आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
गुरुवार दिनांक १२ जून पासुन पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली असुन गुरुवार दि. १२ ते सोमवार दि. १६ जून अश्या पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही शनिवार दि. १४ ते सोमवार दि. १६ जून ह्या तीन दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या जिल्ह्यात मध्यम जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अश्या १३ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते. विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
सध्या काही शेतकरी धूळ पेरणीचा विचारात असुन त्यांनी मान्सून सक्रिय झाल्यावर, १५ जून नंतर, चांगल्या मान्सून पावसाची ओल, उत्तम वाफसा आणि स्वतःच्या विवेकावर पेरणीचा निर्णय घ्यावा, असे वाटते. परंतु त्यातही ज्यांच्याकडे बक्कळ ओल व सिंचनाची व्यवस्था आहे, अश्या शेतकऱ्यांनी एक दोन दिवसात स्वतः च्या हिमतीवर पेरणीचा निर्णय करावा, असे वाटते.
ज्यांनी मे महिन्याच्या बे- मोसमी पावसावर गेल्या ८-१० दिवसापूर्वी पेरण्या केल्या असतील अश्या शेतकऱ्यांनीही घाबरू नये. असे वाटते.
गेल्या आठ दहा दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खिळलेला आहे. त्यात प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही. अजुन पुढील तीन दिवस तरी मान्सून सक्रियतेची लक्षणे दिसत नाही. कारण मान्सून उर्जीतवस्था येण्यासाठी सध्या कोणतीही बळकट प्रणाली सध्या पूरक ठरण्याची शक्यता जाणवत नाही. मात्र त्यानंतर म्हणजे गुरुवार दि.१२ जूनपासून मान्सूनची सक्रियता व वाटचाली साठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता जाणवते. आणि महाराष्ट्रात मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.
