ऐश्वर्य पाटेकर, अशोक सोनवणे , जितेंद्र कुंवर, सुनील गायकवाड यांना पुरस्कार
जळगाव – मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या वाडःमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार २०२६ ऐश्वर्य पाटेकर आणि अशोक नीलकंठ सोनवणे यांना विभागून, तर प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेश स्तरीय वाडःमय पुरस्कार २०२६ जितेंद्र कुंवर आणि सुनील गायकवाड यांना विभागून जाहीर झाला आहे.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्यिक होते. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या या योगदानाच्या स्मरणार्थ प्राचार्य किसन पाटील यांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानपरंपरा स्थापन करून दरवर्षी वाडःमय पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा – जामनेर तर्फे पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीपासून श्रीकृष्ण शोभा फाऊंडेशन यांचे तर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. दर वर्षी आलटून पालटून एका वाडःमय प्रकारासाठी हे पुरस्कार दिले जातात.
ह्या वर्षीच्या पुरस्कारांसाठी कथासंग्रह या ग्रंथांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ असे आहे. त्यासाठी ऐश्वर्य पाटेकर (निफाड) यांच्या “बाभुळकांड” आणि अशोक नीलकंठ सोनवणे ( चोपडा) यांच्या “ फिरो घाणा निरंतर” या कथासंग्रहांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दोन्ही साहित्यिकांना विभागून दिला जाणार आहे तर खानदेश स्तरीय पुरस्कार जळगाव येथील उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुंवर यांच्या “ झिलप्या “ आणि सुनील गायकवाड (भडगाव) यांच्या “ भिलाटी “ या कथासंग्रहांसाठी जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे खानदेश स्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे.
सन 2021 पासून हे पुरस्कार दिले जातात. 2021 साली कथा : मनोहर सोनवणे (पुणे), युवराज पवार , 2022 साली कविता: पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी(नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव) आणि 2023 साली कादंबरी: ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल) यांना वाड:मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले. 2024 साली बालसाहित्य वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), नीता शेंडे (पाचोरा), 2025 साली डॉ. सुरेश सावंत (नांदेड), डॉ. अनंता सूर (यवतमाळ), डॉ. प्रकाश सपकाळे (जळगाव) आणि डॉ . नरेंद्र बापूजी खैरनार ( साक्री ) यांना पुरस्कार देण्यात आले.
२०२६ या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून लवकरच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषद, पाचोरा शाखेचे कार्यवाह प्रा. डॉ. वासुदेव वले, जामनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक कौतिक कोळी आणि श्रीकृष्ण शोभा फाऊंडेशनचे अध्यक्ष मयूर किसनराव पाटील यांनी कळविले आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
