March 28, 2024
Memories of Childhood And Mango article by Mahadev Pandit
Home » आंब्यासोबत राजेशाही बालपण
मुक्त संवाद

आंब्यासोबत राजेशाही बालपण

पृथ्वीतलावरील मानवी राजा जसे प्रजेला अनेक सोयी सुविधा देऊन त्याचे जीवनमान सुधारतो ,अगदी तसेच आंबा सुद्धा प्रत्येकाच्या मुखात गोडी, माधुर्य निर्माण करतो आणि त्यांचे सुख समाधान वाढवितो आणि प्रत्येकाच्या जीवनात राजसुख वृध्दींगत करतो तसेच प्रत्येकाचे जीवन राजेशाही बनवतो म्हणूनच आंब्याला फळांचा राजा हेच नाव सार्थ आहे.

महादेव पंडीत

महादेव पंडीत

सांगली येथील वॅालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १९८९ च्या बॅचचे स्थापत्य अभियंता.

जिओटेक्नीकल व स्थापत्य सल्लागार म्हणुन जवळ जवळ ३० वर्षाचा मेरेथॅान अनुभव.

ईमेल : mip_68@hotmail.com
भ्रमनध्वनी : ९८२००२९६४६

फळांचा राजा आंबा. आंबा ही कोकणची राजेशाही. माझे बालपण हिरण्यकेशी नदीच्या काठावरील मौजे हाजगोळी बुद्रुक, पोस्ट मडिलगे, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे गेले. गावात साधे पोस्ट ऑफीस सुद्धा नाही यावरूनच आपणास कल्पना येईल की गाव किती आडवळणी असेल ? पण आडवळणी असले तरी शतप्रतिशत नैसर्गिक होते. मी गावामध्ये जन्मापासून ते जून 1983 पर्यंत म्हणजे भारत आपला पहिला विश्वकप जिंकेपर्यंत होतो. त्यानंतर जून 1989 पर्यंत उन्हाळी सुट्टीला म्हणजेच फक्त आंब्याच्या हंगामामध्ये गावी असायचो, म्हणजेच काय जन्मापासून ते पंचविशीपर्यंत आंब्याच्या सहवासातच.

गावच्या आंब्याची गोडी अवर्णनीय

माझी पहिली पंचविशी अगदी खऱ्या अर्थाने फळाच्या राजासोबत तर दुसरी पंचविशी फक्त आणि फक्त बाजारपेठेतल्या राजाच्या तात्पुरत्या सहवासात. आज कितीही गोड व मधूर आंबा, मग तो देवगड हापूस असो की रत्नागिरी हापूस पण पूर्वीचे राजासोबतचे दिवस काही औरच होते त्या माधुर्याची गोडी अगदी अवर्णनीय व अविटच होती. साधारणपणे डिसेंबरमध्ये आंब्यांना मोहर येतो. मार्च महिन्यात साधारणपणे कैऱ्या मिळण्यास सुरुवात होते. लहान लहान कैऱ्या खाण्यासाठी आम्ही भावंडे खूप आसुसलेलो असायचो. शेजाऱ्यांच्या आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या चोरून आणून त्याला चटणी मीठ लावून खाण्यात खुप मजा यायची. आंबा फोडी, चटणी व मीठ यांच्या मिश्रणाला करम असे म्हटले जायचे. शेतावर सुद्धा दुपारी जेवताना बरेच शेतकरी कैरी सोबत चटणी भाकर खात असत.

आमच्या गावी आमची स्वतःची खुपच आंब्याची झाडे होती, ती काही हापूस, पायरीची नव्हती पण वेगवेगळ्या प्रकारची होती. त्यामध्ये एकदम पिवळा जर्द गोटी आंबा, काळा आंबा (गडद हिरवा), नारळी आंबा, शेपू आंबा, खोबरी आंबा, लोणची आंबा व चपटी कोय असणारा मांसल आंबा असे अनेक नानाविध प्रकार. मित्रहो हे सर्व आंबे चाखण्याचे भाग्य आमच्या गावाने आम्हाला दिले.

असा ओळखायचा पाडाचा आंबा

आंब्याला साधारणपणे गुढीपाडव्याच्या नंतर म्हणजेच दोन एक आठवड्यांनी चांगला पाड येतो. गुढीपाडवा या शब्दातच पाड हा शब्द आहे आणि पाडव्यानंतर आंबा पाडाला येतो म्हणजेच त्यामधील मधुरता व गोडी वाढते आणि गोडी म्हणजे शुभ संकेत व शुभ काळ, आणि ह्या शुभ काळात आपल्याला राजासोबत रोज मस्त मनमुराद ताव मारता येतो. आंबा पाडाला आल्यानंतर पिकवण्यासाठी तो कधी झाडावरून उतरवायचा याचा अचुक अंदाज माझ्या काकांना येत असे. माझे काका गुढीपाडव्यानंतर रोज भल्या पहाटे शेतावर व आब्यांच्या बागेत फिरायला जायचे आणि तेव्हा आंब्याच्या झाडाखाली काही पिकलेले आंबे पडलेले असायचे. हे आंबे खाण्यास खुपच मजा यायची. कारण ते आंबे झाडावरच अगदी नैसर्गिकरीत्या पिकलेले असायचे. निसर्गात आंबा पिकला आहे आणि त्यामधील कोणता आंबा खूप गोड आहे याची अचूक पारख पहिल्यांदा पाखरांना व पक्षांना येते. पक्षी आपल्या चोचीने एखादा आंबा अर्धा अधिक झाडावरच खातात आणि असा अर्धा आंबा झाडावर लटकताना दिसला की समजायचे आता आंब्याला खूप चांगला पाड आलेला आहे. माझे काका स्वतः बरोबरच पक्ष्यांनी खाल्लेल्या आंब्यावरूनच एकदम रास्त अंदाज बांधून कोणत्या आंब्याचे कधी आंबे उतरायचे याचे अचूक नियोजन करायचे.

