July 27, 2024
Book review of Pivala Pivala pachola Anil Sabale book
Home » निरागस आणि कोवळीक संवेदनेची कथा
मुक्त संवाद

निरागस आणि कोवळीक संवेदनेची कथा

कथासंग्रहची निर्मिती हा स्वतंत्र दखल घ्यावा असा मुद्दा आहे. पुस्तकाचे लाड प्रकाशकांनी करावेत असे दिवस आता मराठीत आले आहेत, याचे सूचिन्ह दाखवणारी ही निर्मिती आहे. मुखपृष्ठ, कथेच्या प्रारंभी येणारे रंगीत कागदावरची रेखीव आणि बोलकी रेखाचित्र, मांडणी, कागद आणि छपाई या सर्वच बाबतीत हे पुस्तक संग्रही असावे, असे झाले आहे.

नंदकुमार मोरे

शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर

कोणत्याही साहित्यप्रकाराची व्याख्या करताना पडणाऱ्या प्रश्नांना काही निवडक कलाकृती कारणीभूत असतात. अनिल साबळे यांच्या ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहाबाबत असेच म्हणता येईल. पारंपरिक कथेबद्दलच्या धारणा बदलवणारे नव्या दमाचे काही कथाकार अलीकडच्या काही वर्षांमध्ये पुढे आले. त्यामध्ये आता अनिल साबळे यांच्याही नावाचा समावेश करता येईल.

‘पिवळा पिवळा पाचोळा’मधील कथा खरच ‘कथा’ या शब्दात सामावणाऱ्या आहेत काय ? या प्रश्नापासून या कथेबद्दल बोलता येईल. या संग्रहात समाविष्ठ असलेल्या आठही कथांचे निवेदन एक किशोरवयीन मुलगा करतो. तो एकच आहे असा वाटतो. त्यामुळे या कथा परस्परांत गुंफल्या तर ही एक सलग कथाही होऊ शकली असती असे या कथा वाचताना वाटत राहते. मराठी साहित्याला अपरिचित असलेल्या एका अनवट भूगोलात हा किशोरवयीन मुलगा मुक्तपणे जगतो आहे. त्याचे कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणे या कथांच्या केंद्रस्थानी आहे.

या कथांमध्ये जसा निवेदक एकाच वयातला आहे, तशा काही व्यक्तीरेखाही आवृत्त होत जातात. कदाचित त्यांची नावं बदलतात. परंतु, त्यांचा मन:पिंढ एकच आहे. त्यातून व्यक्तीरेखांमध्ये सेंद्रिय एकजीवता साधली जाते. पर्यायाने एका किशोरवयीन मुलाचे समृद्ध भावविश्व साकारणारी ही सलग एकच कथा वाटते. कथाकाराची निकोप जीवनदृष्टी या कथांमधील प्रत्येक व्यक्तीरेखेचं अंतरंग उजळून टाकते. कथाकार आजूबाजूचे वास्तव परखडपणे समोर ठेवण्याबरोबर आपल्या परिसराचा आत्मीय शोध घेतो. या कथेचा निवेदक ज्या आदिवासीबहुल प्रदेशाशी सलग्न जगतो, ते जगणं तो कौशल्यपूर्ण आणि नेमकेपणाने चिमटीत पकडतो.

निवेदक मुलाला जीवनाची अनिवार ओढ आहे. त्याचे कुतुहल हाच एक जीवनशोध आहे. त्याला पडणारे नानाविध प्रश्न जीवनाचा निरंतर शोध ठरले आहेत. पहिल्या कथेत ‘मी बोरीखाली बांधलेल्या वासरासारखा मान हलवत राहिलो,’ असे म्हणणारा मुलगा शेवटच्या कथेत नववीत नापास झाला आहे. स्वत:चा भाऊ आपल्या चुकीमुळं याला शोधण्यासाठी उलट्या वाऱ्यात सायकल हाणत खूप लांब गेलाय याचे त्याला मनापासून दु:खं झाले आहे. भिलहाटीलगत असलेल्या वस्तीत वावरणारा हा मुलगा जीवनावर मनस्वी प्रेम करतो. आपल्या सभोवतालशी एकरूप होऊन जगतो. माणसांवर नितांत प्रेम करतो. त्याची तीव्र कोमल संवेदना त्याला माणसांशी जोडत जाते. या निवेदक मुलाला सरड्यांना मारण्यासारखा एक अघोरी छंदही आहे. या त्याच्या अघोरी छंदासकट त्याचे भावविश्व हा आपल्यासाठी औत्सुक्याचा आणि चिंतनाचाही विषय आहे. गोल आंब्याच्या झाडाखाली अभ्यासाला बसणारा त्याचा समजूतदार भाऊ, त्याला मनस्वी जगू देणारे त्याचे आई-वडील हे जीवनावर नितांत श्रद्धा असलेलं एक नितळ कुटुंब हा कथाकार या निमित्ताने साकारतो. अर्थात हे मी कल्पिलेले एक सलग कथानक आहे.

