आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
१-दिवाळी दरम्यानचा पाऊस –
बुधवारी ( ता. १५ ऑक्टोबर) ते सोमवार ( ता. २० ऑक्टोबर नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
२- दोन दिवस पावसाचा प्रभाव अधिक-
त्यातही विशेषतः दोन दिवसा दरम्यान म्हणजे बुधवार-गुरुवार दि. १५-१६ ऑक्टोबर ला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.
३-मान्सून ची शेवटची ही दोन आवर्तने-
रब्बी हंगामातील चौथ्या आवर्तनातील शेवटच्या चरणातील कालावधीत तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील पाचव्या व शेवटच्या आवर्तनातील अपेक्षित पावसाचे स्वरूप पाहता, रब्बीच्या लागवडी व शेतकामासाठी हा पाऊस लाभदायीच ठरू शकतो, असे वाटते.
४-मान्सून च्या परतीच्या पासाची सध्य:स्थिती-
मान्सून ने आज त्याच्या परतीच्या प्रवासात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा ओलांडून कर्नाटक तेलंगणा पश्चिम बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे.
त्याची आजची सीमा रेषा कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, कांकर, केओंझघर सागर, आयलंड, गुवाहटी शहरातून जात असुन देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी ८५ टक्के भागातून मान्सून परतलेला आहे.
दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी १५ ऑक्टोबर च्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित १५ % भुभागावरून मान्सून परतेल, असे वाटते.
