आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही. याचे कारण काय ?
माणिकराव खुळे – तामिळनाडू राज्यात घुसलेले ‘ फिंजल ‘ चक्रीवादळ भू-भागावरच क्षीणतेकडे झुकल्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याचे अवशेष अरबी समुद्रात प्रवेशले, तरीदेखील ते तीव्र होवु शकले नाही. ते विरळ होवून सोमलियाकडे निघून गेले. त्यामुळे अपेक्षित भाकिताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवला नाही.
प्रश्न – येत्या तीन दिवसातील वातावरण कसे असेल ?
माणिकराव खुळे – संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार दि. ७ डिसेंबर पर्यन्त केवळ ढगाळलेलेच राहून, झालाच तर सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अश्या दहा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
प्रश्न – येत्या तीन दिवसातील तापमाने कसे राहील ?
माणिकराव खुळे – सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीइतके म्हणजे ३० तर पहाटे ५ चे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ डिग्रीने अधिक म्हणजे २० डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे.
तर मुंबईसह कोकणात दुपारी ३ चे कमाल तापमान ३१ ते ३४ तर पहाटे ५ चे किमान तापमान २४ ते २६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाली आहे.
प्रश्न – थंडीला केव्हा सुरूवात होईल ?
माणिकराव खुळे – सोमवार दि. ८ डिसेंबर पासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
सोमवार दि. ८ ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर पर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पहाटे ५ चे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ डिग्री सेंटीग्रेड पर्यन्तही घसरू शकतो.
मुंबईसह कोकणातील पहाटे ५ चे किमान तापमान ही सध्या पेक्षा घसरून १८ ते २० डिग्री सेंटीग्रेड पर्यन्त घसरण्याची शक्यता जाणवते.