वास्तविक प्रत्येक कथेत निवेदकाच्या आजूबाजूचे कुटुंबिय बदलतात. परंतु, आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ आणि बहिण या व्यक्तिरेखा येतातच. मित्र येतात. नाना प्रवृत्तीचे शिक्षक येतात. शाळा, वसतिगृह, आदिवासी, धनगर अशा वस्त्या आणि जंगलझाडीतल्या वाटा-वस्त्या येतात. अगदी मुंबईदेखील येते. त्या अर्थाने ही अनेकविध पातळीवरचे सामान्य माणसाचे जगणे शोधणारी समृद्ध कथा आहे. जंगलझडीत पारंपरिक जीवन जगणाऱ्या गरीब आदिवासी, धनगर वाड्यांवरच्या लोकांचा रोजगार बदलत्या काळात हिरावत गेला. त्यामुळे पोट मागे लागलेल्या या गरीब आणि हतबल समाजाची परवड ही कथा अधोरेखित करते.

या कथांचा निवेदक असलेला किशोरवयीन मुलगा एका अतुच्च्य पातळीवरची संवेदना व्यक्त करतो. ती व्यक्त करताना प्रतीत होणारी त्याची निरागसता हे या कथांचे बलस्थान बनले आहे. त्याची साधी, सुबोध आणि अनलंकृत भाषा हे देखील या कथांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. ही संवेदना कोणत्या पद्धतीची आहे, हे पाहण्यासाठी या कथांमध्ये पुष्कळ उदाहरणे उधृत करण्यासारखी आहेत. कथाकार ‘गळ’कथेत ‘बनाबाई’सारखी व्यक्तीरेखा ज्या पद्धतीने उभी करतो, ते पाहता त्याच्या संवेदनेचा पोत लक्षात येतो. हा कथाकार निवेदक मुलाच्या तोंडून, ‘माझ्या आजीच्या वयात असलेली बनाबाई मेंढीचा कान धरून तिला कुटलेल्या बेलांचं औषध पाजता पाजता त्या मेंढीसोबतच काहीतरी बोलत होती.

रानात कुठेही हिंडताना सापडेलेली खायाची वस्तू ती आजी मला लुगड्याच्या पदरात घालून खायला आणायची. दिवसभर मुलांच्या मेंढ्या वळून ती म्हातारी थकून जायची. दिवसभर रानात मेंढ्या चारूनसुद्धा त्या म्हातारीला कपभर चहा आपल्या मुलाकडून लवकर मिळत नव्हता.’ असे लिहितो तेव्हा वाचकाचे डोळे डबडबतात. माणसं कशी कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. या कथाही या शोधाचा एक भाग आहेत.

अनिल साबळे या कथाकाराला जीवनाचा काहीएक उलघडा झाला आहे. त्याला जीवनाचा, जगण्याचा अर्थही गवसला आहे. त्यामुळेच या कथांमधून हे जीवन उलघडण्याचा एक मार्ग त्यांनी चाचपडला आहे.

कथासंग्रहची निर्मिती हा स्वतंत्र दखल घ्यावा असा मुद्दा आहे. पुस्तकाचे लाड प्रकाशकांनी करावेत असे दिवस आता मराठीत आले आहेत, याचे सूचिन्ह दाखवणारी ही निर्मिती आहे. मुखपृष्ठ, कथेच्या प्रारंभी येणारे रंगीत कागदावरची रेखीव आणि बोलकी रेखाचित्र, मांडणी, कागद आणि छपाई या सर्वच बाबतीत हे पुस्तक संग्रही असावे, असे झाले आहे.

पुस्तकाचे नाव – पिवळा पिवळा पाचोळा (कथासंग्रह)
लेखक – अनिल साबळे
प्रकाशन – पपायरस प्रकाशन, कल्याण
पृष्ठ संख्या १९५, किंमत रु. ३००/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कृत्रिम बुद्धिमत्तेनेच इस्राईलचा घात केल्याची शक्यता !

पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने वकिलांना सुरक्षा अन् स्वातंत्र्य

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading