fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 6, 2026
Home » इथेनॉल मिश्रित पेट्रोल : ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग की अन्नसुरक्षेचे नवे आव्हान?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

इथेनॉल मिश्रित पेट्रोल : ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग की अन्नसुरक्षेचे नवे आव्हान?

India's shift to E20 ethanol blended petrol aims to reduce oil imports and emissions, but raises concerns over food security, crop patterns and fuel efficiency.

शाश्वत भारतासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल

देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. १ एप्रिल २०२६ पासून देशभरात ई-२० पेट्रोल अनिवार्य करण्यात आले असून, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे, शेतकऱ्यांना नवे उत्पन्न स्रोत उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र, धान्याधारित इथेनॉल उत्पादनामुळे अन्नसुरक्षा, पीकपद्धतीतील बदल आणि इंधन कार्यक्षमतेसारख्या प्रश्नांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल हे भारताच्या शाश्वत विकासाचे प्रभावी साधन ठरू शकते, परंतु त्यासाठी अन्न व इंधन यांच्यातील समतोल राखणारे दूरदृष्टीचे धोरण आवश्यक ठरणार आहे.

प्रा. डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य,
विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

भारतात सर्वप्रथम २००१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलची सुरुवात झाली आणि जानेवारी २००३ मध्ये ५ टक्के मिश्रणाच्या उद्दिष्टासह इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम औपचारिकपणे सुरू केला. नंतर काही वर्षांत इथेनॉल मिश्रणाचा आराखडा वेगाने विकसित होत आहे. जून २०२२, देशाने निर्धारित वेळेच्या आधीच आपले १० टक्के इथेनॉल-मिश्रणाचे उद्दिष्ट यशस्वीरित्या गाठले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या फेब्रुवारी २०२६ च्या निर्देशानुसार,
१ एप्रिल,२०२६ पासून ई २० पेट्रोल (२० टक्के इथेनॉल मिश्रण) हे देशभरातील सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर पुरवले जाणारे अनिवार्य मानक इंधन बनले. भारतीय मानक ब्युरोने ई २२, ई २५, ई २७, ई ३० यांसारख्या आणखी उच्च इंधन मिश्रणांसाठीची विनिर्देश अधिकृतपणे अधिसूचित केली, जे सरकारच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षा योजनांचे संकेत देतात.

पेट्रोलमध्ये इथेनॉल का मिसळले जाते?

वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी, महागड्या कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादित जैवइंधनाचा वापर करून, सरकारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासोबतच कृषी विकासाला चालना देऊ शकतात.
इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळण्याचे प्रमाण जगभरात वेगाने वाढत आहे. ब्राझीलमध्ये जवळपास ८० टक्क्यांपर्यंत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. ब्राझीलमध्ये फ्लेक्स-इंधन वाहने वापरली जातात. अमेरिकेत १० ते १५ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण केले जाते. कॅनडा सामान्यतः १० टक्के ते १५ टक्क्यांपर्यंत, तर युरोपातील अनेक देशांमध्ये ५ टक्के ते १० टक्कांच्या दरम्यान इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये केला जातो.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे फायदे काय ?

भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व त्याच्या एकूण देशांतर्गत वापराच्या जवळपास ८८ टक्के ते ८९ टक्कापर्यंत पोहोचले आहे. सध्या दरमहा भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च सुमारे १.५३ लाख कोटी रुपये ते १.७७ लाख कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरणे ही काळाची गरज आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्याने इथेनॉल उत्पादनाचा विस्तार कृषी क्षेत्राला आधार देतो आणि ग्रामीण रोजगाराला व तेथील अर्थव्यवस्थेला चालना देतो.

इथेनॉल हे ऊस आणि मका यासारख्या पिकांपासून मिळवलेले एक नवीकरणीय जैवइंधन आहे, ज्यामुळे मर्यादित जीवाश्म इंधनांचे संवर्धन करण्यास मदत होते.इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असतो, ज्यामुळे इंधनाचे ज्वलन अधिक पूर्णपणे होते. त्यामुळे कार्बन मोनोऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्ससारखे विषारी प्रदूषक लक्षणीयरित्या कमी होतात. इथेनॉलच्या ज्वलनादरम्यान बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांद्वारे शोषला जातो, त्यामुळे एक बंद कार्बन चक्र तयार होऊन वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. इंधनाचे ऑक्टेन रेटिंग (पेट्रोलची इंजिनमधील ज्वलन क्षमता; ऑक्टेन नंबर जितका जास्त, तितके इंधन अधिक स्थिर असते आणि त्यामुळे इंजिनचा आवाज व नुकसान टळून कार्यक्षमता वाढते) वाढवण्यासाठी प्रामुख्याने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते.

भारतात इथेनॉल कशापासून बनते ?