देवाने दिलेले फळ देवालाच अर्पण

मार्च अखेरीस सर्वांच्या परीक्षा संपलेल्या असायच्या इतर सर्व भावंडे गावी आलेली असायची. मग सर्वांसोबत काकांच्या अंदाजाप्रमाणे झाडावरचे आंबे उतरणे, वाटून घेणे, घरी आणणे नंतर एक दिवसांनी चांगल्या स्वच्छ फडक्याने पूर्ण आंबा पुसून घेणे, डालग्यात पयानाच्या गवतासोबत किंवा पिंजरासोबत पिकत घालणे. सर्वात पहिल्यांदा डालग्यामध्ये खाली गवताचा थर त्यावर आंब्याचा थर, मग कागद परत गवत परत आंबे असे करत करत पूर्ण डालगे भरल्यानंतर सर्वात शेवटी गवताच्यावर थोडे फळकुटाचे वजन, हे सर्व प्रकार करण्यास खूपच गम्मत वाटायची. मध्येच कोणीतरी काकांना प्रश्न विचारायचे आजोबा मला सांगा आता आम्हाला पिकलेले आंबे कधी खायला मिळणार ? आठ दहा दिवस थांबरे लेकरा, असे म्हणून माझे काका प्रत्येकाला गोडीने समजावयाचे. आंबे पिकल्यानंतर पहिल्यांदा गावच्या देवळात सुद्धा देवासाठी पाच पाच आंबे ठेऊन नमस्कार करून यायला काका सांगायचे. बघा माझे काका देवाने दिलेले फळ पहिल्यांदा देवालाच अर्पण करण्यास सांगायचे यावरुनच त्याच्या श्रध्देची कल्पना येते.

असे उतरले जायचे आंबे

मी सात वर्षाचा होईपर्यंत काका मला झाडावर चढू द्यायचे नाहीत. काका स्वतः शिडी लावून आंब्याच्या झाडावर चढायचे. आंब्याची झाडे खूप मोठी असायची. आंबे झाडावरून अलगत व अगदी हळूवारपणे उतरवायचे असतात. आंब्याच्या कोणत्याही फळाला झाडाचा तसेच जमिनीचा मार लागता कामा नये. आपटलेला आंबा आढीमध्ये लवकर खराब होत असे आणि कधी कधी एका खराब आंब्यामुळे पुर्ण आंब्याची आढीच खराब होण्याची भिती असते. त्याचप्रमाणे आंबा फळाचा राजा असल्यामुळे त्याला अलगत व हळुवारपणे हाताळणे अत्यंत आवश्यक, नाहीतर गोडाचे सुख कसे मिळणार ? आंब्याच्या फांदीवर आंब्याचे घसच्या घस लटकलेले असायचे ते बघतानाच खूप मजा यायची.

आंब्याच्या झाडांचा विस्तार खुप मोठा असायचा त्यामुळे फांदीवर लटकलेले आंबे उतरण्यासाठी एक लहानसे औजार असायचे त्याला आंब्याचे बल्ले असे म्हणायचे. एका लहानश्या सहा ते आठ फूट बांबूच्या काठीला एक लहानशी जाड पिशवी किंवा बैलाच्या मुसक्याच्या आकाराची घरीच कातलेली पिशवी बांधलेली असायची. बल्ल्याची काठी सर्व साधारणपणे 6 ते 8 फूट लांब असायची. पिशवीच्या मुखावर एक त्रिकोणी आकाराची लहान धारधार पट्टीची बांधणी असायची. त्रिकोणाच्या पट्टया धारधार असायच्या त्यामुळे बल्ल थोडसं स्वतःकडे खेचले तरी आंबा देठापासून तुटून बल्ल्याच्या थैलीत अलगत यायचा. एका बल्ल्यात चार ते पाच आंबे बसायचे. एकतर बल्ल्यातील आंबे झाडावरून एका बांधलेल्या पिशवीत जमा करायचे आणि नंतर ती पिशवी हळू हळू खाली सोडायची किंवा बल्ल्यातील एक एक आंबा खाली फेकायच पण तो एका दुसऱ्या जुगाडामध्ये टाकायचा जेणे करून या फळांच्या राजाला कोणतीही दुखापत होऊ नये. आंबा झेलण्याची दोन जुगाडे. एका जुगाडामध्ये फेकलेला आंबा एका जाड गोणपाटामध्ये एकदम अलगत झेलायचा, यामध्ये आंबा फेकणारा व झेलणारा एका विशिष्ट आवाजाने एकमेकाला संदेश द्यायचे आणि झाडावरील फळांच्या राजाला मार न लागता अलगत झेलायचे. खरंच ही कला काही मोजक्याच भावंडांना जमायची. कधी कधी आंबा एकदम झाडाच्या विस्ताराच्या बाहेर झेलायला लागायचा त्यामुळे आपले डोळे व कान एकाच वेळी कार्यमग्न झाले पाहिजेत नाहीतर मग राजाने मार खाल्लाच समजायचा. दुसऱ्या जुगाडामध्ये झाडाच्या खाली चार भावंडे एका जाड अशा घोंगड्याचे चार कोपरे हातामध्ये ताणून उभे राहायचे आणि मग काका एक एक आंबा झाडाच्या फांदीचा अंदाज घेऊन अगदी बरोबर झोल्यात सोडायचे. या जुगाडामध्ये फारसे कौशल्य नसायचे. काही भावंडे सर्व आंब्याची रास किंवा ढीग तयार करायचे. आंब्याचे मोठ मोठाले ढीग बघूनच मन प्रसन्न व्हायचे. आंबे उतरण्यासाठी मित्रमंडळी, शेजारी पाजारी तसेच पाहुणे रावळे यायचे. आंबे उतरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला काका पाच पन्नास आंबे द्यायचे नंतर शिल्लक राहिलेले आंबे आम्ही अर्धे अर्धे वाटून घ्यायचो. नंतर सर्वजण आंबे घरी घेऊन यायचे आणि नंतर एक दिवसांनी आंबे पिकवण्यासाठी प्रक्रिया चालू व्हायची.

पिळून आंबा चाखूण खाण्याची मजा औरच

साधारणतः 30 ते 35 वर्षापूर्वी गावी वातावरण खूपच नैसर्गिक व शुद्ध होते त्यामुळे आंब्यांना कोणत्याही प्रकारची किड लागायची नाही. गावातल्या मंडळींना जमिनीवर पडलेले तसेच पाखरांनी खाल्लेले आंबे सुद्धा खाण्यास कोणतीच शंका नसायची. माझ्या बालपणापासून ते सर्वसाधारणपणे 1990 पर्यंत आम्ही भावंडांनी आंबे कापून खाल्लेले आठवतच नाही. आडीतून काढलेल्या आंब्याचा अलगद देठ काढायचा नंतर आंबा दोन्ही हातात पकडून हळूवार दाबाने देठाचा भाग खाली धरून पिळायचा लगेचच देठा मधून आंब्याच्या रजलेल्या चिकांसोबत थोडासा आमरस बाहेर सोडायचा आणि मग आंब्याच्या गोडीची व माधुर्याची अविट चव घेत घेत आंबा थोडा थोडा दाबत पूर्ण आमरसाचा आस्वाद घ्यायचा. पिकलेला आंबा तोंडाने चाखून चाखून खाण्याची मजा अगदी आनंददायीच. आंबे चोखून चोखून कितीही खा कोणताही त्रास होत नाही. एका एका वेळी आम्ही भावंडे दहा दहा आंबे फस्त करायचो. आंबा कापून खाणे किंवा आंब्याचा आमरस खाणे यापेक्षा पारंपारिक चोखून खाण्याचा प्रकार खरोखरच मधुरयोग व राजयोग आहे. आंब्यातील आमरस संपत आल्यानंतर अलगद हाताच्या दाबाने आतील आंब्याची कोय बाहेर काढून तिला चाखून चाखून पांढरी करण्यातील मजा अगळी वेगळीच असे. नंतर आंब्याच्या सालीच्या पॅकमधील सर्व आमरसाचा मनमुराद आनंद लुटायचा आणि त्या पॅकमधील सर्व आमरस संपल्यानंतर त्या सर्व साली गाईला द्यायच्या. काका या सर्व कोयीमधील काही मोजक्या आंब्याच्या कोयी छप्परावर सुकत ठेवायचे आणि मृग नक्षत्राच्या वेळी पुन्हा नैसर्गिक चक्राचा समतोल राखण्यासाठी जमिनीत रुजवत असत. आमच्या शेतावरील सर्वच आंबे काही ब्रँडेड नव्हते पण ह्या वेगवेगळ्या आंब्याची नैसर्गिक चव व मजा आजच्या हापूसला नक्कीच मागे ढकलण्यासारखी होती. काही मोजकीच झाडे कलमी होती पण ती काही रत्नागिरी किंवा देवगड हापूसची नव्हती. माझ्या काकांना व वडिलांना कलम बांधून नवीन नवीन आंबे तयार करण्यात खूप आनंद वाटायचा.

