fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 14, 2026
Home » असो चैतको मयना’ हा कलाली बोलीतील हृदयस्पर्शी कविता संग्रह – कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर
काय चाललयं अवतीभवती

असो चैतको मयना’ हा कलाली बोलीतील हृदयस्पर्शी कविता संग्रह – कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर

डॉ. रामदास चवरे यांच्या ‘असो चैतको मयना’ या कलाली बोलीतील पहिल्या काव्यसंग्रहाचे नाशिक येथे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

नाशिक – “डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कलाली (कलारी) बोलीतील पहिलाच काव्यसंग्रह असून, तो रसिकांच्या मनाला साद घालणारा आहे. या कवितासंग्रहातील शब्दांचे हृदयस्पर्शी नाद आणि जीवनाची विविध रूपे प्रभावीपणे साकार होत जातात,” असे गौरवोद्गार मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.

डॉ. आवलगावकर पुढे म्हणाले की, मराठीतील विविध बोलींपैकी समजल्या जाणाऱ्या कलाली बोली बोलणाऱ्यांची महाराष्ट्र व इतर राज्यातही बरीच संख्या आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी, गीतकार, समीक्षक, संशोधक असलेल्या प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांच्या 75 कवितांचा प्रस्तुत कविता संग्रह कलाल समूहाचे दु:ख, दैन्य, वेदना, विविध न्यास यांचा तलस्पर्शी आविष्कार ठरावा. ” महाराष्ट्र शासन व मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, अमरावती यांच्यावतीने नाशिक येथे झालेल्या बोली अभ्यासक कार्यशाळेत या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.

यावेळी व्यासपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, भाषा संचालक अरुण गिते, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक मराठी भाषा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुबोध भांडारकर हे उपस्थित होते.

असो चैतको मयना हा कलाली भाषेतील पहिलाच कवितासंग्रह म्हणावा लागेल. कलालीसारख्या लहान-लहान पोटभाषांमुळेच मराठी समृद्ध झाली आहे. अशा प्रयत्नांना सवंग लोकप्रियता मिळाली नाही, तरी त्यांचे महत्त्व कमी ठरत नाही. ह्यामुळे पुढच्या पिढ्यांचे मार्गदर्शन होते. डॉ. रामदास चवरे यांनी हे एक मोठे ऐतिहासिक काम केले आहे. आपला स्वतःचा किंवा स्वतःच्या भाषेचा विशाल ठसा मराठीत उमटेल अशी खास शैली तयार करावी.

भालचंद्र नेमाडे

कलाली यो बोली भाषेविषयी….

‘कलाली’ भाषेची आपली अशी वेगळी गोडी आहे. ‘कलाल’ या जातीवाचक शब्दावरून ‘कलाली भाषा’ ही संज्ञा आली. खरेतर जी बोलली जाते व जिला लिपी नाही, ती ‘बोली’. त्या अर्थाने ‘कलाली बोली’ हे संबोधनही योग्य. इतर जातींमध्ये जशा अनेक पोटजाती आहेत, तशाच कलालांमध्येही आहेत. मरठे, साव, झरिया, डहरवाल, चौकसे, मालवीय, सूर्यवंशी, शिवहरे, सोनकर, जयस्वाल, कोसरे, जैन, इत्यादींचा त्यात समावेश होतो. ‘कलार’ आणि ‘कलाल’ हेही एकच. प्रदेशपरत्वे कलालांच्या बोलीभाषेत भिन्नत्व आहे. ‘दर कोसावर पाणी आणि बारा कोसांवर वाणी बदलते’ म्हणतात. कलालीच्या बाबतीतही त्याचा प्रत्यय येतो. ही बोली महाराष्ट्र व मध्यप्रदेशात बोलली जाते.

कलालांचे जीवन पूर्वी निम्नस्तरीयच होते. ते प्रामुख्याने मोलमजुरी व शेतीमातीची काम करून जगत होते. आज ते इतर जातींप्रमाणेच आपापल्या परीने शिक्षण, नोकरी-व्यवसाय करतात. महाराष्ट्रापुरता विचार केला, तरी प्रदेशानुसार कलाली बोलीत वेगळेपणा आहे. विदर्भात वर्धा नदीच्या पूर्वेकडील भागाला ‘झाडीपट्टी’ आणि पश्‍चिमेकडील भागाला ‘वऱ्हाड’ म्हणतात. वऱ्हाडात यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

वऱ्हाडातील कलाली बोली ही पूर्व विदर्भ- म्हणजे झाडीपट्टीतील बोलीपेक्षा काहीशी वेगळी आहे. पूर्व विदर्भातील कलाली बोलीत एखाद्-दुसरा झाडी बोलीतील शब्द, तसेच काही हिंदी शब्द येतात. तर वऱ्हाडातील कलाली बोलीत वऱ्हाडी शब्द डोकावतात. उदा. ‘वा छकळाने बठखे गावखे गयी’ (ती छकळ्यात बसून गावी गेली.) यातील ‘छकळा’ (लहान बैलगाडी) हा निखळ वऱ्हाडी शब्द. बैलगाडी किंवा बैलबंडीऐवजी, दोन-तीन माणसे बसू शकतील असा ‘छकळा’ हा वाहनाचा प्रकार. आज जागतिकीकरणाच्या झंझावातात अशा अनेक गोष्टी अनोळखी झाल्या आहेत. कलालांमध्ये तुलनेने शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. परंपरेचा पगडा अधिक. ‘स्त्री म्हणजे अशिक्षित. चूल आणि मूल हे तिचे विश्‍व. तर पुरूष उच्च, श्रेष्ठ,’ हा भाव काही वाक्प्रचार आणि म्हणींमध्ये दिसतो.

मराठी महिन्यांची नावे कलाली बोलीत ‘चईत, बैसाक, ज्येस्टो,’ अशी होतात. कलाली बोलीत साहित्यनिर्मिती झालेली नाही, परंतु लोकगीते व लोकसाहित्य आहे. लग्न किंवा उत्सवप्रसंगी ही लोकगीते म्हटली जातात. कलालांमध्ये रक्षाबंधनाचा सण दिवाळीपेक्षाही उत्साहात साजरा होतो. तेव्हा ग्रामीण भागांतील मुली व स्त्रिया डोक्यावर भुजल्यांच्या टोपल्या (गव्हाची रोपे असलेल्या टोपल्या) घेऊन पाणवठ्यांवर जातात. जाताना बोलीभाषेतील लोकगीते गातात. या दिवशी सर्वजण नृत्य करतात. हा एक आनंदोत्सवच असतो.

मध्यप्रदेशात इंदूर, उज्जेन, जबलपूर, भोपाळ, छिंदवाडा, बऱ्हाणपूर, रतलाम, सागर, सटणा, सिवनी, देवास, खंडवा, ग्वाल्हेर, पांढुर्णा इ. ठिकाणचे कलाल, हे कलाली बोलीइतकीच; किंवा काकणभर अधिकच हिंदीचा अवलंब करतात. तर महाराष्ट्रात नागपूर, भंडारा, गोंदिया, या जिल्ह्यांना लागून मध्यप्रदेशाची सीमा असल्यामुळे येथील कलालांच्या बोलीतही पुष्कळ हिंदी शब्द येतात. महाराष्ट्रातील शिक्षित कलाल माणूस प्रामुख्याने मराठीचा वापर करतो. त्यामुळे ही बोलीभाषा संकोच पावत आहे. वडीलधारी मंडळी आपसांत बोलताना कलालीत बोलतात.

कलालांविषयी सात-आठशे वर्षांपूर्वीची माहिती दिसून येते. ‘लीळाचरित्र’ या मौलिक ग्रंथात त्याचे संदर्भ दिसतात. ‘प्रधान तो रात्री भाटी पोतीतु होता. तवं प्रकासा भरले. कालाळी उठीली. तव प्रकासा घर भरले असे. तिया कलाळाते उठविले.’ तत्कालीन व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या मराठीतील ही रचना आहे. येथे ‘कलाल’ऐवजी ‘कालाळ’ शब्द दिसतो. कलाली बोली मराठी व हिंदीहून वेगळी आहे आणि तिच्यातील संवाद ऐकताना पुरेशी अर्थनिष्पत्ती होत नाही. तरी ती दुर्बोध नाही. महाराष्ट्रात कलालांचे स्थलांतर उत्तर भारतातून झाले आहे. त्यांच्या बोलीवरून व रितीरिवाजांवरून याची साक्ष पटते.

Related posts

महाराष्ट्र हवामान बदलाशी सुसंगत विकास साध्य करणारे एक आघाडीचे राज्य

मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!