भारतात इथेनॉल प्रामुख्याने ऊस, काकवी (मोलॅसिस), मका, खराब झालेले धान्य (उदा. नासलेला तांदूळ/गहू), आणि ज्वारी-बाजरी यांसारख्या शेती उत्पादनांपासून बनवले जाते. भारतात मका, भारतीय अन्न महामंडळाकडील अतिरिक्त तांदूळ आणि तुटलेला तांदूळ,गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांचाही वापर धान्याधारित इथेनॉल प्रकल्पांमध्ये केला जातो. आता नवीन तंत्रज्ञानानुसार (२ जी) शेतातील उरलेला कचरा, पेंढा आणि बांबू यांसारख्या घटकांपासूनही इथेनॉल बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतात १ लिटर इथेनॉलची किंमत त्याच्या ग्रेड, अपेक्षित वापर आणि उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताच्या इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमांतर्गत, तेल विपणन कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या इंधन-दर्जाच्या इथेनॉलसाठी, सरकार निश्चित एक्स-मिल खरेदी किंमती ठरवते.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे तोटे आहेत का ?

धान्यापासून (उदा. मका, तांदूळ) इथेनॉल बनवल्यामुळे अन्नसुरक्षेवर धोका निर्माण होऊ शकतो. आर्थिक सर्वेक्षण आणि कृषी तज्ज्ञांच्या मते, इंधनासाठी धान्याचा वापर वाढल्याने पीक पद्धती बदलून अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याला व तांदळाला चांगला व निश्चित दर मिळत असल्याने, शेतकरी कडधान्ये आणि तेलबियांसारखी पिके सोडून मका पिकवण्याकडे वळू शकतात. यामुळे अन्नधान्य उत्पादनात असमतोल निर्माण होऊ शकतो. पोल्ट्री (कोंबडी पालन) आणि दुग्ध व्यवसायासाठी लागणारा मका इथेनॉल कारखान्यांकडे वळू शकतो. अन्न विरुद्ध इंधन संघर्ष निर्माण होण्याचा धोकाही संभवतो. जागतिक स्तरावर किंवा देशात दुष्काळ अथवा अन्नटंचाईच्या काळात हा संघर्ष गंभीर रूप धारण करू शकतो.

इथेनॉलमध्ये शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत प्रति एकक आकारमानात अंदाजे ३० टक्के ते ३४‌ टक्के कमी ऊर्जा असते. यामुळे इंधन कार्यक्षमतेत लक्षणीय घट होते (मायलेज कमी मिळतो).

इथेनॉल मूळतःच क्षरणकारक (रासायनिक अभिक्रिया घडवून आणून इतर पदार्थांना नष्ट करण्यास सक्षम) आहे, त्यामुळे अल्कोहोल-आधारित इंधन हाताळण्यासाठी डिझाइन न केलेल्या जुन्या इंधन प्रणालींमधील रबर होसेस, गॅस्केट्स आणि धातूच्या घटकांना नुकसान पोहोचवू शकते.

इथेनॉल आर्द्रताशोषक आहे, म्हणजेच ते हवेतील ओलावा आकर्षित करून शोषून घेते. जेव्हा पेट्रोलमध्ये इथॅनॉल मिसळलेले असते आणि त्यात पाण्याचा संपर्क येतो, तेव्हा पाणी आणि इथॅनॉल एकमेकांत मिसळून पेट्रोलपासून वेगळे होतात आणि टाकीच्या तळाशी बसतात. यामुळे गाडी चालू व्हायला त्रास होतो किंवा इंजिन नीट चालत नाही.

जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित केले जाते व हे इथेनॉल धान्यापासून निर्माण केले जाते. तेव्हा इंधन पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन वापरल्याने जंगलतोड, जमिनीची धूप आणि जागतिक अन्न पुरवठ्यावर वाढता दबाव येऊ शकतो.

भारत आपल्या एकूण गरजेच्या सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आयात करतो व देशाची दैनंदिन इंधन मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज सुमारे ५५ लाख बॅरल्स कच्च्या तेलाची आवश्यकता असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आयातीचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर हा सध्यातरी सर्वोत्तम उपाय आहे. पण त्यामुळे होणाऱ्या संभाव्य अन्नसुरक्षेवर शाश्वत उपाय म्हणून, भारतीय खाद्य महामंडळाकडे (एफसीआय) सडलेले अतिरिक्त तांदूळ किंवा खराब झालेले अन्नधान्य, तसेच ऊस (मळी), बांबू आणि शेतातील उरलेला कचरा यासारख्या अखाद्य स्त्रोतांचा वापर इथेनॉल बनवण्यासाठी करणे हे गरजेचे आहे.

Related posts

कोल्हापूरचे विनायक हेगाणा यांचा मानद डॉक्टरेटने जागतिक सन्मान

वेध खरीपाचे, नियोजन गुंतवणुकीचे

हुमणी किड व्यवस्थापन…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!