July 27, 2024
Need of Conservation of Powari Boli Language Lakhansinh Katre
Home » पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे
काय चाललयं अवतीभवती

पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे

  • नागपुरात दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन उत्साहात
  • मृतप्राय होऊ घातलेल्या पोवारी बोलीचे पुनरुत्थापित करण्याचा निर्णय
  • बोलीभाषा हीच खरीखुरी समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक
  • बोलीभाषेच्या पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथनसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ

भिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला आहे. यामुळे समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणा सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता दिसते आहे. म्हणूनच आपली संस्कृती टिकविण्याबरोबरच पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा आदर केला गेला पाहिजे. पोवार समाजाच्या जीवनपद्धतीत आलेले काही थोडेफार बदल समजून घेतले पाहिजेत. अशी समन्वयवादी, समजदारीची आणि आदरयुक्त विचारधारा समाजाला, आपल्या बोलीला आणि संस्कृतीला पूरक आणि तारक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे यांनी नागपूर येथे केले. तसेच पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

कटरे पुढे म्हणाले, समाजाच्या संघटनेद्वारे पोवारी बोली आणि पोवारी संस्कृतीचा संस्थापन, उत्थापन, पुनर्कथन, नव-प्रवर्तन/नव-सृजन सारख्या विषयात परीपूर्ण लक्ष दिले गेल्याचे दिसत नाही. याचा अर्थ आमच्या त्या प्रथम-प्रवर्तक समाज-प्रमुखांचे महत्त्व आणि श्रेय कमी आहे, असे अजिबात नाही, उलट आम्ही त्या आमच्या पूर्वजांचे आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला समाजोन्नतीसाठी काम करण्याची दिशा दाखवली. आता आपले लक्ष्य मृतप्राय होऊ घातलेली पोवारी बोलीचे पुनरुत्थापित व पर्यायाने ही बोली अमर कशी होवू शकेल यावर हवे. कारण, कोणत्याही समाजाची बोलीभाषा हीच खरीखुरी त्या समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक राहते. हीच प्रमुख गोष्ट लक्षात ठेवून आपण बोलीभाषेच्या पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथनसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.

सांस्कृतिक समृध्दीसाठी चांगल्या साहित्याची नितांत आवश्यकता असते. कारण की, चांगले साहित्य हे वाचकाला अंतर्मुख करते, आणि सोबतच वाचकाची जिज्ञासा आणि संवादाची भूक पण पूर्ण करते. मानवी जीवनाचे विविध अल्पपरिचित पैलू वाचकाच्या दृष्टीस आणून देते, ज्यामुळे वाचकांची जाणीव-कक्षा विशाल आणि सखोल होवू शकते, वाचकाला अस्वस्थ करते, उल्हासित करते, असेही कटरे म्हणतात.

दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूरात झाले. संमेलनाची सुरुवात पुस्तक दिंडीने झाले. हनुमान मंदिर – गणेश मंदिर – दुर्गा मंदिर ते संमेलन स्थळ – पवार विद्यार्थी भवन या मार्गाने दिंडी काढण्यात आली. त्यात संमेलनाध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे, मंडळाचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे, सचिव ॲड. देवेंद्र चौधरी, स्वागताध्यक्ष प्रा. बालाराम शरणागत, प्रा.अलका चौधरी (बालाघाट), आयोजक पृथ्वीराज रहांगडाले, डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे (मुंबई), देवानंद टेंभरे, सी. एच. पटले, छगनलाल रहांगडाले, स्वप्नील पटले आदी सहभागी झाले होते.

उद्घाटन सरस्वती पूजन, राजा भोज नमन करून झाले. विचार पिठावर संमेलनाध्यक्ष ॲड. कटरे, सौ.उषादेवी कटरे, राष्ट्रीय क्षत्रिय पवार समाज संघटनेचे अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे उपस्थित होते. संमेलनामध्ये डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे, डाॅ.अशोक राणा, ॲड. देवेंद्र चौधरी, पृथ्वीराज रहांगडाले, नामदेव पारधी (भरुच, गुजरात), डाॅ. नामदेव राऊत, प्रा. तुकाराम किनकर, राजेश राणे, डाॅ. गौरीशंकर टेंभरे, प्रा.अलका चौधरी, डाॅ. तीर्थानंद बन्नगरे‌ हे मान्यवर सहभागी झाले होते.

प्रास्ताविक डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे यांनी केले. याप्रसंगी ॲड.देवेंद्र चौधरी, प्रा. बालाराम शरणागत, इंजि.मुरलीधर टेंभरे, डाॅ. नामदेव राऊत, राजेश राणे, डाॅ. गौरीशंकर टेंभरे, डाॅ. तीर्थानंद बन्नगरे, डाॅ. अशोक राणा (प्रमुख पाहुणे), प्रा. अलका चौधरी, प्रा. तुकाराम किनकर आदींचे समयोचित भाषण झाले. आभार छगनलाल रहांगडाले यांनी केले.

मायबोली की सुगम वाटचाल या विषयावरील परिसंवादात तुफानसिं पारधी, सुरेश देशमुख, प्रा.अलका चौधरी यांनी भाग घेतला. कविसंमेलन प्रा.अलका चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यात देवेंद्र चौधरी, हिरदीलाल ठाकरे, यादोराव चौधरी, डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे ‘प्रहरी’, चिरंजीव बिसेन, इंजि. गोवर्धन बिसेन, वंदना कटरे ‘राम-कमल’, तुकाराम किनकर ‘किंकर’, छगनलाल रहांगडाले, देवानंद टेंभरे, उषाबाई पटले, विद्या बिसेन, रामचरण पटले, सुरेश देशमुख, रवीन्द्र टेंभरे, मुकुंद रहांगडाले, उमेन्द्र बिसेन ‘प्रेरित’, कल्याणी पटले, फिरोज पटले , डाॅ. भारती शरणागत, फुलवंताबाई चौधरी, सी. एच. पटले, किरण राज बोपचे, स्वप्नील पटले, नीतेश टेंभरे आदींनी स्वरचित कवितेचे वाचन केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

विश्वाच्या, सृष्टिच्या निर्मितीचे रहस्य

डाॅ.सुनीता सावरकर, लक्ष्मीकान्त धोंड यांना या वर्षीची कुरुंदकर संशोधनवृत्ती

व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading