July 27, 2024
Real progress is achieved through struggle
Home » संघर्षातूनच खरी प्रगती साधली जाते
विश्वाचे आर्त

संघर्षातूनच खरी प्रगती साधली जाते

भारतीयांत जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. तसे कारणही आहे. आपल्याकडे सधनता आहे. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे. वाळवंटीप्रदेश आहे. पण त्यांनी कमी पाण्यावर शेती करून जगाला आदर्श शेतीचा पाठ शिकवला आहे. आपल्याकडे पाणी असून आपण काहीच करत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।
तयाते निर्धन ऐसें । म्हणोंये काई ।। ३६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच येऊन बसत असेल तर त्यांना दरिद्री असे म्हणता येईल काय ?

जपानने तंत्रज्ञानात त्यांनी मोठी क्रांती केली आहे. कितीही संकटे आली तरी ते नेहमी ताठ मानेने उभे राहिले आहेत. भूकंप हा तर त्यांना नेहमीचाच आहे, पण यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग काही कमी झाला नाही. प्रयत्नातही त्यांनी कधी कसूर मागे ठेवली नाही. चोवीस तास कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. असे कष्ट भारतीयांनी केले असते तर भारतही जगात महासत्ताक झाला असता. आपण महासत्ताक होण्याची नुसती स्वप्नेच पाहात आहोत.

भारतीयांत जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. तसे कारणही आहे. आपल्याकडे सधनता आहे. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे. वाळवंटीप्रदेश आहे. पण त्यांनी कमी पाण्यावर शेती करून जगाला आदर्श शेतीचा पाठ शिकवला आहे. आपल्याकडे पाणी असून आपण काहीच करत नाही. स्वार्थी वृत्तीने देश पोखरला गेला आहे. देशात आवश्यक गोष्टींची मुबलकता असेल तर कष्ट करण्याची मानसिकता नसते. भारताची पिछेहाट याचमुळे झाली आहे. देश यामुळेच आळसी बनला आहे.

देशात पाण्याची मुबलकता आहे. शेतीची जमीनही सुपीक आहे. आवश्यक तेवढे उत्पादनही होते. यामुळे देशात समृद्धी आहे. गरजेपुरते कष्ट करण्याची तयारी भारतीयांमध्ये आहे, पण भ्रष्टाचार आणि द्वेषभावनेने देश पोखरला जात आहे. नैसर्गिक आपत्ती कमी येते. पण तरीही येथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालिकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतिपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. संघर्ष करण्याची वृत्ती आपणामध्ये निर्माण व्हायला हवी. संकटे सहन करण्याची ताकद अंगात निर्माण व्हायला हवी. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची नेहमीच तयारी ठेवायला हवी. यातूनच प्रगती होते.

इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे, पण त्यांनी उपलब्ध पाण्यावर शेतीत भरघोस उत्पादने घेतली आहेत. आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आपण त्यांचा आदर्शही घेऊ शकत नाही. आपणकडे पाण्याची मुबलकता असूनही आपण आघाडी मिळवू शकलो नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की, कितीही संकटे आली तरी प्रगती करण्याची तयारी ठेवायला हवी. मन खचता कामा नये. संकटांचा सामना करूनच मोठी प्रगती साधता येते. कितीही उंचीवरून खाली पडले तरी मांजराप्रमाणे ताठ उभे राहता यायला हवे. कष्ट करणाऱ्यांच्या घरी, संकटांचा सामना करण्याचे सामर्थ ठेवणाऱ्यांच्या घरी महालक्ष्मी निश्चितच नांदते, यावर विश्वास ठेवायला हवा.

दरिद्री आहोत, गरीबी आहे म्हणून गप्प बसलो तर काहीच प्रगती होणार नाही. संकटावर, आपल्या पुढे असणाऱ्या समस्यावर मार्ग कसा काढता येईल याची उत्तरे शोधता आली तर प्रगती निश्चितच होते. उलट संघर्ष करणाऱ्याच्या घरी निश्चितच कौतुकाने महालक्ष्मी येऊन बसते. यावर विश्वास ठेवायला हवा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पाणीटंचाई आणि पर्यावरण !

शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )

कालातीत कविताःब्लाटेंटिया

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading