यंदा उन्हाळा कसा असेल यावर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेले मत…
संपूर्ण उन्हाळ्यातील कमाल तापमान (दिवसाची उष्णता)
१. कोकण, सह्याद्री घाटमाथा व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या ८० टक्के भुभागावर ह्यावर्षीचा (एप्रिल, मे, जून) तीन महिन्यातील उन्हाळा म्हणजे दुपारचे कमाल तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्राच्या ८० टक्के ह्या भुभागावर ह्या वर्षी उन्हाळा आल्हाददायकच असण्याची शक्यता जाणवते.
मात्र यात वगळलेला भाग म्हणजे कोकण (मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे ) व सह्याद्रीचा घाटमाथा (पेठ सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मावळ, मुळशी, पोलादपूर, महाबळेश्वर, पाटण, शाहूवाडी, गगनबावडा ते चंदगड पर्यन्त) तसेच पूर्व विदर्भातील ( भंडारा, गोंदिया, गडचिरोली ) जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यताही तितकीच म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच केवळ फक्त ह्या २० टक्के महाराष्ट्रातील भुभागावर उन्हाळा कडक असण्याची शक्यता जाणवते.
संपूर्ण उन्हाळ्यातील किमान तापमान (पहाटेचा गारवा)
२. काहीसा कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ६५ टक्के भुभागावर ह्यावर्षीचा (एप्रिल, मे, जून) तीन महिन्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील ह्या ६५ टक्के भुभागावर पहाटेचा गारवा जाणवेल, असे वाटते. मात्र यात वगळलेला भाग म्हणजे कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्रातील मुंबईसहित ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर ह्या जिल्ह्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील केवळ फक्त ह्या ३५ टक्के भुभागावर म्हणजेच वरील जिल्ह्यात पहाटेचा गारवा हा कमीच जाणवेल, असे दिसते.
एकंदरीत संपूर्ण उन्हाळ्यात मुंबई, ठाणे, रायगड, खान्देश, नाशिक, नगर व विदर्भातील जिल्ह्यात १ ते २ दिवस आली तर उष्णता सदृश लाट येऊ शकते, अन्यथा नाही.
एप्रिल महिन्यातील उष्णता
३. महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भातील तीन ( गोंदिया, भंडारा, गडचिरोली ) जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यता ४५ टक्के आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जरी दिवसा ऊबदारपणा जाणवण्याची शक्यता असली तरी विदर्भ, मराठवाड्यातसहित महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पहाटेचे किमान तापमान मात्र हे सरासरीपेक्षा कमी असण्याची सर्वाधिक शक्यताही ४५ टक्के जाणवते. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण एप्रिल महिना सुसह्य जाणवून उष्णतेच्या लाटेविना जाऊ शकतो असे वाटते.
मुंबई, ठाणे, रायगड, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण एप्रिल महिन्यात केवळ २ ते ४ दिवस आली तर उष्णता सदृश स्थिती जाणवू शकते अन्यथा नाही. एकंदरीत येणारा उन्हाळा सुसह्य जाणवू शकतो. असेच वाटते.
फक्त एप्रिल महिन्यातील पावसाची शक्यता
४. महाराष्ट्रात संपूर्ण एप्रिल महिन्यात पावसाची सरासरी संपूर्ण राज्य व पूर्ण महिन्यासाठी ही साधारणच असते. ह्यावर्षी एप्रिल महिन्यातील पावसाची शक्यता ही केवळ सरासरी किंवा त्यापेक्षा कमी अशा समिश्र शक्यतेची जाणवते. त्यामुळे उन्हाळी पिकांना एकंदरीत वातावरण अनुकूलच समजावे. असे वाटते.