गेल्या 50 -55 वर्षांमधील देशातील घडामोडींचा आढावा घेणारे कोल्हापुरातील जेष्ठ पत्रकार व संपादक वासुदेव कुलकर्णी यांचे ‘मंतरलेल्या दिवसांची बखर’ हे पुस्तक भाग्यश्री प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकांमध्ये दिल्लीपासून ते कोल्हापुरातील घटनांचा आढावा घेण्यात आला आहे.
विजयानंद तेंडुलकर, पेठ वडगाव
वासुदेव कुलकर्णी यांनी सत्तरच्या दशकात दैनिक नवसंदेश मधून कोल्हापुरात अर्धवेळ बातमीदार म्हणून पत्रकारिता सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी केसरी तसेच ऐक्य मध्ये संपादक म्हणून काम केले. या सर्व त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी दिल्ली येथे केसरीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची झालेली हत्या, त्यानंतरच्या राजकीय घडामोडी राजीव गांधींचा झालेला उदय, 1989 च्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव व त्यानंतर जनता दलातील राजकारण, राजीव गांधींची हत्या व काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण यांचा आढावा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी मांडला आहे. 1998 मध्ये केंद्रातील वाजपेयी सरकारचा केवळ एका मताने झालेला पराभव व त्यामधील नाट्य यांचा देखील त्यांनी या पुस्तकात आढावा घेतला आहे.
दिल्लीतील त्यांच्या वास्तव्यात अनेक राजकीय नेत्यांची त्यांचा संपर्क आला; त्यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते व त्यांच्या पत्नी प्रमिला यांच्या विषयीचे लेख वाचनीय आहेत. कै. यशवंतराव चव्हाण, मधु लिमये, जयंतराव टिळक, भाऊसाहेब खांडेकर आदींचे गुणवैशिष्ट्ये त्यांनी या लेखाद्वारे अचूक टिपली आहेत.
ओरिसातील कलाहंडी जिल्ह्यातील दुष्काळ आणि दारिद्र्य याचा वेध घेताना त्यांनी,’ दारिद्र्याची काळी हंडी ‘ हा लेख लिहिला असून तो तेथील वस्तुस्थिती निर्भीडपणे मांडणारा आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी व सांगली जिल्ह्यातील बळीराजा धरणाबाबतच्या लेखांमधून वासुदेव कुलकर्णी यांनी धरणग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. तसेच सरकारचा नाकर्तेपणा प्रभावीपणे मांडला आहे. 1993 मध्ये किल्लारी भूकंपानंतर त्या परिसराची झालेली भीषण दुरवस्था प्रत्यक्ष तेथे जाऊन वस्तुस्थितीदर्शक चित्रित केली आहे.
याबरोबरच 1980 च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सूर्यग्रहणाचा थरार व त्यासाठी त्यांनी धारवाड ते पुणे हा केलेला प्रवास याची माहिती चित्तथरारक आहे. चैत्रवेल होरपळली ‘या लेखात त्यांनी १९८० सालामध्ये कामेरीजवळ झालेल्या ‘मंतरलेली चैत्रवेल ,’या नाटकाच्या बसला झालेला अपघात व त्यामध्ये शांता जोग ,जयराम हर्डीकर आदी कलाकार यांच्या झालेल्या मृत्यूचे वर्णन हृदयाचा ठोका चुकवणारे आहे.
पत्रकारिता करत असताना व त्यासाठी देशभर फिरत असताना वासुदेव कुलकर्णी यांची अनेक वेळा मृत्यूशी देखील गाठ पडली त्याचे वर्णन त्यांनी ‘मृत्यूशी गाठ भेट,’ या लेखात केले आहे. पंजाब मधील अमृतसर शहरातील बॉम्बस्फोट, अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलनावेळी रेल्वेत ठेवलेला टाईम बॉम्ब तसेच विमानाने श्रीनगर होऊन बेंगलोरला येत असताना दिल्लीत थांबल्याने टळलेला विमान अपघात हे प्रसंग त्यांनी वर्णन केले आहेत या लेखातून एखाद्या पत्रकाराच्या जीवनात मृत्यूचा किती धोका असू शकते हे दिसून येते.
‘एका बातमीसाठी,’ या लेखात कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेकासाठी वार्तांकन करण्यासाठी गेले असताना बेंगलोर येथे अचानक सर्कशीच्या तंबूला लागलेल्या आगीत लोक शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी कळल्यानंतर त्यांनी श्रवणबेळगोळ ते बेंगलोर हा 160 किलोमीटरचा प्रवास करून दिलेला वृत्तांत व त्यावेळी भाषेच्या अडचणीवर केलेली मात हा त्यांचा एक वेगळाच पैलू दिसून येतो.
कोल्हापुरात गाजलेल्या सतपाल व हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्तीचा वृत्तांतही मनोरंजक आहे तसेच साखर कारखान्यात झालेला भ्रष्टाचार याचे प्रकरणही त्यांनी कसे बाहेर काढले याचाही वृत्तांत आहे. वासुदेव कुलकर्णी हे एक अभ्यासू पत्रकार असले तरी त्यांची भाषा ही सहज सोपी आणि ओघवती आहे .शब्दांचे फारसे अवडंबर न माजवता सामान्य वाचकालाही समजेल अशा प्रकारची लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शन करणारे ठरेल.
कोल्हापूर आणि सांगली येथे असताना वासुदेव कुलकर्णी यांना दिल्ली, कर्नाटक, काश्मीर, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आदि प्रदेशात जाण्याची संधी मिळाली. त्यांची वार्तापत्रे त्यांच्या नावावर त्या त्या ठिकाणांहून प्रसिद्ध होऊ लागली. बऱ्याचदा त्यांनी आणि मी एकत्रच दौरे केलेले आहेत. त्यांना कोल्हापूरचा अभिमान असला आणि त्यांच्या भाषेत रांगडेपणा असला तरी त्यांची लिहिती भाषा सौम्य आणि प्रासादिक आहे. त्यांच्या भाषेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे ज्ञान आणि विज्ञान आहे आणि रामदासस्वामींचा जिव्हाळा आहे. संत तुकाराम महाराजांचे ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ हे तत्वज्ञान आहे. हो, उगीचच कोणी त्यांच्या वाटेला गेले तर ते त्याची खोड मोडल्याशिवाय राहात नाहीत. त्यांच्या भाषेत जसेच्या तसे चित्र उभे करण्याची ताकद आहे.
अरविंद व्यं. गोखले
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
