October 18, 2024
Chatrapal Ninawe interview
Home » Privacy Policy » माझ्या मातीतला चित्रपट मातृभाषेतच करायचा होता, ‘घात’ने ही संधी दिली!
मनोरंजन

माझ्या मातीतला चित्रपट मातृभाषेतच करायचा होता, ‘घात’ने ही संधी दिली!

माझ्या मातीतला चित्रपट मातृभाषेतच करायचा होता, ‘घात’ने ही संधी दिली! – लेखक – दिग्दर्शक छत्रपाल निनावे

भारतीय चित्रपटांचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांनी आपल्या मातीत पहिला चित्रपट तयार करून येथे चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली, डॉ. व्ही शांताराम यांनी त्यावर कळस चढवला आणि त्यानंतर एकापेक्षा एक धुरंधरांनी चित्रपटसृष्टीचा पाया मजबूत करण्याचे अफाट कार्य सुरु ठेवले आहे. याच शृंखलेत नवं काहीतरी करण्याच्या उमेदीने दिग्दर्शक छत्रपाल निनावे नव्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत.

अगदी गडचिरोलीच्या खोल जंगलात अख्या चित्रपटाचं युनिट घेऊन जात त्यांनी शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलेल्या ‘घात’ हा चित्रपट नुसता दिग्दर्शितच केला नाही तर अनंत अडचणींवर मात करीत थेट जगात अतिशय प्रतिष्टीत असलेल्या बर्लिनल आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळविणारा जगातील एकमेव चित्रपट होण्याचा रेकॉर्ड तयार केला आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून आता ‘घात’ महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला येत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेला हा संवाद

घातचं कथानक कसं सुचलं?

मी पहिले मुंबईला होतो. एक फिल्म केली पण ती वर्कआऊट झाली नाही. त्यानंतर मी इंडस्ट्रीत सिनेमेटोग्राफर, एडिटर, पोस्ट प्रोडक्शन अशा पद्धतीची कामं केली. मग म्हटलं एक स्वत: एक फिल्म करूया पण ते होऊ शकलं नाही. तेव्हा ठरवलं की फिल्ममेकिंगला टाटा बाय बाय करणार, शेवटची शॉर्ट फिल्म करणार. ती करण्यासाठी नागपूरला गेलो.… आम्ही चार पाच मित्र मिळून तेथील जंगलात जाऊन आम्ही एक शॉर्टफिल्म शूट केली. त्या शॉर्ट फिल्मने मला होप्स दिले ती शॉर्टफिल्म ‘घात’ याच नावाने केली होती. ती माझ्या ‘घात’ सिनेमातील पहिला चॅप्टर, फाल्गुनची कथा आहे. ती आम्ही शूट केली तेव्हा एंडच्या वेळी दोन कॅरेक्टर्स सडनली येत होते. ते जितेंद्र आणि मिलिंदचे कॅरेक्टर्स आहेत. या व्यक्तिरेखांना स्वतःची गोष्ट हवी आहे हे शॉर्टफिल्म केल्यावर जाणवलं. म्हणून याचा एक पिच व्हिडीओ तयार केला. पुन्हा निर्माते शोधण्यासाठी चक्रा मारल्या. आधी बरेच निर्माते तयार होत नव्हते पण ‘दृश्यम फिल्म्स’ला शेवटी तो व्हिडीओ आवडला.- पसंत पडला.

त्या दुर्गम भागातल्या शूटिंगचे किस्से सांगा ना…!

आम्ही वर्कशॉपला गेलो होतो. ते गाव खरोखरच नक्षल भागात होत. तिथे पोलिसही जात नाहीत. आम्ही धाडस करून तिथे पोहचलो. सुरुची, माझी असिस्टंट किमया, कॉश्च्युम डिझायनर उत्पला, मी आणि माझा सहाय्यक दिग्दर्शक प्रशांत असे आम्ही जंगलातून चालत तिकडे गेलो. जाताना आम्हाला जळलेल्या गाड्या दिसल्या, रेड बॅनर्स दिसले. तिथल्या पोलीस चौक्या दिसल्या त्या खूप वेगळ्या किल्यासारख्या आहेत. त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. पुढचा रस्ता खूप खराब होता, जीपही जाऊ शकत नव्हत्या. ड्राइव्हर म्हणाले आम्ही इथेच थांबतो, त्यामुळे आम्ही पायी निघालो. तिथली झाडी खूप दाट असल्याने भयानक रस्ता होता, सहा फूटाच्यावर सुद्धा काही दिसत नाही. वाघ – नक्षली कोणीही आले तरी दिसणार नाही अश्या रस्त्यातून आम्ही त्या गावात पोहचलो. गावात पोहचल्यावर एकदम युनिक अनुभव आला, गाव जिथं इलेक्ट्रिसिटी नाही. अश्या आदिवासी गावात आम्ही पोहचलो, त्यांचं आदरतिथ्य कमालीचं होतं. मोठ्या मनाची माणसे आहेत सगळी. आम्ही परत जायला निघालो तेव्हा समजलं कि आमचे दोन्ही जिपचे ड्रॉयव्हर्स जंगलातल्या भीतीने गावात पोहचले होते. हा अनुभव खूप थरारक होता, तिथून आम्ही टिपागडावर गेलो तो भाग पहाडी होता. पहाडावर एक सुंदर तलाव परिसर आहे. तिथे गोंड राजाचा किल्ला आहे. तिथून भोवतालच्या परिसरावर नजर ठेवली जाते. आमच्यासोबत असलेला कुत्रा येताना  अचानकपणे विचित्र वागू लागला. मला जंगली प्राण्याबद्दल माहिती असल्याने मी सगळ्यांना एकत्र राहण्याच्या सूचना केल्या.. आम्ही खाली उतरत असताना आमचा पाठलाग लेपर्ड करत असल्याचे दिसले. असे अनेक थरारक अनुभव आम्ही घेतले होते. आमचा साऊंड डिझायनर जंगलात साउंड रेकॉर्ड करीत असताना त्याला वास आला म्हणून तो गाडीत बसला, आणि त्याच्यासमोर वाघ होता. तसेच जितेंद्रला स्पॉट बॉयने अर्धे खाल्लेले हरीण दाखविले होते असे अनेक प्रसंग आम्ही पहिले आहेत.

‘घात’ची भाषा टिपिकल मराठी वाटत नाही यामागे विशेष काही कारण आहे का ?

हो! हा सिनेमा महाराष्ट्राच्या सीमा भागातला असल्याने, मराठीची ही पोटभाषा झाडीबोलीतला आहे.. तिचा लहेजा वेगळा आहे, हा भाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरचा असल्याने या बोलीत हिंदी मिश्रित संवाद बोलले जातात. ही गोष्ट झाडीपट्टीतल्या माणसांची आहे, त्यांच्या जगण्याची आहे. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या बोलीभाषेतून मांडली आहे. बोलीभाषेसोबतच नक्षलवाद हा दुर्दैवाने तिथलं वास्तव आहे. त्यामुळे गोष्टीत ते टाळताच येणार नव्हतं. मग ते गोष्टीत आले आणि त्यांच्यासोबत सगळा संघर्षही.

तुम्ही स्वत: कधी नक्षलवाद्यांना भेटलात का?

नाही. प्रत्यक्ष भेटलो नाही, मी लहान असताना एकदा इटिहा डोहाच्या परिसरात गेलेलो. तिथे नक्षलवादी आले होते. त्यांनी काही त्रास दिला नाही पण ते आल्यानंतर तिथलं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं होतं. त्यामुळे नक्षलवादी, गावं, त्यातला ताण हे सगळं मी अनुभवलं आहे. माझा असिस्टंट प्रशांत, फाल्गुनच्या भूमिकेतला धनंजय मांडवकर यांनी पाहिले आहेत. शिवाय गावकऱ्यांशी बोलताना अनेकदा कळत नकळत त्याचे संदर्भ आलेच होते. त्यामुळेच कुठेतरी हा सिनेमा अधिक खरा झाला. त्यामुळेच एका इंग्रजी वृत्तपत्रात सिनेमाबद्दल जेव्हा लिहीलं गेलं तेव्हा, यातले नक्षलवादी फिल्मी वाटत नसून खरेखुरे वाटतात, असा विशेष उल्लेख झाला.

सिनेमातली पात्र कशी सापडली? विशेषत: पेरकुसारखी

सुरुचीने अतिशय सुंदर ऑडिशन दिली त्यामुळे तिची निवड करणं भागच होतं मला. तिचा गोरा रंग, शहरी दिसणं या सगळ्याला विसरुन जावं, अशी कामगिरी सुरुचीने केली आहे. पेरकुची निवड म्हणजे एक धमालच होती. खूप ऑडिशन झाल्या पण पेरकु सापडेना. शेवटी गंमत अशी झाली की जनार्दन कदम आले ऑडिशनसाठी. त्यांनी ती ऑडिशन चांगली दिली. आम्ही निवड करणारच होतो. पण त्याआधी कदम म्हणाले, ते अनुसूचित जातीतील असल्याने त्यांना फिल्मच मिळत नाही. मी त्यांना म्हणालो, पाहा मला तुमची जात नको तुमचा अभिनय हवाय. तो उत्तम दिलात की, रोल तुमचाच. कदमांनी सुंदर ऑडिशन दिली आणि पेरकु पटकावला.

या विषयावर विचार करताना लक्षात आलं की, अरे अशा मातीतल्या माणसांच्या भूमिका लिहील्याच गेलेल्या नाहीत. ज्या दिसतात. त्या शहरी, मध्यमवर्गीय नाहीतर एका साच्यातले गावकरी. मग या मातीतल्या माणसांची गोष्ट, जंगलाची गोष्ट जगापुढे आणायची तर आपल्याला सिनेमा करावाच लागणार बॉस.