काळ्या आंब्याची आठवण

आज मुंबईमध्ये रुपये 500 पासून रुपये 1500 प्रत्येक डझनाला देऊन मोजकेच आंबे घरी आणतो. दराप्रमाणे त्यांच्या साइजमध्ये फरक असतो. रोज दोन ते तीन आंबे कापून खातो आणि त्याच्या साली व कोयी घनकचऱ्यात फेकतो कारण शहरात साली खाण्यासाठी गाईच नाहीत. गावी जवळ जवळ दोन महिने आंब्याचा हंगाम चालू असायचा. गावी मुबलक आंबे होते. कधीही आंब्याचा कंटाळा आला नाही कारण अनेक चवीचे आंबे खायला मिळायचे. काही आंब्यांना केशर खुप प्रमाणात असायचे. आजच्या शहरातील या हापूसच्या, तोतापूरीच्या किंवा लंगड्या आंब्याच्या जमान्यापेक्षा आमच्या बालपणीच्या पहिल्या पंचविशीमधील आंब्याच्या सिझन खुप आनंददायी आणि मनमुराद असायचा. पहिल्या दहा वर्षापर्यंत अंगात घातलेला शर्ट सुद्धा काहीवेळा पिवळा झालेला बघायला मिळायचा. माझ्या बालपणी आंबे खाण्यासाठी अगदी एकही पैसा खर्च होत नव्हता आणि आज मला या गोष्टीचे खुप कौतुक वाटते. आमची आंब्याची झाडे कमीतकमी 100 ते 150 फूट विस्ताराची होती त्यामुळे पावसाळ्या व्यतिरिक्त उरलेल्या 8 महिन्यासाठी ह्या आंब्याच्या झाडांचा शेतकरी मंडळींना घटकाभर आराम करण्यासाठी उपयोग होत होता. आमचा काळा आंबा प्रत्येक सिझनला कमीतकमी हजार दोन हजार आंबे आम्हाला देत होता. आंब्याचा रंग गडद हिरवा होता म्हणून त्याला त्याला आम्ही काळा आंबा म्हणायचो. आमचा काळा आंबा म्हणजे मला माझे आजोबाच वाटायचे. आंबे पिकल्यानंतर आम्ही ते आंबे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना, पाहुणे मंडळींना तसेच मित्र मंडळींना घेऊन जात होतो. आमचे पाहुणे रावळे सुद्धा आमच्या काळ्या आंब्याची वाट पाहत असायचे.

आंबा माणसे जोडतो, गोडी आणतो

खरंच आंबा माणसे जोडतो, आंबा प्रत्येकाच्या तोंडाला गोडी आणतो. आंब्याची पाने शुभकार्यात वापरतात. आंब्याची मेढ लग्न मंडपात मुहूर्तमेढ म्हणून उभा करतात. आंब्यावर निसर्गात पशु पक्षी आपला उदरनिर्वाह भागवतात. उन्हाळ्यात विश्रांतीसाठी आंब्याच्या झाडांची सावली उपयोगी पडते. फळे येण्याची क्षमता कमी झाली की त्याच्या मुख्य खोडाच्या फर्निचरच्या लाकडासाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे इतर फांद्यांचा जळाऊ लाकूड म्हणून उपयोग होतो. लोणची आंब्याचे लोणचे शेतकरी मंडळींना पावसाळाभर जेवणात खुप आनंददायी मेजवानी देत असायचे. पाला पाचोळ्याचा सेंद्रीय खतासाठी वापर होतो. यावरूनच आपणास लक्षात येईल की गावी पूर्वीचे लोक फळांच्या राज्यासोबत मनसोक्त जगायचे. एक आंब्याचे झाड कित्येक लोकांचे, पक्षांचे तोंड गोड करते. आंबा माणसे जोडतो व त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करतो म्हणूनच त्याला फळांचा राजा म्हणतात आणि राजासोबत पहिली पंचवीशी आनंदात गेल्यामुळे आम्ही राजेशाहीत वाढलो आहोत, असे अभिमानाने सांगू शकतो. आज आंब्यावर लाखो रुपये खर्चुनसुद्धा आमच्यासारखे फळांच्या राजासोबतचे राजेशाही बालपण व त्यातील अगळी वेगळी मौजमजा आजच्या बालकांना कधीच मिळणार नाही आणि आज याचेच दुःख आहे. आज कोणीही निसर्गचक्राला हातभार लावत नाही, त्यामुळे जुन्या आमराई सारख्या नैसर्गिक बागाच तयार होत नाहीत.

पृथ्वीतलावरील अगदी मानवी राजा जसे प्रजेला अनेक सोयी सुविधा देऊन त्याचे जीवनमान सुधारतो अगदी तसेच आंबा सुद्धा प्रत्येकाच्या मुखात गोडी, माधुर्य निर्माण करतो आणि त्यांचे सुख समाधान वाढवितो आणि प्रत्येकाच्या जीवनात राजसुख वृध्दींगत करतो तसेच प्रत्येकाचे जीवन राजेशाही बनवतो म्हणूनच आंब्याला फळांचा राजा हेच नाव सार्थ आहे.

Related posts

ॲानलाईन शिक्षण पध्दतीमुळे अभियांत्रिकी फ्रेशरवर बेरोजगारीचे सावट

डिजीटायझेशन प्रणालीमुळे बांधकाम विभागाला सोन्याचे दिवस !

