March 21, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
need for study o avoid being cheated
Home » फसवणूक होऊ नये यासाठीच अभ्यासाची गरज
विश्वाचे आर्त

फसवणूक होऊ नये यासाठीच अभ्यासाची गरज

फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच व्यवहार करायला हवेत. यासाठीच व्यवहार ज्ञान शिकणे गरजेचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

तैसीं इयें कार्याकार्ये । धर्माधर्मरुपें जियें ।
तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ।। ७२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – अरे अर्जुना, परीक्षेची दृष्टि नसतां मोती घेतले तर योग्य सौदा झाला तर तो चुकूनच होणार, पंरतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखे व्हावयाचें.

कोणतीही वस्तू खरेदी करताना, ती योग्य आहे की अयोग्य आहे, हे पारखूनच घ्यावे. मोठ्या कंपनीचे नाव आहे म्हणून आपण वस्तू घ्यायला जातो अन् फसतो असेही प्रकार बऱ्याचदा होतात. वस्तुची पारख ही त्यासाठीच हवी. मोठ्या कंपन्यांच्या नावावरही आता फसवणूक होत आहे. फसवणूक झाल्यावर ग्राहक न्यायालय आहे पण, आम्ही म्हणतो फसायचेच कशाला ? फसवणूकीचे प्रकार काही आजचे नाहीत. हे पूर्वापार चालत आले आहेत. यासाठीच खरेदी करताना खात्री करूनच घेतलेले उत्तम.

कंपन्यांच्या जाहिरातींना भुलून काहीवेळेला आपण वस्तुंची खरेदी करतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण यात फसलो आहोत. यासाठी खरेदीचे व्यवहार करताना जागरूकता ही महत्त्वाची आहे. दक्ष राहून, जागरूक राहून खरेदी करायला हवी. दरवेळी आपण दक्ष असतोच असे नाही, पण फसगत होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्यायलाच हवी.

भौंदूबाबाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. काही ठिकाणी तर त्यांचे भक्तगणच त्यांच्या नावाचा प्रचार करून स्वतःची पोळी भाजून घेतात. काहींनी तर सध्या याचा व्यवसायच सुरू केला आहे. हे दृष्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सेवा-भक्ती अन् व्यवसाय यामध्ये फरक आहे. अध्यात्माचा व्यवसाय होऊ शकत नाही. अनेक मठात भक्तीच्या नावावर फसवणूक केली जात आहे. यासाठी आत्मज्ञानी संतांची खरी ओळख करून घेऊनच अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. आत्मज्ञानी संतांचेच शिष्यत्व पत्करायला हवे म्हणजे फसवणूक होणार नाही.

फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच व्यवहार करायला हवेत. यासाठीच व्यवहार ज्ञान शिकणे गरजेचे आहे. फसगत केंव्हा होते ? कशी फसगत होते ? हे आजकाल तर समजूनही येत नाही. फसवणूक झाल्यानंतरच आपल्या लक्षात येते. अशावेळी आपण कायद्याची मदतही घेऊ शकतो, पण बऱ्याचदा हे व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसूनच केले गेले असल्याचेही लक्षात येते. यासाठीच व्यवहारात पारख ही महत्त्वाची आहे.

जीवनात दक्षता ही यासाठीच महत्त्वाची आहे. दक्ष राहूनच व्यवहार करायला हवेत. यासाठीच अभ्यास हा महत्त्वाचा आहे. अध्यात्मात फसवणूक टाळायची असेल तर अध्यात्माचाही अभ्यास आपण करायला हवा. बाजारातील वस्तू घेतानाही बाजारपेठेचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. फसवणूक टाळायची असेल तर संबंधीत घटकाचा अभ्यास करायला हवा म्हणजेच परीक्षेत आपणास यशस्वी होत येईल.

Related posts

उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदुषण

मनुष्याने निमित्तमात्र होऊन, निष्कामतेने आणि तटस्थपणे कर्म करणे आवश्यक ( एआयनिर्मित लेख)

भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!