वर्क इन प्रोग्रेस लॅबचा किती फायदा झाला

खूप फायदा झाला. कारण आम्ही आमच्या दृष्टीकोनातून सिनेमा पाहत होतो, तयार करत होतो. वर्क इन प्रोग्रेस लॅबमध्ये इतर अनेक तज्ज्ञांचे दृष्टीकोन मिळाले. फिल्म पुढे नेण्यासाठी काय करायचं, याचा खूप उपयोग झाला. ऑलिव्हिया स्टीवार्ट, फिलिपा कॅम्पेल .??…… यांच्यासारखे तज्ज्ञ लोकं होते. त्यांच्यामुळे एक नवी दृष्टी मिळाली. 

बर्लिनला आम्हाला फिल्म पाठवायची होतीच. मात्र ते त्यावेळी झालं नव्हतं. मीनाक्षी शेडे ज्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या साऊथ एशिया कन्सल्टंट आहेत. त्यांचा मला एक दिवस फोन आला. त्या म्हणाल्या, छत्रपाल तुझी फिल्म बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या वेबसीरिज विभागाच्या प्रमुख ज्युलिया फिडेल यांनी पाहिली. त्यांना ती अतिशय आवडली. फिल्ममध्ये तीन चॅप्टर आहेत तर ती वेबसीरिज म्हणून देशील का असं त्या विचारतायत. मी विचारात पडलो. म्हटलं मला बर्लिनला जायचं आहे, पण ही फिल्मच राहणार कारण पहिल्यापासून मी तिचा विचार फिल्म म्हणूनच केलाय. मीनाक्षी मला म्हणाल्या, बघ अरे विचार कर. पण मी ठाम होतो. मग मीनाक्षींनी ज्युलियांना फोन करून सांगितलं. ज्युलिया यांनी तेव्हाचे फिल्म निवड समितीचे प्रमुख कार्लो चॅट्रीयन यांना सांगितलं. मग पुढे मायकेल स्तत्झ (Micheal stutz) हे तेव्हा पॅनोरमाचे हेड होते. त्यांनी फिल्म पाहिली आणि निमंत्रण पाठवलं. ते साल होतं २०२१. तेव्हा आम्हाला काही कारणाने जमलं नाही पण २०२३ मध्ये पुन्हा संधी मिळाली आणि आम्ही बर्लिनला पोहोचलो. अशाप्रकारे एकाच सिनेमाला दोनदा निमंत्रण मिळण्याचा प्रसंग पहिल्यांदाच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला घडला होता. जर बर्लिन फिल्म फेस्टिवल नसता तर ही फिल्म बाहेर  आली नसती, अटकली असती, जगभरात पोहचली नसती. मी त्यांचा कायम ऋणी राहील.

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलने तुम्हाला दोन वेळा बोलावणं पाठवलं होतं ना?त्याविषयी सांगा ना?

बर्लिनला आम्हाला फिल्म पाठवायची होतीच. मात्र ते त्यावेळी झालं नव्हतं. मीनाक्षी शेडे ज्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या साऊथ एशिया कन्सल्टंट आहेत. त्यांचा मला एक दिवस फोन आला. त्या म्हणाल्या, छत्रपाल तुझी फिल्म बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या वेबसीरिज विभागाच्या प्रमुख ज्युलिया फिडेल यांनी पाहिली. त्यांना ती अतिशय आवडली. फिल्ममध्ये तीन चॅप्टर आहेत तर ती वेबसीरिज म्हणून देशील का असं त्या विचारतायत. मी विचारात पडलो. म्हटलं मला बर्लिनला जायचं आहे, पण ही फिल्मच राहणार कारण पहिल्यापासून मी तिचा विचार फिल्म म्हणूनच केलाय. मीनाक्षी मला म्हणाल्या, बघ अरे विचार कर. पण मी ठाम होतो. मग मीनाक्षींनी ज्युलियांना फोन करून सांगितलं. ज्युलिया यांनी तेव्हाचे फिल्म निवड समितीचे प्रमुख कार्लो चॅट्रीयन यांना सांगितलं. मग पुढे मायकेल स्तत्झ (Micheal stutz) हे तेव्हा पॅनोरमाचे हेड होते. त्यांनी फिल्म पाहिली आणि निमंत्रण पाठवलं. ते साल होतं २०२१. तेव्हा आम्हाला काही कारणाने जमलं नाही पण २०२३ मध्ये पुन्हा संधी मिळाली आणि आम्ही बर्लिनला पोहोचलो. अशाप्रकारे एकाच सिनेमाला दोनदा निमंत्रण मिळण्याचा प्रसंग पहिल्यांदाच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला घडला होता. जर बर्लिन फिल्म फेस्टिवल नसता तर ही फिल्म बाहेर  आली नसती, अटकली असती, जगभरात पोहचली नसती. मी त्यांचा कायम ऋणी राहील.

राम कोंडीलकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading