचा मानवी जीवनात उपयोग आहे. धन्वन्तरी निघन्टूमधील ‘शिग्रुस्तिक्त: कटुष्चोष्ण: कफशोफ समीरजित् l कृम्यामविषमेदोघ्नो विद्रधिप्लीहगुल्मनुत् ll’ या एका श्लोकामध्ये शेवगा महात्म्य दिलेले आहे. आयुर्वेदामध्ये शेवग्याबाबत ‘शिग्रु: सर: कटु:पके तीक्ष्णेष्मी मधुरीलधु: l दीपन: रोचानो रुक्ष: क्षारस्तिक्ती विदाहकृत ll संग्राह्यशुक्रलो हृथ: पित्तरक्तप्रकोपण: चक्षुष्य: कफवातघ्नो, विद्रधिश्र्वयधुक्रिमीन ll’ असा उल्लेख आढळतो. तर ‘भावप्रकाश’मध्ये ‘चक्षृष्यं शिग्रुजं बीजं तीक्ष्णोष्णं विषनाशनम l अवृष्यं कफवातघ्नं तन्नस्येन शिरो:र्तिहृत ll’ असे शेवग्याचे फायदे सांगितले आहेत. खालीलप्रमाणे उल्लेख आहे. वा.ग. देसाई यांनी ‘औषधी संग्रह’ या पुस्तकामध्ये विविध वनस्पतींच्या औषधी उपयोगाबाबत माहिती दिली आहे. यामध्ये शेवग्यावरील माहिती विस्तृतपणे देण्यात आलेली आहे.  इसवी सन पूर्व दीडशे वर्षांपूर्वी राजे आणि राण्या बौद्धिक तल्लखता सुरक्षित रहावी, कातडी तुकतुकित बनावी यासाठी शेवग्याच्या पानांचा आणि फळांचा आहारात मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे उल्लेख मिळतात. प्राचीन मौर्य योद्ध्यांना युद्धावर असताना शेवग्याच्या पानांचा अर्क देण्यात येत असे. शेवग्याच्या पानांच्या अर्कामुळे युद्धातील जखमांच्या वेदना आणि मनावरील तणाव कमी होत असे. अलेक्झांडर दि ग्रेट याला हरवणाऱ्या सैन्यालाही हा अर्क देण्यात येत असे. याची खातरजमा संशोधकांनी केली आणि शेवग्याच्या औषधी गुणधर्माची माहिती लोकांना समजली. शेवग्याला त्यामुळेच ‘चमत्कारी झाड’ (Miracle Tree) असे नाव मिळाले. कोकणामध्ये शेवगा हा पाहुणे आले, मुलांना भूक लागली की सहज करून देण्याचा पदार्थ मुलांसह सर्वांना आवडणारा पदार्थ. असल्याने त्याला ‘आईचे झाड’ असेही नाव मिळाले आहे.  

शेवग्याचे औषधी महत्त्व

शेवग्याच्या पानांमध्ये असणारी विविध मूलद्रव्ये आणि जीवनसत्वामुळे प्राचीन काळापासून खाद्यान्नामध्ये वापर करण्यात येतो. शेवग्याच्या कोवळ्या पानांचा खाण्यासाठी भाजी, सूप आणि सॅलाड म्हणून उपयोग केला जातो. काही भागात पाने वाळवून ठेवतात. काही भागात या पानांची भुकटी करून पदार्थांची पौष्टिकता वाढावी यासाठी विविध खाद्यपदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये मिसळली जाते. शेवग्याच्या पानांमध्ये दुधापेक्षा दुप्पट प्रथिनांचे प्रमाण असते. संत्र्यापेक्षा सातपट जास्त जीवनसत्व ‘क’ असते. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. शेवग्याच्या पानांची भाजी रक्तदाब नियंत्रण करते. आतड्याच्या आतील भागावर पडणारे व्रण आणि जखमा बऱ्या करण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. ही भाजी सहज उपलब्ध होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून करण्यात येते. तसेच, बाळाच्या पाचवीला सटवाईला शेवग्यांच्या पानाच्या भाजीचा नैवद्य दाखवतात. आईलाही ही भाजी खाऊ घातली जाते. डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी शेवग्याच्या पानाचा रस  उपयोगी पडतो. शेवग्याच्या पानाचा रस आणि मध मिसळून डोळ्यात घालण्यासाठीचे अंजन बनवले जाते. पिसाळलेल्या जनावराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पानांचा रस मीठ, काळी मिरी पावडर, लसूण, हळद यांचे मिश्रण बनवून जखमेवर लावतात. वैद्यांच्या सल्ल्यानुसार पोटातही घेतात. डोकेदुखीवर पर्णरसात मिरी भुकटी मिसळून लावली जाते. गळ्यामध्ये सूज आल्यास शेवग्याचा पर्णरस काढून गुळण्या केल्या जातात. तोंड आल्यास पाने चघळणे फायद्याचे ठरते. अतिसारावर पर्णरस योग्य प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो. खरूज झाल्यास पुटकळ्यांवर पानांचा रस चोळतात.

पोटात जखमा झाल्यास, व्रण निर्माण झाल्यास, थकवा येत असल्यास, हाडांना कमजोरी आल्यास, जंताचा त्रास होत असल्यास पानांचा रस उपयोगी पडतो. जेवल्यानंतर धाप लागणे, डोळ्यांच्या त्रास होत असल्यास, डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास, तोंडाची चव जाणे, कुपोषण यावर शेवग्याची पाने आणि पानांची भुकटी अत्यंत उपयुक्त ठरते. शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये खडीसाखर मिसळून खाल्ल्यास पोटात गोळा येणे, स्नायू आखडणे या त्रासापासून मुक्ती मिळते. आयुर्वेदामध्ये तीनशे भिन्न त्रासापासून शेवग्याच्या पानांच्या व शेंगांच्या खाण्यातील वापरामुळे मुक्ती मिळत असल्याचा उल्लेख सापडतो. लोणच्यामध्ये आणि सॅलॅडमध्ये पाने वापरली जातात. काविळ झालेल्या रूग्णांनाही शेवग्याच्या ताज्या पानांचा रस एक चमचा मधामध्ये मिसळून शहाळ्यासोबत पिण्यासाठी दिल्यास त्रास कमी होतो. कोवळ्या पानांची भाजी आतड्यांची हालचाल नियमित करतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. जठराचा कर्करोग टाळणे यामुळे शक्य होते. शेवग्याच्या पानातील पिट्रिगोस्पेरमिन नावाचा घटक जीवाणू प्रतिबंधकाचे कार्य करतो. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस येणे इत्यादीवर शेवग्याच्या पानांची भाजी उपयुक्त ठरते. ही भाजी रक्तवर्धक आहे. नेत्ररोगावरही शेवग्याच्या पानांची भाजी उपयुक्त ठरते.

शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी पाने स्वच्छ धुवून घेतात. भाजीमध्ये घालण्यासाठी एक तास अगोदर मूगडाळ भिजत घालतात. धुतलेल्या पानांतील पाणी निथळू द्यावे. जिरे, हिरवी मिरची, लसूण वाटून घ्यावेत. फोडणी देऊन त्यात हे सर्व पदार्थ घालून परतावेत. त्यानंतर दाळ घालून परतावी. त्यानंतर त्यात पाने घालावीत आणि मीठ घालून झाकण ठेवून अंगच्या पाण्यावर शिजू द्यावीत. शेवग्याची पाने तुरट कडवट चवीची असतात. भाजी शिजताना ही चव निघून जाते आणि चविष्ट भाजी बनते. पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, सूप, झुणका, थालिपीठ, पुलाव, कढी इत्यादी पदार्थ बनवले जातात.

शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात. ही भाजी संधीवातावर उपयुक्त असते. फुलांचे भरीत, शेंगाची रसभाजी, भाजीही संधीवातावर उपयुक्त ठरते. शेवग्याच्या वाळलेल्या बियांचे पीठ पाणी निर्जंतूक करण्यासाठी वापरले जाते. शेवग्याच्या बियांपासून निघणाऱ्या तेलास बेन ऑईल म्हणतात. याचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये केला जातो. घड्याळांचे वंगण म्हणूनही या तेलाचा वापर केला जातो. शेवग्याची पाने, फुले, फळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट घटक असतात. कर्करोग होऊ नये म्हणून शेवग्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन उपयुक्त ठरते. पानांच्या तुलनेत शेंगांमध्ये जीवनसत्त्वे आणि क्षारांचे प्रमाण कमी असते. मात्र क जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते.

विकसनशील देशांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करण्याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. काही भागातील अन्न आणि पाण्यामध्ये अर्सेनिकचा अंश असतो. अर्सेनिक विष असते. या भागांतील लोकांनी शेवग्याच्या पानांचे, शेंगाचे नियमित सेवन केल्यास ही विषबाधा टळते. विषाणू, जिवाणू प्रतिबंधाचे कार्य शेवगा सेवनाने आपोआप होते. सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. मूत्ररोगावरही शेवगा उपयोगी ठरतो. उच्च रक्तदाब, ॲनेमिया, सिकलसेल इत्यादी आजारावरही शेवगा सेवन उपयुक्त ठरते. १२० भाज्यांवर संशोधन केल्यानंतर संशोधकांनी शेवगा ही सर्वोत्तम भाजी असल्याचे जाहीर केले. शेवग्याचे नियमित सेवन चांगले मात्र अतिसेवन करू नये.  

प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये शेवग्याच्या बियांचे तेल वापरले जात असल्याचे दाखले मिळतात. सूर्य प्रकाशाचा त्वचेवर परिणाम होऊ नये यासाठी तेल वापरले जात असे. युरोपमध्ये ग्रीक लोकांनी बेन ऑईलचे इतरही उपयोग लक्षात घेऊन त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असत. पुढे रोमन लोकांनी शेवग्याचे महत्त्व जाणून त्याचा प्रसार केला. १८१७ मध्ये ब्रिटीशांनी शेवग्याच्या उपयुक्ततेवर एक बैठक बोलावली आणि त्यांचे साम्राज्य ज्या ज्या भागात होते तेथे या वनस्पतीच्या लागवडीचा प्रसार केला. शेवग्याच्या तेलाचा उपयोग सॅलड आणि इतर घटकामध्ये सुरू केला. निकारूग्वुआमध्ये सुरुवातीला शेवग्याची झाडे शोभेची झाडे म्हणून लावली जाऊ लागली. त्यानंतर कुंपणासाठी शेवग्याची दाट झाडे लावली जाऊ लागली.

आज शेवग्याची मुळे, साल, पाने, शेंगा आणि बियांपासून मिळणाऱ्या विविध घटकांचा उपयोग ओळखून सर्वत्र लागवड केली जाते. औषधे, खाद्यपदार्थ, रंग, प्राण्यासाठीचे खाद्य, अस्वच्छ पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी शेवग्याचा उपयोग केला जातो. शेवग्याच्या झाडांपासून डिंकही मिळतो. हा डिंक काही प्रमाणात वापरला जातो. डिंक दीडशे ते दोनशे रूपये किलो दराने विकला जातो.

शेवग्यापासून आज विविध कंपन्यांनी औषधे तयार करून बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. २०२१ साली ५०० मिलीग्रॅमच्या साठ मोरिंगा गोळ्या चारशे रूपयांना ऑनलाईन मिळतात. सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या शेवग्याच्या पानांची भुकटीही बाजारामध्ये उपलब्ध आहे. दीडशे ग्रॅमच्या भुकटीची किंमत तीनशे रूपये आहे. जो शेवगा कोठेही वाढतो, उपलब्ध असतो, त्याला नैसर्गिक रूपात घेऊन खाण्यामध्ये जी मजा आहे, ती औषधामध्ये कशी बरे येईल?     


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची मोरपंखी छटा…

कोमसापतर्फे वाङ्मय पुरस्कारासांठी आवाहन

Saloni Art : सापाची थ्रीडी रांगोळी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading