fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 21, 2026
Home » भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व
मुक्त संवाद

भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व

The subordination of women in linguistic practice

दिवाळीची सुट्टी होती. सगळी मुले मामाच्या गावी गेली. मग सुरू झाला दंगा ! अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. खेळता खेळता विनय पडला आणि गुडघ्याला खरचटले. तो रडू लागला. त्यावर गावाकडची सगळी मुले त्याला चिडवायला लागली, “काय रे, एवढंसं तरी लागलंय आणि मुलींसारखा रडतोस ! गड्यासारखा गडी आणि बायावानी मुळूमुळू काय रडतोस ?”

संध्याकाळच्या वेळी मुले आंधळी कोशिंबीर खेळत होती. खेळता खेळता विनय अंधारात गेला. शेतातली वस्ती असल्यामुळे जास्तच अंधार जाणवत होता. कुणाचाच आवाज येईना म्हणून त्याने डोळ्यांवरची पट्टी काढली. सगळीकडे अंधार पाहून तो घाबरला आणि किंचाळला, “आईऽऽ” पुन्हा मुले चिडवायला लागली, काय बायांसारखं घाबरतोस, गडी हाईस की लेका!”

खेळता खेळता मुलांची भांडणे झाली आणि गल्लीतल्या दुसर्‍या एका मुलाने विनयच्या कानाखाली मारली. त्यामुळे तो रडत रडत घरी गेला. यावर बाबा म्हणाले, “तुझ्या हातात काय बांगड्या भरल्या होत्या का? तू पण एक सणकवायची होती की! असा रडत येण्यापेक्षा दोन हाणून यायला हवं होतंस तू. बाईसारखा मार खाऊन घरी आलास!”

यांसारखी अनेक वाक्ये आणि प्रसंग आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो, पाहात असतो, ज्याच्यातून स्त्रीत्वाचा अपमान केला जातो. पुरुषाने बायकांसारखं वागणं कमीपणाचं मानलं जातं. उलट एखादी बाई पुरुषासारखी वागत असेल तर तिचे कौतुक केले जाते. मर्द असणं म्हणजे काहीतरी अभिमानास्पद आणि बाईसारखं असणं अपमानास्पद असतं, हे आपण मुलांवर बिंबवत असतो. म्हणून तसं मुलांनी वागायचं नसतं हे आपण मुलांना बजावत असतो, तसे संस्कार त्यांच्या मनावर घडवत असतो. त्यामुळे मुलांच्या मनात पक्कं होतं की, बाई असणं म्हणजेच काहीतरी वाईट प्रकरण आहे.

एखाद्या पुरुषाचा अपमान करण्यासाठी किंवा त्याची नाकर्तबगारी निदर्शनास आणून देण्यासाठी जाहीरपणे ‘अमुक अमुक होत नसेल तर बांगड्या भरा, साड्या नेसून घरात बसा’ असा टोमणा मारला जातो. म्हणजे नाकर्तबगार असणं हे बाईपणाचं लक्षण. आणि बांगड्या भरणारे हात नाकर्तबगार, लायकी नसलेले असतात असेच दर्शवायचे असते. हे कितपत खरे आहे ?

साडी नेसणं, बांगड्या भरणं, केस वाढवणं, नटणं, लाजणं, घाबरणं, रडणं, नाकर्तबगार असणं या ‘बायकी’ गोष्टी आहेत. परिणामी त्या हीन दर्जाच्या आहेत. अशा धारणा पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या आहेत. या पुरुषी मानसिकतेचे संस्कार पुढे तो मुलगा मोठा झाला की पुढच्या पिढीला देत राहतो आणि कितीही पिढ्या बदलल्या तरी या स्त्रीत्वाशी निगडित संकल्पनांना सन्मान मिळत नाही, उलट त्या त्या पिढीत त्याची टिंगल करत उपमर्दच केला जातो.

आणखी एक गोष्ट समाजात पाहायला मिळते, पुरुषांनी रडायचे नसते. त्याने नेहमी खंबीर, कणखरच असायला हवे. खरे तर पुरुषांवरही हा अन्यायच आहे. भावना सर्वांनाच असतात. दुःख झाले की रडू येणे नैसर्गिक आहे. जनरली समाजात बायकाच रडत असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे पुरुषाने रडायचे नसते, असे बालपणापासूनच मुलांवर बिंबवले जाते त्यामुळे सहसा पुरुष रडत नाहीत. घाबरणार्‍या पुरुषाला ‘भित्री भागूबाई’ असे म्हणत चिडवले जाते. गंमत म्हणजे ‘भित्री भागूबाई’ असे मुलालाच चिडवले जाते, मुलींना असे कधी चिडवत नाहीत.



समाजात वावरताना सगळे समान; पुरुष, स्त्री असा या त्यामध्ये भेद करण्याची गरजच नसते, पण तसं करून कसं चालेल? आपण पुरुषसत्ताक समाजात राहतो. सत्ताधार्‍याने दुय्यमांचे अनुकरण करायचे नसते, अधिकार गाजवायचा असतो, इतरांना हीन लेखल्याशिवाय आपले मोठेपण सिद्ध करता येत नसते. मग सर्वांत सोपा, ताब्यात ठेवता येणारा आणि तालावर नाचवता येणारा समाजातला घटक म्हणजे स्त्री.

तिला अंकित ठेवण्यासाठी तिच्याबद्दल निरनिराळे प्रवाद उठवायचे. बायांच्या पोटात काही राहात नाही, बायका चहाड्या करतात, असे म्हणत बायकांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण करायचे. कुठला पुरुष दुसर्‍या पुरुषाबद्दल खाजगीत दुसर्‍याला सांगत नसतो का? सांगतो. मग बायकांचीच बदनामी का केली जाते? आईचं ऐकणारा ‘मम्माज बॉय’ असतो आणि पत्नीचं ऐकणारा ‘जोरू का गुलाम’ असतो. याचा अर्थ बाई- मग ती आई असो किंवा पत्नी- तिचं ऐकायचं नसतं. बायकांना काय अक्कल नसते, त्यामुळे व्यवहारात बोलताना बायकांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेणे ग्रामीण भागात कमीपणाचे समजले जाते. ‘आम्ही बायांच्या डोक्यानं चालत नसतो’ किंवा ‘आमच्या घरातल्या बाया पुरुषांच्या मध्ये बोलत नाहीत’ असं मोठ्या बडेजावीने काही पुरुष सांगतात, हे कशाचे प्रतीक आहे?

मला एक प्रश्न पडतो, खरंच बाई असणं इतकं वाईट असतं का हो ? का बरं ते वाईट असतं ? ते वाईट असण्याला कोण जबाबदार आहे ? त्या करतात त्या कामांमुळे बायका दुय्यम ठरतात का ? ती कामे त्यांच्यावर कुणी लादली ? बायांनाही त्या करतात ती कामं आवडत नाहीत, परंतु ती बायांनी नाही केली तर कोण करणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत. आणि जर बाई असणं वाईट नसेल तर का नावे ठेवता बाईसारखं असण्याला? जगप्रसिद्ध लेखिका सिमोन दि बोव्हुआर तिच्या ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकात म्हणते की, ‘स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते.’ त्याप्रमाणे स्त्रीला हा पुरुषसत्ताक समाजच स्त्री म्हणून घडवतो आणि वर नावे ठेवतो. मग बाईने कसं जगावं?

हे कुठेतरी थांबायला हवे. भाषिक व्यवहारात स्त्रीत्वाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्त्रीशी निगडित असणार्‍या प्रत्येक बाबीचा आदर आपण स्वतः आधी केला पाहिजे आणि नंतर आपल्याबरोबरच्या मुलामुलींना हे शिकवलं पाहिजे. स्त्री असणं हे वाईट नाही आणि निसर्गतःच स्त्री आणि पुरुषांची निर्मिती झालेली आहे, हे आपण मुलांच्या लक्षात आणून द्यायला हवं. भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, फरशी पुसणं, झाडून काढणं, घरातल्यांची सेवा करणं यांसारखी अनेक कामे पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीवर लादलेली आहेत. ती कामे कधीच स्त्रियांची नव्हती. उलट तिला ती कामे तिचीच मानायला लावून, वर असली कामे हलकी ठरवून तिच्यावर एक प्रकारे अन्यायच केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही कामांना लिंगभाव चिकटवून त्या कामाचा दर्जा घसरवणं थांबवायला हवं.

पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये लिंग सोडले तर इतर कुठल्याही बाबीत भिन्नत्व नाही. ज्या भावना स्त्रीला, त्याच पुरुषाला असतात. विनाकारण त्यांची वर्गवारी करून, अमुक करणं, अमुक प्रकारे दिसणं बाईपणाचं लक्षण वगैरे खुळचट कल्पनांमधून आपण स्वतः आधी बाहेर पडू या आणि मुलांना यामधून बाहेर काढू या. समाजाच्या निकोप वाढीसाठी एकमेकांचा सन्मान करणे आपल्या कृतीतून आपण मुलांना शिकवायला हवे. यासाठी आपल्या भाषाव्यवहारात स्त्रीवाचक शब्दांचा पुरुषांना हिणवण्यासाठी वापर करण्याचे थांबवू या.

Related posts

Neettu Talks : निरोगी त्वचेसाठी कोणते पदार्थ खाण्यात असावेत ?

काका एक देवमाणूस…

ताराबाईंविषयीचे पूर्वग्रह दूर करणारे पुस्तक – मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!