मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले ।
मग लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।।168।। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला
ओवीचा अर्थ – तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव (अर्जुनाला) दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेंच धनुष्य उचलून घेतले.
साधना हे एक युद्ध आहे. पण हे युद्ध कोणाशी ? स्वतःतील दुर्गुणां विरुद्ध हे युद्ध आहे. सगुणांचे दुर्गुणाविरुद्ध युद्ध आहे. दुर्गुण कमी केले नाहीत, तर सगुणांचा पराभव होईल. यासाठी वेळीच सावध व्हायला हवे. युद्धाच्या आरंभी आपले शत्रू कोण आहेत यावर एक नजर टाकायला हवी. त्यांना ओळखायला हवे. त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांचा पराभव कसा करता येईल याचेही नियोजन प्रारंभीच करायला हवे.
साधनेत व्यत्यय आणणारा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू क्रोध हा आहे. या बरोबरच मोह, माया, मत्सर, द्वेष हे सुद्धा शत्रू आहेत. साधनेत मन शांत असायला हवे. चिडचिड, क्रोध यासाठीच दूर करायला हवे. दिवसभरात आलेल्या रागाचाही परिणाम संध्याकाळच्या साधनेवर होतो. यासाठी हा क्रोध आपण विसरण्याचा प्रयत्न करायला हवा. रागाने शरीरात विविध रस तयार होतात. या रसाचा परिणाम शरीरावर होतो. उतारवयात क्रोधाला यासाठीच आवर घालायला हवा.
चाळिशीनंतर वागण्यात समजूतदारपणा यायलाच हवा. प्रौढत्व यायला हवेच. तरच आरोग्य उत्तम राहाते. आयुष्य वाढते. क्रोधामुळे शरीरात विविध रस उत्पन्न होतात. या रसायनांमुळे शरीराचा तोल ढळतो. बèयाचदा उतारवयात तोल जाण्याचा आजार पाहायला मिळतो. तो मुख्यतः क्रोधामुळे होतो. क्रोधीत न होणे हा या आजारावरील उत्तम औषध आहे. वयाच्या चाळिशीनंतर उत्पन्न होणारे अनेक आजार हे मानसिकतेशी निगडित आहेत. यासाठी मन आनंदी राहावे, यावर विशेष भर द्यायला हवा. मन आनंदी असेल तरच साधना उत्तम होते.
मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राग का येतो ? चिडचिड का होते ? मनामध्ये येणारे विचार यास कारणीभूत आहेत. यासाठी मनात येणारे विचार हेच मुळात राग मुक्त असावेत. राग आलाच तर त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा. राग आवरायला शिकावे. रागमुक्त जीवन, रागमुक्त मन घडवायला हवे. तशी जीवनशैली निर्माण करायला हवी.
बोलण्यात, वागण्यात तसा बदल घडवायला हवा. राग आलाच तरी तो पचवता यायला हवा. राग व्यक्त होता कामा नये. असे वागणे हवे. प्रेमाने त्यावर मात करायला हवी. वागण्यातून प्रेम व्यक्त व्हायला हवे. क्रोधाला प्रेमाने जिंकायला हवे. तरच मनाने साधना साध्य होईल. शरीरात उत्पन्न होणारी रसायने ही प्रेम स्वरूप असतील. ही रसायनेच खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवतील. सद्गुरू स्वरूपाचे दर्शन होण्यासाठी क्रोधाला मनातील प्रेमाच्या झऱ्यात बुडवायला हवे. क्रोधाचा पराभव केला तर आपला साधनेतील विजय निश्चित होतो.