महाराष्ट्रासह देशातील हवामान अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून
वातावरणातील सातत्य अजुन २ दिवस तसेच राहील. पावसाची शक्यता नाही.
१ उद्या बुधवार १ मार्चपर्यन्त सध्या अनुभवत असलेले पहाटेचे सरासरी इतके किमान तर सरासरी पेक्षा काहीसे कमी दुपारचे कमाल तापमान अशी दोन्ही तापमाने आहे तशीच राहण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात रात्रीचा हलकासा गारवा व दिवसाचा काहीसा कमी ऊबदारपणाही तसाच राहून दुपारचे वातावरणही बुधवार १ मार्च पर्यन्त सुसह्य भासेल. असे वाटते.
२- पहिल्या पश्चिमी झंजावाताचा काल पर्यन्त परिणाम जाणवत असतांनाच लगेचच मंगळवार ( दि.२८) फेब्रुवारीपासुन नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तर भारतात जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखण्ड अश्या ३ राज्यात आज व उद्या गडगडाटीसह पाऊस व बर्फीबारीची शक्यता कायम आहे.
३-पुन्हा तिसरे पश्चिमी झंजावात त्याच ठिकाणी दि. ४ व ५ मार्च (शनिवार -रविवार)रोजी अवतरत असल्यामुळे उत्तरेत गडगडाटीसह पाऊस व बर्फबारीची साखळी कायम आहे.असे दिसते.
४- परवा गुरुवार दि.२ मार्च पासुन पहाटेचे किमान सरासरीइतके तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने अधिक राहण्याची शक्यता जाणवते.
५-चार, पाच मार्च (शनिवार -रविवार)रोजी महाराष्ट्रात पावसासंबंधी सध्या विचारणा होवु लागली आहे. सध्या द्राक्षे काढणीचा तसेच रब्बी पिकांचा कापणी /काढणीचा काळ असुन सदर काळात अश्या बातमीने शेतकरी धास्तावलेले आहेत.
६-‘ आउट-लूक ‘ चे अंदाज सावधनतेने घेणे आवश्यक असते. लघु कालावधीच्या अंदाजासाठी ५ दिवसाचा कालावधीही खुप मोठा असतो. त्यामुळे येणाऱ्या ५ दिवसाच्या कालावधीतील होणारे तासागणिक वातावरणीय बदलही बारकाईने निरीक्षण करणे महत्वाचे असते. समुद्रसपाटीपासून १३ ते १४ किमी. उंची पर्यंतचे वेगवेगळ्या पातळीवरील हवेच्या कमी दाबाचे पॉकेट्स व त्यांची तीव्रता तपासून अरबी व बंगालच्या उपसागरावरून येणारी आर्द्रता नेमकी किती, कोठे व कधी येणार त्यावरून पाऊस व त्याचा प्रकार ह्यावर अंदाज दिला जातो. त्यामुळे ४,५ मार्चला कोण्या मॉडेलने दाखवले, किंवा हवामान विभागाने वायव्य राजस्थान व दक्षिण पाकिस्तान दरम्यानची दिड किमी. उंची पर्यंतची चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे जरी पुसटशी शक्यता व्यक्त केली तरी पॅनिक होण्याची गरज नाही असे वाटते.
तेंव्हा
७- सध्या तरी अजुन महाराष्ट्रात पाऊस अथवा गारपिटीची कोणतीही शक्यता जाणवत नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. असे वाटते.
तशीच काही पावसाची शक्यता असेल तर योग्य वेळी स्पष्टता दिली जाईल. मात्र ४,५,६ मार्च असे ३ दिवस महाराष्ट्रात असह्य उष्णतेची काहिली जाणवू शकते. असे येथे आज नमूद करावेसे वाटते. त्यानंतर कमाल तापमानात घसरणही जाणवु शकते.
- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ, आयएमडी, पुणे