चिंतामणराव देशमुख यांनी देशाच्या अर्थकारणाला दिशा दिली: नितीन गडकरी
ज्ञानेश्वर मुळे यांना दिल्लीत पहिला चिंतामणराव देशमुख पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : समाजाच्या, देशाच्या विकासात द्रष्टेपणा असला पाहिजे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेक असतात. मात्र प्रवाहाविरुद्ध चालणारे जिवंत राहतात असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनात लोकाभिमुखता हा महत्वाचा गुण आहे. सामाजिक जाणिव आणि संवेदनशीलपणा ठेवून त्यांनी काम केले, माजी परराष्ट्र मंत्री, दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनीही ज्ञानेश्वर मुळे यांचे कौतुक केल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
राजधानी दिल्लीत २१/२२/२३ फेब्रुवारी २०२५ मध्ये ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने पहिला चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय आणि साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल एन. एन. व्होरा होते. नितीन गडकरी म्हणाले की, दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज पहिला कार्यक्रम होत आहे. त्यात पहिला पुरस्कार एका कर्तबगार मराठी अधिकाऱ्याला, साहित्यिकाला मिळतो, याचा अभिमान आहे. कोल्हापुरात जन्माला आलेल्या मुळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले, असे गौरवोद्गारही नितीन गडकरी यांनी ज्ञानेश्वर मुळे यांच्याबद्दल काढले.
निवृत्त तेव्हा व्हावे…
एक उदाहरण देत नितीन गडकरी म्हणाले की, निवृत्त तेव्हा व्हावे जेव्हा लोकांना वाटते की आपण निवृत्त होऊ नये, आपण कधी एकदा निवृत्त होतो असे कोणाला वाटू नये. एन. एन. व्होरा म्हणाले की, चिंतामणराव देशमुख यांना अनेकदा भेटण्याचा मला योग आला माझ्या प्रशासकीय आयुष्याला त्यांनी प्रभावित केले तसेच मी सरहदचे काम २० वर्ष पाहिले आहे, त्यांनी पंजाब आणि काश्मीरमध्ये चांगल्या संकल्पनासंह अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत उत्तम काम केले आहे तर आजचे प्रमुख पाहुणे असलेल्या गडकरींनी देशातील अनेक वर्षापासून रखडलेले प्रकल्प मार्गी लावले त्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे असेही ते म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक छोट्याशा गावात जन्माला आलेल्या व्यक्तीचा आज सत्कार होत आहे. चिंतामणराव देशमुख यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या नावाने हा पुरस्कार मिळतो, ही गौरवाची गोष्ट आहे. ते माझे आदर्श आहेत. जगाच्या पाठीवर अनेक देशात काम करण्याची संधी मिळाली. कुठलेही काम टीमवर्कने होते, आयुष्यात ते करण्याचा प्रयत्न केला. यापुढील आयुष्य चांगुलपणाच्या चळवळीसाठी द्यायचे आहे, असेही मुळे म्हणाले.
ज्ञानेश्वर मुळे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे जपान, रशिया, सिरिया, मालदीव, अमेरिका येथे राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. जगभरातील राष्ट्र प्रमुखांशी व्यक्तिगत संपर्क आलेले मुळे यांनी मराठी तरूणांनी भारतीय प्रशासकीय सेवेते यावे, यासाठी ‘पुढचे पाऊल’ तसेच चांगूलपणाची चळवळ यासाठी समर्पित केला आहे. दिल्लीतील मराठी अस्मितेसाठी त्यांनी केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीची गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र व ५१ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लेशपाल जवळगे, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, अतुल बोकरिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