उद्योग जगतात महिलांनी उतरावे यासाठी प्रोत्साहन गरजेचे

38 comments

सौ छाया बंडू गोईलकर June 30, 2021 at 6:59 PM

🙏🙏 फारचं छान लेखन केले आहे आंब्याबरोब आण्णा-वाचून आनंद झाला आंब्याबरोब सर्व बालपण आठवले आहे-तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची ओळख करून दिली आता आपण कितीही आंबे खाल्ले तरी गावातील आंब्याची जिभेवर ती चव काय येत नाही आंब्याचा गोडवा वेगळाच असतो पूर्ण बालपण आठवले आहे पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा असेच लेख लिहा आणि आणि मला पाठवा मला वाचायला आवडेल 👌👌🙏🙏👍👍💐💐💐 अभिनंदन आण्णा 🙏🙏

Reply
Vijay Kurhade May 28, 2021 at 7:50 PM

Again well expressed ..nice article in busy schedule..

Reply
Santosh D. Pawale - Bangalore May 25, 2021 at 4:13 PM

Yes it’s really awesome a blog Bahuji. 👍 The childhood memories are lovely narrated. Ur mango memory sounds like so much fun & joy these days bonding.

Keep writing……!!

Reply
हृषिकेश निकम May 24, 2021 at 8:30 PM

खूप मस्त लिहलय सर… खूप सुंदर लेख आहे.

Reply
Narayan Katkar May 24, 2021 at 3:38 PM

Excellent article Mahadev. Well captured all the relevant information in a lucid language like mango taste.
We have also exactly the same memories and hence could relate all our childhood which stood in front of our eyes at a glance.
Fantastic literature orientation mindset.
Thanks a lot for providing such quality articles.
Keep doing good work.
All the best !!!

Reply
Vijay laxman pandit May 24, 2021 at 1:32 PM

अप्रतिम, नाद खुळा लेख असा लेख वाचून मन प्रसन्न झाले संपूर्ण बालपण डोळ्यासमोर. तरळले. छान लिहिला आहे खूप आवडला. आंबा हे माझे सर्वात आवडते फळ आणि दोन नबर फणस🙏🙏🙏🙏🙏

Reply
Prakash Toraskar May 22, 2021 at 12:41 PM

Mr M I Pandit
While writing sincerely on topics such as ‘Study of Civil Engineering with new approach’, Flood , Corona Pendamic your efforts of expressing sincer gratitude to the Nature for making your childhood memorable is truly praiseworthy.
Lot of thanks for bringing back many of the grown-ups to their sweet n juicy childhood days.
The article might grow a strong curiosity among the present urban youths who know only the limited facts about mango such as only alphanso mangoes are sweet, they should be cut n eat or drink , making Aamrass. Your article revealed so many sweet activities related to mango which are novel for today’s urban children n citizens.
It’s like jumping from bom(bay) to (Haj)goli that everyone likes to chew n enjoy in childhood.

Reply
दिलीप पंडित, विक्रोळी May 21, 2021 at 11:17 PM

आपल्या संस्कृतीत कलशपूजनाला अग्रगण्य असे स्थान आहे. या कलशपूजनापासून हिंदू धर्मात वेगवेगळ्या धार्मिक विधींत आणि सणाच्या दिवशी दाराला लावल्या जाणाऱ्या तोरणात आंब्याच्या पानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुर्वेदातही हा वृक्ष बहुगुणी मानला जातो, त्याचप्रमाणे भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वैविध्यपूर्ण चवींचा आढळणारा आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हापूस आंब्यामुळे जगभरात ख्याती लाभलेल्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजाही म्हटले जाते. आता आपण शहरात शक्यतो हापूस म्हणून मिळणारा आंबाच खात असलो तरी आपण खाल्लेल्या रायवळ आंब्याची चव अजूनही जीभ विसरलेली नाही. रायवळ आंबा चोखून खाण्यातली मजा काही औरच असली तरी आंबा असे चोखून खाणे येरागबाळ्याचे काम नव्हे. तो चोखून खाताना योग्य सावधगिरी बाळगली नाही तर कोपरापर्यंत पिवळ्या धम्मक आमरसाचा वरंगळ गेलाच म्हणून समजा.
असा अनेकविध चवींचा खजिना असलेला रायवळ आंबा हापूसच्या दिमाखात हरवत चालला आहे. गावाकडची लहानपणी आपण चढाई केलेली अवाढव्य बुंध्याची आंब्याची बहुतांश झाडे काळाच्या ओघात आता दृष्टिआड झाली आहेत. आपण भावंडांनी, बालमित्रांनी लहानपणी अनुभवलेल्या आंब्याच्या मोसमातल्या मौजेच्या आता फक्त आठवणी उरल्या असल्या तरी त्या आठवणींवरील धुळीची पुटे आपल्या सुंदर, मुद्देसूद लेखनाने पुसली गेली. छान. असेच लिखाण करत राहून वेगवेगळ्या आठवणी जागवाव्यात…

