September 27, 2023
Spiritual Knowledge Gift by Guruseva article by Rajendra Ghorpade
Home » गुरुसेवेने जीवास ब्रह्मत्व
विश्वाचे आर्त

गुरुसेवेने जीवास ब्रह्मत्व

सध्याचे जीवन अधिकच गतीमान झाले आहे. पण या गतीमान जीवनात आपण काय करत आहोत. याचे भानही आपण ठेवत नाही. आवश्यक नसलेल्या गोष्टीत आपला वेळ वाया जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आपला वेळ फुकट जावा यासाठी अनेक साधने आपल्याकडे उपलब्ध होत आहेत. माणसांची मने त्यात गुंतली जावीत यासाठी हे उपाय केले जात आहेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आघवियांची दैवां । जन्मभूमि हे सेवा ।
जे ब्रह्म करी जीवा । शाच्यातें ।। 369 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते.

गुरुसेवा ही एक सुपीक जमीन आहे. या जमिनीत कोणतेही पीक उत्तम उत्पन्न देऊ शकते. अशा या सेवेने शोकग्रस्त जीवही ब्रह्मसंपन्न होतो. इतकी ही पवित्र, पावन करणारी, आयुष्य समृद्ध करणारी अशी सेवा आहे. पण गुरुसेवा म्हणजे नेमके काय ? सेवा म्हणजे शोषण नव्हे. सेवा हा मनाचा भाव आहे. मनानेही गुरूंची सेवा करता येते. या सेवेला मानसपूजा असेही म्हटले जाते.

मानसपूजा ही सर्वांत श्रेष्ठ सेवा असली, तरी ती एक कठीण पूजा आहे. कारण आपले मन कधीही एकाजागी स्थिर नसते. सतत कोणते ना कोणते तरी विचार मनात घोळत असतात. मनाला स्थिर करणे हे आपल्याच हातात आहे. आपण साधनेला बसलेले असतो. सुरवातीची एक दोन मिनिटे सो ऽ हमवर लक्ष केंद्रित असते. त्यानंतर मात्र आपण सो ऽ हमचा जप करत असतो, पण मन मात्र तेथे नसते.

सो ऽ हमचा जप तर अखंड सुरूच असतो. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे म्हणजेच सो ऽ हम. ही श्वासाची क्रिया थांबतच नाही. ती थांबली की आपले जीवन संपते. मग सो ऽ हम साधना तर अखंड सुरू असते. फक्त आपले लक्ष त्याकडे नसते. त्यावर लक्ष ठेवणे हीच साधना आहे. हीच गुरुसेवा आहे. ही सेवा आपण केव्हाही करू शकतो. केव्हाही आपण आपले मन त्यावर केंद्रित करू शकतो. पण ते स्थिर राहात नाही.

ही सेवा करण्याचे भाग्य आपणास लाभले तर आहे, पण आपण ती करत नाही. किंवा आपणाकडून ती घडत नाही. सध्याचे जीवन अधिकच गतीमान झाले आहे. पण या गतीमान जीवनात आपण काय करत आहोत. याचे भानही आपण ठेवत नाही. आवश्यक नसलेल्या गोष्टीत आपला वेळ वाया जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आपला वेळ फुकट जावा यासाठी अनेक साधने आपल्याकडे उपलब्ध होत आहेत. माणसांची मने त्यात गुंतली जावीत यासाठी हे उपाय केले जात आहेत. यातून दुसरे मोठा नफाही कमवत आहेत. आपण मात्र त्यात गुंतलो जात आहोत.

मग आपण आपले मन साधनेत का गुंतवत नाही. त्याचा फायदा हा आपणालाच होतो. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही वेळेला आपणास हे जमत नाही म्हणूनही या सेवेकडे दुर्लक्ष करतो. सेवेच्या क्षेत्रानेच सध्या जगाला तारले आहे. जगाची भरभराट केली आहे. संपन्नता आणली आहे. गुरुसेवाही अशीच सेवा आहे. या सेवेनेही आपले जीवन संपन्न होऊ शकते. आपण ब्रह्म संपन्न होऊ शकतो. नराचा नारायण करण्याचे सामर्थ या सेवेत आहे. अशी ही सेवा अखंड घडावी यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

नको ते वर्ज्य करण्यासाठी साठवा सोहमचा स्वर

मनोरथातून, संकल्पातूनच साधते प्रगती 

अध्यात्माच्या प्रवेशाने मन हळूहळू प्रपंचातून बाहेर पडते

Leave a Comment