fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 22, 2026
Home » सो ऽ हम भाव म्हणजे काय ?
विश्वाचे आर्त

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

Soham Mediation and Feeling article by Rajendra Ghorpade

मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते. मन एकदा सो ऽ हममध्ये लीन झाले की मग मनातील अन्य विचार आपोआपच थांबतात. विचार थांबले की साधना उत्तम होऊ लागते. आपण सो ऽ हम मध्ये रमायला शिकले पाहीजे. तो स्वर ऐकण्याची गोडी लावून घ्यायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आणि येर तेही पांडवा । जे आरुढोनि सो ऽ हम भावा।
झोंबती निरवयवा । अक्षरासी ।। 40 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – आणि अर्जुना, या शिवाय दुसरे (निर्गुण उपासक) जे, तें ब्रह्म मी आहे, अशी दृढ भावना करून अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात.

सो ऽ हमभाव आहे तरी काय ? मी ब्रह्म आहे हा भाव उत्पन्न होणे म्हणजे सो ऽ हम भाव. मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म काय आहे हे समजून घ्यायला हवे. ब्रह्म हे अक्षर आहे. सो ऽ हम हे अक्षर आहे. ते अव्यक्त आहे. पण ते सर्वत्र आहे. सर्वव्यापी आहे. असे असले तरी ते देह नाही. त्याला अवयव नाहीत. अवयवरहित अशी ती वस्तू आहे. ती नष्ट होत नाही. देहात आहे पण ती देहापासून वेगळी आहे.

देह नष्ट होतो पण ती नष्ट होत नाही. आपणास नष्ट झाल्याचा भास होतो. देहात येते आणि जाते. अमर, अचल, अविकारी अशी ही वस्तू आहे. त्याची उपासना करणे म्हणजेच सो ऽ हम ची साधना करणे. अभ्यासाने मग हळू हळू तो सो ऽ हम भाव प्रकट होतो. मी ब्रह्म आहे. असा भाव उत्पन्न होतो. तो भाव उत्पन्न होण्यासाठी मनातील विचार थांबवावे लागतात. मनाला सो ऽ हममध्ये रुपांतरीत करावे लागते.

मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते. मन एकदा सो ऽ हममध्ये लीन झाले की मग मनातील अन्य विचार आपोआपच थांबतात. विचार थांबले की साधना उत्तम होऊ लागते. आपण सो ऽ हम मध्ये रमायला शिकले पाहीजे. तो स्वर ऐकण्याची गोडी लावून घ्यायला हवी. ती सवय आपणास लागली की आपल्यामध्ये सो ऽ हम भाव प्रकट होण्यातील अडथळे दूर होतात. अभ्यासाने, सवयीने हा बदल आपणास घडवायचा असतो.

जपाची माळ सुरू असते. जप सुरू असतो. पण मनात विचार वेगळेच सुरू असतात. ते थांबवायला हवेत. जपाची माळ सो ऽ हम च्या स्वरावर केंद्रीत व्यायला हवी. ज्याला वास नाही. गंध नाही. त्याला आकारही नाही. निराकार, निर्गुण अशा या वस्तूवर आपण आपले लक्ष केंद्रित करायला हवे. हे वाटते तितके सोपे नाही. सद्गुरू कानमंत्र देतात. सर्व गोष्टी ते शिकवतात. पण आपणास त्या आत्मसात करायच्या असतात. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.

मन सो ऽ हमवर कसे स्थिर होईल हे पाहायला हवे. ते स्थिर होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत याचा अभ्यास करायला हवा. अभ्यासानेच सो ऽ हम भाव मनामध्ये प्रगट होतो. यासाठी साधनेत मन रमवायला हवे. अभ्यासाने हे सहज शक्य आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ।।

संन्यास कशाचा अन् कशासाठी करायचा ? 

शरणागतीचा परम अर्थ

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!