Reply
नामदेव शिंदे, पुणे May 21, 2021 at 2:28 PM

महादेव, मला अजूनही गावाकडे करमत चांगले.
कधी कधी वाटते, शिकलो नसतो तर बरे झाले असते.
गावाकडे कायम राहिलो असतो.
आंबा,हुरडा, बोर,ऊस, पपई केळी,सगळी गावाकडील फळे,ताजे दूध, पाट्या वरचा ठेचा,लग्न,जागरण गोंधळ कार्यक्रम मधील जेवण.
पोहणे,विठ्ठी दांडू,गोट्टी,बाकीचे खेळ.
अशा कितीतरी गोष्टींचा आनंद बालपण त घेतला.
एकदा शहरात आलो की, कळतं असून सुध्या बाहेर पडता येत नाही.
आंबा गावरान भरपूर खाल्ले,सालीसकट खायची गंमत च भारी अनुभवली.
फारच छान वाटले, वाचून आनंद झाला.
पूर्ण बालपण आठवले.
कायम पाठवत जा.( Technical Report , पेक्षा मी जास्त आवडीने गावाकडील अनुभव वाचेल)
👌🏿👍🏻🙏🏼🙏🏼

Reply
अविनाश देसाई May 20, 2021 at 12:00 AM

सर आपण फारच सुंदर लेखन केले आहे. जसजसे मी वाचत गेलो तसतश्या माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. आपण जसे वर्णन केले आहे अगदी तसेच बालपण मी अनुभवलेले आहे .फारच छान सर.आपली लेखनशैलीही उत्तम आहे, भाषा सहज सुलभ आणि समजण्यासारखी आहे.
धन्यवाद सर आपले खुप खुप आभार

Reply
Adv. Sarita Patil May 19, 2021 at 8:58 PM

नेहमीप्रमाणेच खूपच छान लेखनआणि अगदी छोटे छोटे बारकावे लक्षात आणले आहेस आंबे पिळून खाण्याचा आनंद औरच असतो. आंब्याबरोबर सर्व बालपण आठवले. रम्य ते बालपण आणि रम्य त्या गोड आठवणी. आपले आण्णा आणि काका आंब्यांची रास मोजताना पहीले एक न म्हणता लाभ: म्हणायचे हे ही आठवले. नवीन लेखनास शुभेच्छा.

Reply
Prakash Toraskar May 22, 2021 at 12:46 PM

स्थापत्य शास्त्राचा नव्या पद्धतीने अभ्यास ,महापूर,कोरोनाची महामारी यासारख्या गंभीर विषयावर ती लिखाण करता करता निसर्गाचे उपकार लेखातून मांडण्याची पद्धत निश्चितच स्तुत्य वाटली. आपल्या लेखामुळे माझ्यासारख्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलात याबद्दल आभार.
खरेतर आंबे पेटीतून आणणाऱ्या , ते चाकूने कापून खाणाऱ्यांना आणि केवळ आंब्याचा आमरस करून मजा घेणाऱ्यांना आंब्याच्या अनेक रूपांची ओळख आपण करून दिलात.आजच्या पिढीला आंबा पिळून खाणे, तो पिशवीत झेलने, त्यासाठी बल्याची काठी वापरणे, आंब्याची आडी घालने ,अशा अनेक आनंदाच्या बाबी निश्चितच माहीत नाहीत आणि म्हणूनच या लेखाने सध्याच्या ज्ञानी पिढीला एक वेगळीच आनंदाची उघडून दिली असे मला वाटते.

Reply
Sindhu Patil May 19, 2021 at 12:37 PM

आण्णा खूपच छान लेखन केले आहेस तूअगदी पूर्ण बालपण डोळ्यासमोर आले.आंब्याच्या हंगामातील ते सर्व दिवस आठवले.आत्ता आपण एका हंगामात कितीतरी हजार रुपयांचे आंबे खातोय पण जिभेवर ती चव काय नाही बघ.लेख वाचल्यावर बालपणाचा काळ सुखाचा असेच म्हणावे लागेल.खूपच छान लेख. पुर्ण बालपण रेखाटले आहे.

Reply
सुरेश तुरटे, गडहिंग्लज, कोल्हापुर May 18, 2021 at 2:17 PM

महादेव खूप छान लेख आहे . मनाला खूप भावला . बालपणातील आठवणीने आंब्याची चव चाखल्या सारखी भास झाला .आपल लेखन अप्रतिम .साहित्य क्षेत्रातील नव पान आपल्या हस्ते नवीन भरारी घेईल ही सदिछा . धन्यवाद

Reply
Shekhar Nerurkar May 16, 2021 at 7:10 PM

अरे आता वाचला तुझा लेख. खूप छान लिहितोस. थोड्या वेळा करता मी पण माझ्या बालपणात रमलो. खंत एकाच गोष्टीची वाटते, ती लहानपणीची मजा आप्ल्या मुलांना अनुभवता आली नाही.

