विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजन समितीची घोषणा
पुणे : सरहद, पुणे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथील प्रस्तावित जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव अरागाम, काश्मीर येथे दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजन समितीचे मा. संतसिंग मोखा (मुख्य संयोजक), मा. दीपक बाली (आंतरराष्ट्रीय समन्वयक) अनुज नहार , सरहद, पुणे आणि सिराजुद्दीन खान, समन्वयक, बुक व्हिलेज अरागम बांदीपोरा, जम्मू-काश्मीर यांनी पुण्यात जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली.
संत सिंग मोखा म्हणाले, “आम्ही जगभरातील पंजाबी लेखक, विद्वान आणि रसिकांना या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी अरागम, जम्मू आणि काश्मीर येथे विश्व पंजाबी साहित्य संमेलनात सामील होण्यासाठी आमंत्रित करणार आहोत ”.
जम्मू-काश्मीरमधील पुस्तकांच्या गावाची संकल्पना सरहद, पुणे यांची आहे. दुसरे जागतिक पंजाबी साहित्य संमेलन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पंजाबी साहित्य, संस्कृती आणि भाषेचा उत्सव होणार आहे, ज्याचे स्थळ SKICC, श्रीनगर आणि वुलर लेक, बांदीपोरा हे आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. मात्र अंदाजे मार्च २०२५ असणार आहे.
सरहद, पुणे यांनी यापूर्वी आयोजित केलेले पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन, 2016 मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडले होते. मान्यवरांसह मा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या संमेलनाचे जाहीर कौतुक केले होते. दोन्ही नेत्यांनी पंजाबी भाषा आणि साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, तिचा समृद्ध वारसा आणि सीमा ओलांडून सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढवण्याच्या भूमिकेची कबुली दिली.
ते संमेलन जगभरातील पंजाबी लेखक, कवी आणि विद्वानांसाठी महत्वाचे संमेलन ठरले होते.
अरागाम या काश्मीर मधील बांदीपोरा जिल्हातील गावाचे आणि सभोवतालचे शांत, निसर्गरम्य आणि समृद्ध साहित्यिक वातावरण, जगभरातील पंजाबी लेखक, कवी, विद्वान आणि रसिकांच्या या प्रतिष्ठित संमेलनासाठी आकर्षित करेल. या गावातील गावकऱ्यांनी सरहद संस्थेच्या प्रेरणेने घराघरात ग्रंथालये उभारली आहेत.
या संमेलनाचा उद्देश पंजाबी साहित्यातील विविधता आणि समृद्धता दर्शविणे आणि त्यातील सहभागींमध्ये संवाद आणि सहयोग वाढवणे आहे. दुसऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनात राज्या-राज्यांमधील आणि देश-देशांमधील गैरसमज आणि मतभेद दूर करण्याची मोठी क्षमता आहे.
काश्मीर आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संवाद निर्माण करणे हा विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा हेतू आहे. या संमेलनात जगभरातील निवडक पंजाबी तसेच इतर भाषिक साहित्यिकांनाही निमंत्रित करणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

