मान्सून बं. उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसापासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्यामुळे दिवसागणिक आतापर्यंतची मान्सूनची प्रगती व त्यामागे झालेला पाऊस ही कामगिरी काळजीपूर्वक जोखली जात आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याची शक्यता आहे.
माणिकराव खुळे
१- मान्सून कुठपर्यंत पोहोचला?
मान्सून आज कर्नाटक, आंध्रप्रदेशचा काही भाग काबीज करत गोव्यातून महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरीपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत प्रवेश केला. महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.
२- मान्सूनची आजची प्रगती पाहता खान्देश विदर्भ पर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?
आजपासुन, सोमवार दि. १० जूनपर्यंतच्या पाच दिवसादरम्यान दक्षिण अर्ध महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली तसेच पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा जालना बीड धाराशिव लातूर पर्यंतच्या ९ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता जाणवते.
मान्सून जेथे पोहोचला त्याच्यापुढे खरं तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते. परंतु त्या पद्धतीने कोसळतांना जाणवत नाही. त्यामुळे मान्सूनची प्रगती होतेय पण ती दमदारपणे होतांना दिसत नाही. शिवाय मान्सून बं. उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसापासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्यामुळे दिवसागणिक आतापर्यंतची मान्सूनची प्रगती व त्यामागे झालेला पाऊस ही कामगिरी काळजीपूर्वक जोखली जात आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी तेथे मान्सून पूर्व वळीव पावसाची अपेक्षा करू या!
३- उद्या शुक्रवार दि. ७ जूनपासून महाराष्ट्रात जिल्हावार जोरदार पावसाची तीव्रता कधी- कधी असु शकते.
(i) मुंबईसह संपूर्ण कोकणात उद्या शुक्रवार दि. ७ जूनपासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार दि. १४ जूनपर्यन्त तसेच
(ii)खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात उद्या शुक्रवार दि. ७ जूनपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. ११ जून पर्यन्त
(iii) मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उद्या व परवा शुक्रवारआणि शनिवारी दि. ७ व ८ जून ला दोन दिवस
(iv) विदर्भातील ११ जिल्ह्यात आज व उद्य, ६-७ जून ला,
अश्या पद्धतीने महाराष्ट्रात जोरदार पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात मात्र पावसाची ही कामगिरी अतिजोरदार असु शकते..
मान्सून आला म्हणजे काय?
नरेन्द्र चौधरी ( ९४२३७९१३६६ ) या शेतकऱ्याने ‘सर एक शंका आहे. मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? ‘ असा प्रश्न केला. याचे उत्तर असे…
मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस झालाच पाहिजे, असे नाही. पण मान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या मूळ उगमापासून वि्षुववृत्तावर (दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील पेरू, कोलंबिया, ईक्वेडोर देशापासून) समुद्रावरून अंदाजे एकोणवीस(१९०००)हजार किलोमीटर अंतर कापून वाहत येणारे व ते तुमच्या गांवापर्यन्त बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांचा प्रचंड प्रवाह वातावरणीय प्रणालीद्वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वि्षुववृत्त समांतर वाहता झाला, व त्या वाऱ्यांचा रस्ता मोकळा झाला, असेच समजावे.
म्हणून तर आपल्याकडे ४ महिने बाष्पयुक्त वारे नैरुक्तेकडून ईशान्यकडे वाहतात. आता ह्या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल, किंवा दमदार पणा असेल, तरच पाऊस होतो. अन्यथा नाही. अर्थात ही बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी होते, भरली जाते.
ऊर्जा कमी झाली तर फक्त मान्सूनी बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात. म्हणून त्यासाठी मान्सून वारे तुमच्या गांवापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. म्हणून तर कधी असे होते कि मान्सून आला, किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस होत नाही. मग शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटतं हा काय प्रकार आहे? आला म्हणतात, अन येथे तर चक्क उन्ह पडलीत? त्याचे उत्तर ह्या ऊर्जेत आहे.
यंदा तशी परिस्थिती आली तर काळजी करू नका. कारण यंदा ‘ ला- निना ‘ आहे, त्यामुळे बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असेल. त्यामुळे मान्सून प्रवाहादरम्यान ऊर्जा कमी झाली तर निसर्ग आपोआप भरण्याची व्यवस्था करतो.
माणिकराव खुळे