Reply
D.K.Shinde Wai May 16, 2021 at 4:42 PM

सुंदर
फळांच्या राजाला शोभेल असाच त्याचा गौरव आणि भरपूर बारकावे टिपलेत तुम्ही .अक्षरशः त्या विश्वात घेऊन गेलातआणि आमचेपण बालपण डोळ्यासमोर फेरधरून नाचू लागले.काही प्रथा आणि संकेत आपणा सर्वांकडे सारखेच असतात त्या अचूक टिपल्या आहेत.
दगड माती विटा स्टील सिमेंट यामध्ये रमणाऱ्या आपल्यासारख्या स्थापत्य अभियंत्याचे त्या क्षेत्रातिल खूपसारे लिखाण मी स्वतः वाचलं आहे आणि माझ्या मित्र परिवारला वाचायला सांगितले आहे.
ह्या लेखातून आपल्यातील एका हळव्या भूमिपुत्राचे दर्शन झाले.
आपण असेच लिहीत राहावे 🙏

Reply
Umesh May 14, 2021 at 9:57 AM

Dear Mahadev,

Fantastically written & well expressed article.
Recalled all my childhood memories back.
All my summer holidays were spent on climbing, stealing all types Mangoes on fruiting trees in our Colony & nursery around. Most of my friends used to carry one definite item in their pockets during Mango season & that was a small paper pouch of salt & chilly powder mix, since you never knew when you might come across a Mango tree. Haa haa.

I loved your last line of *आंबा माणसे जोडतो, गोडी आणतो*. It’s so very touching & a truth.

I have personally done & experienced all that you have mentioned here in this article.

Gratitude to you for sharing it & recalling my childhood memories. Best Wishes. 🙏🏻👍🏻

Reply
Nitin Pandit May 12, 2021 at 8:57 PM

लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आंबा पिळून खाण्याची मजा काही औरच ! काळ्या आंब्याचे आंबे तुम्ही शेजारी, मित्र आणि नातेवाईकांमध्ये वाटायचा यावरून “श्यामच्या आईने वाटलेले फणसाचे गरे” आठवले. मागच्या वर्षी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काजूची ७०० झाडे गावातल्या लोकांना वाटली होती. यावेळी आम्ही आंब्याची झाडे वाटू.

Reply
महादेव पंडित , लेखक May 12, 2021 at 3:25 PM

मित्रहो आपण सर्वांनी माझा लेख वाचुण त्यावर खुपच सुंदर सुंदर प्रतिक्रिया दिला आहात. तुमच्या प्रतिक्रियामुळे मला नव नवीन लेख लिहन्यासाठी उर्जा मिळेल. मित्रहो आपना सर्वाना मनापासुन खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐

Reply
Surekha khot.. Mumbai May 12, 2021 at 12:27 PM

Excellent article bhauji. 🙏🙏🙏🙏🙏 the caption is also very beautiful n perfectly relevant with this article.the way you described childhood mangoish memories step by step in detailing that’s really great. 👌👌👌👌👌 whole article is superb. I like this line very much “राजासोबत पहिली पंचवीशी आनंदात गेल्यामुळे आम्ही राजेशाहीत वाढलो आहोत, असे अभिमानाने सांगू शकतो.” Also Multi Uses of mango trees wonderful..👏👏👏

Reply
श्री काकाजी देसाई, आजरा ,कोल्हापुर May 12, 2021 at 11:48 AM

नेहमीप्रमाणेच सुंदर अचूक व सूक्ष्म बारकावे जपून लिहिलेला उत्कृष्ट लेख मी सुध्दामाझ्या बालपणीच्या राजेशाहितील काळा ,लाल्या ,लोणची ,केळी नारळी, अशा सर्व सध्या हयात नसणाऱ्या आंब्याना मनातल्या मनात भेटून प्रणाम केला खूप छान लेख 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻आवडला 👌🏻🌹💐🌷👍🏻

Reply
बी जी मोरे, गडहिंग्लज, कोल्हापुर May 12, 2021 at 9:35 AM

फारच छान! हे वाचत असताना जणु प्रत्यक्ष त्या भागात फिरत असल्यासारखे वाटत होते. वाचून गावाकडचे आंबे खाल्ल्यासारखा अनुभव मिळाला. 👍👍👍👍👍

Reply
सुरेखा अतुल शिंगरे, कुर्ला, मुंबई May 12, 2021 at 9:33 AM

खुपच छान 🙇‍♀️…एक इंजीनियर व्यक्ती एक छान कवी ..एक छान लेखकही असू शकतो हयाचीच कमाल वाटते. ..स्टेप बय स्टेप आंब्याच्या बालपणीच्यानआठवणी छान मांडल्यात , मला आपल भादवणच बालपणच समोर आल …खरंच अप्रतिम मांडणी सुंदर वर्णन आहे लेखाच . खुप बरं वाटल वाचुन 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

Reply
श्रीमती उज्ज्वला देशपांडे, ठाणे May 12, 2021 at 9:26 AM

मस्तच. आंबा यावर लिहिलेले लिखाण अप्रतीम. नक्कीच PhD. मिळाली असणार.अभिनंदन.शुभेच्छा.शुभाशीर्वाद.मला माझे लहान पण आठवले.मी पण वयाच्या आठव्या वर्षा नंतर रोज शेतात जावुन मोटेवर पाणी काढणे ओल्या शेंगा काढणे
हरभरे ओले काढणे. पानमळ्यात फिरणे.आमराईत जाणे.मक्याची कणसे आणणे गुळाची काकवी आणणे आणि सर्वाना वाटणे.तुझ्या या लेखातून माझे बालपण मी अनुभवले. धन्यवाद.

