June 6, 2023
Housabai Pawar Trust Literature Award announced
Home » हौसाबाई पवार ट्रस्टचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

हौसाबाई पवार ट्रस्टचे साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशनच्यावतीने कोरोना काळात प्रकाशित साहित्यकृतीना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत. नुकतेच या पुरस्कारांची घोषणा संस्थेच्यावतीने सौ. पद्मजा पवार यांनी केली.

या स्पर्धेमध्ये राज्यभरातील २७ साहित्यकृतींनी सहभाग घेतला होता. परिक्षक म्हणून मराठी साहित्याचे अभ्यासक व समीक्षक डॉ सुजय पाटील, कवयित्री गौरी भोगले, अर्थायनकार डॉ जे. के. पवार यांनी काम पाहीले.

पुरस्कार विजेते साहित्यिक असे –

ललित-संकिर्ण व इतर विभाग

भयकंपित इतिहास – प्रा, विजयकुमार विनायक भवारी ( पुणे )
कोरोना अनलॉक – गुरुबाळ माळी ( कोल्हापूर )
लॉकडाऊन – ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर ( बार्शी )
नोवेल कोरोना – डॉ. संदीप पाटील, भारतभूषण केशव गिरी ( कोल्हापूर )
अर्थभान – प्रा. संजय ठिगळे ( सांगली )
परिपूर्ती – गणपती यशवंत मोहिते ( सातारा )
चिन्हांकित यादीतली माणसं – माधव जाधव ( नांदेड )

काव्य विभाग –

मृगजळ मागे पाणी – श्रीराम पचिंद्रे
रिंगण – माधुरी मरकड ( नगर )
डोहतळ – मारुती कटकधोंड ( सोलापूर )
भाव विभोरी – डॉ. स्मिता गिरी ( कोल्हापूर )
तिमिरातुनी तेजाकडे – किरण पाटील ( सरवडे – राधानगरी )

कोरोना…आणि कोरोनाच !… या एका शब्दाने 2020 हे वर्ष थरारुन गेले आहे. कोरोना विषाणूपासून होणारा आजार व त्याभोवती इतिहास गुंफण्याची किमया साधत प्रा. विजयकुमार भवारी यांनी भयकंपित इतिहास पुस्तक लिहिले आहे.

– प्रतिनिधी

————————–

कोरोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या आजाराने उद्भवलेल्या भयकारी अस्वस्थ वर्तमानाचा कालपट ज्ञानेश्वर जाधवर यांच्या लॉकडाऊन या कादंबरीतून साकारला आहे. महामारी संकटकाळाचे समाजवाचन या कादंबरीत आहे. सामान्य माणसे, स्थलांतरितांचे जग, मध्यमवर्ग, प्रशासन व वैद्यकीय व्यवस्थेचे विविध तऱ्हेचे चित्रण कादंबरीत आहे. सार्वत्रिक असे मृत्यूभय आणि आकाराला आलेल्या व्यवस्थेच्या ताणतणावातून कादंबरी घडली आहे. अस्वस्थकाळातील समाजवृ्त्तांताबरोबरच नायकाच्या मनातील गावभूतकाळ आणि भयस्वप्नांचा प्रतिकात्मकपट कादंबरीत आहे.

– प्रा. रणधीर शिंदे
————————-

लॉकडाऊन ही ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर लिखित कादंबरी म्हणजे कथानकात फार विशेष अशी कसलीच गुंतागुंत नसलेली एक साधी, सरळ एकरेषीय कथा आहे. या कादंबरीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबावर अचानकपणे ओढवलेल्या कोरोनाच्या साथीच्या हालअपेष्टा आणि आपत्तीचे वास्तवदर्शी आणि जिवंत चित्रण आहे.

– उमेश मोहिते

————————–

कवित्वाचे हे अथांग सोबतपण घेऊन निघालेली माधुरी मरकड यांची ही कविता आपले रिंगण भेदता-भेदता विस्तीर्ण अवकाशात कधी प्रवेश करते, हे तिचे तिलाच कळत नाही. ‘स्व’ अभिव्यक्तीच्या भाषेला शब्दपाखरू असे संबोधून विचार आणि भावनांची वीण घट्ट करताना ही कविता परंपरेचे साचलेपण आणि थांबलेपण नाकारून समतेच्या पायावर उभी राहते. समतेचा हा आवाज अधिक बळकट करू पाहणाऱ्या या कवितेने अधिकाधिक प्रगल्भ होत जाण्याच्या शक्यता खुल्या केल्या आहेत.

– महेंद्र कदम

Related posts

भारतातील भाषा आणि साहित्य तसेच जैवविविधता या विषयावरील टपाल तिकीटांचे प्रदर्शन

चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…

सायकल वापरा चळवळ…

Leave a Comment