Reply
संभाजी हरेर May 12, 2021 at 7:44 AM

छान लिहिले आहेस, वाचून बालपनीचे माझे आंब्याच्या दिवसातील सर्व आठवणींना उजाळा मिळाला,ते सर्व दिवस आठवले.तुला शुभेच्छा.

Reply
दिपक देशमुख , सोलापुर May 11, 2021 at 10:35 PM

प्रत्येक कृती शब्दात उतरवली आहे ,जशीच्या तशी कुठही तेल मीठ लावून लेखामधील गोडी वाढवली नाही .
गावरान आंब्याची चव तुझ्या लेखणीत आहे.
धन्यवाद. 🙏🏻

Reply
P.B.JOSHILKAR- QA/QC Manager ( HEISCO - Kuwait) May 11, 2021 at 7:31 PM

WOW !! EXCELLENT ARTICLE .

This is one of the Best Article in the ” BALPAN ” memories . You are the best Composer.
You took us in Childhood period . Really you developed super skill in writering / providing different articles in different subjects with good knowledge .

Congrates & Keep it up .

Reply
अशोक देशपांडे, पुणे May 11, 2021 at 2:04 PM

वाचून माझ्या ही बालपणीच्या आठवणी ना उजाळा मिळाला,आम्ही ही घरी असेच आंबे खात असू.पेरितला आंबा, घासरती वरील आंबा, सारणी वरील आंबा,लाल,खोबरी असे सर्व प्रकार आठवणी मध्ये ताजे आहेत.काही दिवस आम्ही जेवणाऐवजी आंबेच खात असू👍👍👍👍

Reply
संदिप सहस्रबुध्दे, ठाणे May 11, 2021 at 10:34 AM

सुंदर
गावी फेरफटका मारून आल्याचा आनंद मिळाला ।🙏🙏

Reply
मनोहर पंडित May 24, 2021 at 9:22 PM

छान लेख लिहिला आहे लहानपणीच्या आठवणीना उजाळा दिला आहे.
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

Reply
मनोहर पांचाळ, करीरोड, मुंबई May 11, 2021 at 10:33 AM

आपल्या लेखाने मलाही माझ्या बालपणीच्या ,आमराईच्या बागेतून तुम्ही खूप फिरवून आणलेत त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद, डालगं,अढि,कर्माट,असे कितीतरी शब्द मला माझ्या बालपणात घेऊन गेले.
पुढील लेखासाठी कोटी कोटी शुभेच्छा

Reply
नंदकुमार पाटील , कोल्हापुर May 11, 2021 at 10:32 AM

अतिसुंदर, अरे पंडित,कोल्हापुरात राहून मला तू आमच्या वारिकडे घेऊन गेलास. वारीकडे आंबा, फणस, धामण, जांभूळ याची मेजवानी होती, आमची व आमच्या सर्व भाऊबंद यांची भरपूर झाडे आहेत.

Reply
संतोष देवधर May 11, 2021 at 8:21 AM

आंब्यासारखीच रसाळ आणि मधुर भाषा आहे. रायवळ आंबे अजूनही भाव खातात. माझ्या लहानपणी खोबरी, पावशी, अशी आंब्याची नावे होतीच. खोबरी म्हणजे खोबऱ्यासारखा गर, पावशी म्हणजे पहिला पाऊस पडला की पिकणार…. निसर्ग वैभव आता लोपलं . प्रत्येक गोष्टींचं बाजारी करण झालाय. वैशाखाच्या वणव्यात दुपारी आंब्याखाली झोपणे किती सुखद होतं ते अनुभवावं लागतं. असो. असे बरेच काही स्मृतीच्या आडून. पण तुझा लेख सुंदर. वाचक ही प्रत्यक्ष अनुभवतो. लिहीत रहा. शुभेच्छा.

Reply
Shantaram Pawar May 11, 2021 at 12:31 AM

Aambyachya godavyapramane lihinyatahi godava aahe, Mahadev. Congrates & Keep it up!

Reply
Baban Patil May 10, 2021 at 10:46 PM

👌👌👌मस्तच .त्या वेळी आंबा विकणे हा प्रकारच न्हवता.आनी लेखणी ही ओघवती ( घ का ग?)

Reply
Manoj b durgavle May 10, 2021 at 9:16 PM

Zunya athvani la ujjala milala

Reply
Sadashiv D. Dongare May 11, 2021 at 3:49 PM

महादेव खूप छान लेख आहे वाचून जुन्या बालपणीच्या आठवणी ना उजाळा मिळाला,अत्ताच्या पिढीला कमीत कमी आंब्याच्या विविध प्रकारच्या जातींची ओळख करून दिली आहेस……. वाचताना क्षणभर गावी गेल्याचा आनंद भेटला .👌👍👍

Reply
Surendra Karyakarte May 10, 2021 at 9:14 PM

वाह वाह, छान लिहिले आहेस महादेव

Reply

Leave a Comment